2 उत्तरे
2
answers
भाट म्हणजे काय?
0
Answer link
भाट' हा शब्द मराठीत 'स्तुतिपाठक' या अर्थाने रुढ आहे. हा एक भटका समाज असून 'भाट' किंवा 'पुस्तके' या नावानं ओळखला जातो. पूर्वजांच्या किंवा आपल्या मालकाच्या वंशावळी, त्या संदर्भातील इतर नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे हा भाटांचा पिढीजात व्यवसाय आहे.



वंशावळ वाचण्याचे काम हा समाज करतो. वंशावळीस 'नामावळी' किंवा 'वडलोपजी' असेही म्हणतात. एकप्रकारे कुळाचा इतिहासच त्यांच्याकडे अभिलेख म्हणून जतन केलेला असतो. ही कामे वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून केली जातात.
(वंशावळीतील एक पान👇)

मी इयत्ता तिसरीत असतांना माझ्या वडिलांच्या आग्रहास्तव व विनंतीवरून भाट आमच्या गावी आले होते. तसेच घरी काही दिवस मुक्कामी होते. त्यावेळी त्यांची खूप सरबराई करण्यात आल्याचे मला आठवते. तेव्हा त्यांनी माझी जन्मतारीख, नाव इत्यादी तपशील त्यांच्याकडील दस्तऐवजात नोंदवून घेतला होता.
भाटांकडे असणाऱ्या नोंदींची वैशिष्ट्ये-
आपले पूर्वज कोण होते? त्यांचे मूळ गाव, त्यांचं नाव, जात-पोटजात, पूर्वज कोठे राहत होते? कुलदैवत कोणते? अगदी खापर पणजोबा काय करायचे, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? परिवार या गावात कसा आला? इत्यादी रंजक माहितीचा इतिहास या 'पुस्तक्यांकडे' सापडतो की अशी माहिती शासनाच्या कोतवाल बुकातही सापडणार नाही.
भाट लोक वंशावळ वाचण्याच्या आधी श्रीगणेश व इतर देवतांना वंदन करून वाचायला सुरुवात करतात. एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचून दाखवतात. नवीन पिढीतील मुलांची नावे याची नोंद करतात.
भाटांच्या दप्तरात 'सांकेतिक' लिपीत लिहिलेला बहुतेकांचा लेखाजोखा आजही उपलब्ध आहे. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय इतर कुणीही करू नये, म्हणून सांकेतिक लिपीत नोंदी करण्याची त्यांची पध्दत असावी. खरं तर असा प्रकार असतो किंवा होता, याबाबत आजही फारसे कुणाला माहीत नाही.
पूर्वीची भाटांची कार्यपद्धती-
पूर्वी भाट बांधव आपल्या पत्नीसह माहितीचं गाठोडं डोक्यावर घेऊन जात असत. ठरल्याप्रमाणे त्या त्या कुटुंबाच्या घरी घरमालकाच्या संमतीने चार- पाच दिवस मुक्काम करत. या दिवसांत घरात नवीन जन्मलेल्या मुलांच्या, नवीन सून म्हणून आलेल्या, मुलगी सासरी गेलेल्या तसेच मयत झालेल्या घरातील सदस्यांच्या तारीखवर नोंदी करणे तसेच जुन्यांची माहिती घरमालकाला देणे इत्यादी कामे केली जायची. त्यावेळी त्यांचे जेवण, पाहुणचार, राहण्याची व्यवस्था, घरमालक उत्साहाने व आदराने करायचे. सांगावयाची माहिती भाट आपल्या खास आणि काव्यमय शैलीत सांगत असत. संपूर्ण माहितीची देवाणघेवाण झाल्यावर तसेच पोथीची पूजा करून भाट परतीच्या प्रवासाला निघाले की त्यांना साडीचोळी, कपडे, शेला, नारळ, दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला जायचा.
तत्कालीन 'तहसीलदार' म्हणून ओळखले जाणारे भाट बांधव काही वर्षांपूर्वी गावोगाव हिंडताना दिसत होते. काळाच्या ओघात आता मोजकेच भाट बांधव फक्त माहिती देण्यापुरते संबंधित कुटुंबात जातात. माहिती दिल्यावर गावातील मंदिरात किंवा धर्मशाळेत मुक्काम करतात. हे भाट आता कालबाह्य झाले तरी एकदा भाटाचा एक पुरावा कोर्टाने ग्राह्य मानला होता, हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.
यवतमाळ जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाची ही सत्यकथा. नगराध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते आणि तत्कालीन नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गातील अर्थात मराठा असल्याची चर्चा होती. त्यामुळे पराभूत झालेल्या एका उमेदवाराने याविरुद्ध कोर्टात याचिका सादर केली. मात्र विराजमान नगराध्यक्षाने आपण ओबीसी (कुणबी) असल्याचे अनेक पुरावे सादर केले, त्यात त्यांनी त्यांच्या भाटाकडे जाऊन त्यांचे पूर्वज कोण होते, कोणत्या जातीचे होते वगैरे माहिती काढली व कोर्टात सादर केली. तेव्हा कोर्टाने ही माहिती मान्य करून त्यांचे नगराध्यक्षपद कायम ठेवले होते. सदर खटला नागपूर उच्च न्यायालयात सन 2000 साली चालला होता.
वरील घटनेवरून 'भाट' बांधवांचे समाजातील स्थान व महत्व अधोरेखित होते. त्यांच्याकडे अनेक पिढ्यांचा माहितीचा खजिना असे. पूर्वजांचे 'रेकॉर्ड' जतन करून ठेवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले हे मात्र नाकारता येणार नाही.
0
Answer link
भाट म्हणजे पारंपरिक स्तुती करणारे किंवा प्रशंसा करणारे लोक. भाट हे राजे, सरदार, किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या गुणांचे आणि शौर्याचे वर्णन गाऊन किंवा कवितांच्या माध्यमातून करत असत.
भाटांचे कार्य:
- स्तुती करणे
- वंशावळी जतन करणे
- ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणे
- मनोरंजन करणे
भाट हे मौखिक परंपरेचा एक महत्वाचा भाग होते, ज्यामुळे इतिहास आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असे.