शब्दाचा अर्थ अध्यात्म रूढी परंपरा श्राद्ध

वर्ष श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?

2 उत्तरे
2 answers

वर्ष श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?

6
श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्धहोय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यं | देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासुन ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांचे मृत्युच्या तिथिला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमींना ३ प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. या सर्व ऋणास पुत्राने फेडले पाहीजे असा सर्वमान्य समज आहे. ही सर्व ऋणे पुत्र/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातुन मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरु असतांना मृत व्यक्तिचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता पितामह प्रपितामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करावे. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यु पावलेल्यांचे श्राद्ध करावे. पितृ पक्षात अन्नदान व गोग्रास याचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यु पावलेल्याचे श्राद्धही महालयात त्याच तिथीवर करावे.

इतिहास

पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते.त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणा-या अमाजांचे मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले.अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालविण्याच्या उद्देशाने त्यांना उद्देशून काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल आणि त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येवू लागले असतील आणि तो प्रघात आणि ते विधी पुढील काळात त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावे.

श्राद्धाचे प्रकारसंपादन करा

नित्य श्राद्ध- दररोज करावयाचे पंचमहायज्ञ दिवंगत पूर्वजांचे स्मरण.तसेच अमावास्या,अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध .

नैमित्तिक श्राद्ध -काही विशेष निमित्ताने केले जाणारे श्राद्ध. उदा, अक्षय्यतृतीया या दिवशी केले जाणारे श्राद्ध.

काम्य श्राद्ध-विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध.

नांदीश्राद्ध-पुत्रजन्म,विवाह,उपनयन अशा शुभ प्रसंगी जे वृद्धीश्राद्ध करतात ते नांदीश्राद्ध होय.

पार्वण श्राद्ध-पित्रादी त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध.यात वडील, आजोबा, पणजोबा, किंवा आई, आजी, पणजी अशा तीन पिढ्यांना पिंडदान केले जाते.

एकोद्दिष्ट-केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध.

नवश्राद्ध-मृत्यू नंतर १० व्या अथवा ११ व्या दिवसापर्यंत केली जाणारी श्राद्ध.

सपिंडीकरण-दिवंगत व्यक्तीचा पिंड तिच्या आधीच्या तीन दिवंगत पितरांच्या पिंडाशी करणे.

नवमिश्र श्राद्ध-११ व्या दिवसापासून पुढे ६ महिन्यापर्यंत क्ले जाणारे श्राद्ध.

पुराण-एक वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्धे.

महालयश्राद्ध-महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवरयेतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो.आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.



पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य

मातामहश्राद्ध (दौहित्र)-आश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडीलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध.

तीर्थश्राद्ध -गया,प्रयाग , काशी,हरिद्वार इ.तीर्थक्षेत्र ठिकाणे पवित्र न्द्न्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेले श्राद्ध.

गोष्ठीश्राद्ध-श्राध्द विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेवून केले जाणारे श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येवून ,श्राद्धाची सामग्री एक्त्र५ करून केलेलं सामूहिक श्राद्ध

शुद्धी श्राद्ध-एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मणभोजन करणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत आहे.

पुष्टीश्राद्ध-शरीर स्वास्थ्य व धन वृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध.

घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)-यात्राप्रसंगी करावयाचे श्राद्ध. यामध्ये ब्राह्मणाला काही प्रमाणात तूपाचे दान केले जाते.

अष्टका श्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)-कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतर अष्टमीला केले जाणारे श्राद्ध.

दैविकश्राद्ध -देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध.

हिरण्यश्राद्ध- केवळ दक्षिणा देवून केले जाणारे श्राद्ध.

आत्मश्राद्ध-जिवंत असताना गया येथे जावून स्वत:च स्वत:चे केलेले श्राद्ध . हे संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा देण्यापूर्वीही करून घेतले जाते.

चटश्राद्ध-श्राद्ध ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्यांचे आवाहन करून केलेले श्राद्ध.

कर्मांगश्राद्ध -गर्भाधान,पुंसवन संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे श्राद्ध.

(१) आद्य मासिक :- हे पहिल्या महिन्याचे आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचें; परंतु त्या दिवशीं सूतक असल्यानें, सूतक फिटल्यावर तें करावें असें वचन आहे.

(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाचे पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.

(३) द्वितीय मासिक :- दुसरे महिन्याचे आरंभी करावें.

(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनीं म्हणजे पंचेचाळीसावे दिवशीं करावें.

(५) तृतीय मासिक,

(६) चतुर्थमासिक,

(७) पंचम मासिक,

(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धें ज्या त्या महिन्याचे आरंभास करावी.

(९) ऊनषाण्मासिक :- सहावा महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसांचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.

(१०) सप्तम मासिक,

(११) अष्टम मासिक,

(१२) नवम मासिक,

(१३) दशम मासिक,

(१४) एकादश मासिक,

(१५) द्वादश मासिक :- हीं ज्या त्या महिन्याचे आरंभी करावीं.

(१६) ऊनाब्दिक : - बारावा महिना ज्या दिवशीं संपतो त्या दिवसाचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांहि करावें. अधिक मास त्या महिन्याचें मासिक श्राद्ध दोनदां करावें; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धें करावयाची. ही सर्व मासिकें खरोखर त्या त्या उक्त कालीं केलीं पाहिजेत; परंतु बारावे दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानें, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धें केल्यावांचून प्राप्त होत नसल्यानें, ती अकरावे किंवा बारावे दिवशी अपकर्ष करून ( अलीकडे ओढून घेऊन ) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहतां सपिंडीकरणश्राद्ध हें सर्व मासिकें झाल्यानंतर वर्षाचे शेवटचे दिवशीं अब्दपूरित श्राद्ध करून करावें, हा उत्तम पक्ष, असें वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्यानें, सपिंडी श्राद्ध बारावे दिवशींच करण्याचा आतां प्रघात पडला आहे या विषयीं धर्मसिंधूंत ‘ आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस ( सपिंडीस ) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्यानें तत्पूर्वींचीं जीं मासिक श्राद्धें तीहि सपिंडीपूर्वीं ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिकें तत्तत्कालीं पुन्हां करतात. याबद्दल पुढें विवेचन केलें आहे. ( पहा सपिंडी प्रकरण ). सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगावे. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून अभ्यंग स्नान घालावें, व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्रानें ( एकदम ) ही श्राद्धें करावी. असमर्थानें आमान्नानें करावींत.

तर्पण

पितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते,त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.
*****धन्यवाद*****
उत्तर लिहिले · 27/11/2018
कर्म · 9330
0

वर्ष श्राद्ध: अर्थ आणि महत्त्व

वर्ष श्राद्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच तिथीला (death anniversary) पहिल्या वर्षी केले जाणारे श्राद्ध. हिंदू धर्मात या श्राद्धाला विशेष महत्त्व आहे.

अर्थ:

  • हे श्राद्ध मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आदराने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केले जाते.
  • असे मानले जाते की वर्ष श्राद्ध केल्याने मृतात्म्याला पितृलोकात (ancestral world) स्थान मिळते आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी ते सहाय्यक ठरते.
  • या श्राद्धामध्ये पिंडदान (offering of rice balls), तर्पण (offering water), आणि ब्राह्मण भोजन (feeding the Brahmins) दिले जाते.

महत्व:

  • वर्ष श्राद्ध हे फक्त एक कर्मकांड नाही, तर तो आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
  • असे मानले जाते की श्राद्ध केल्याने कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद राहतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
  • या निमित्ताने, कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि मृतात्म्याच्या आठवणींना उजाळा देतात.

टीप: श्राद्धाची पद्धत आणि नियम हे कुटुंबानुसार आणि प्रदेशानुसार बदलू शकतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1760

Related Questions

निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?