3 उत्तरे
3
answers
गरोदरपणात कोणत्या महिन्यापासून भूक वाढते?
2
Answer link
गर्भारपणाचा हा काळ सर्वात सुखद काळ आहे. पहिल्या १२ आठवड्यांत रोज वाटणारी मळमळ, उलट्या या काळात जवळजवळ थांबतात व गरोदर स्त्री सुटकेचा नि:श्वास सोडते. या काळात भूक वाढायला लागते, तसेच अनेक वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. एकत्र कुटुंबात राहत असेल तर तिचे खाण्यापिण्याचे डोहाळेही मनसोक्त पुरवले जातात.
या मधल्या तीन महिन्यांच्या काळात गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढायला लागतो; पण अजून खूप जास्त मोठा न झाल्याने अवघडलेपणा कमी असतो व सर्व हालचाली सहज शक्य असतात. यानंतरच्या तीन महिन्यांत गर्भाशयाच्या आकारामुळे हालचालींना त्रास होण्याची शक्यता असते.
छाती आणि पोट यांमधील श्वासपटलावर या तीन महिन्यांत थोडा ताण यायला सुरुवात होते. याचा परिणाम श्वासोच्छ्वासावर होतो. थोडासा दम लागल्याची भावना होते. मध्येच जोराने लांब श्वास घ्यावासा वाटतो. तरीही हे सर्व खूप त्रासदायक नसते.
पहिल्या १४ आठवड्यांत गर्भाच्या शरीरातील सर्व अवयवांची वाढ जवळजवळ पूर्ण झालेली असते. १४-२७ आठवड्यांत आता या अवयवांचा आकार वाढतो आणि हे अवयव हळूहळू अचूकपणे कार्य करायला लागतात. १४ आठवड्यांचा गर्भ साधारणपणे दीड इंच लांब व ४५ ग्रॅम वजनाचा असतो. चौदा आठवड्यांपासून गर्भाशयाची वरील बाजू ओटीपोटातून पोटाच्या पोकळीत हाताला लागू शकते. स्त्रीचे वजन थोडेसे वाढते; पण अजूनही ती गरोदर आहे हे पटकन लक्षात येत नाही. यानंतर मात्र गर्भाशयाचा आकार झपाट्याने वाढत जातो व अनेक वेगवेगळी लक्षणे दिसायला लागतात.
गर्भारपणात शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत पुष्कळच बदल होतात. तसेच वेगवेगळी संप्रेरके निर्माण होतात. म्हणूनच त्वचेवर खूप बदल दिसतात. काही स्त्रियांची त्वचा तजेलदार दिसायला लागते आणि त्यांच्या सौंदर्यात वेगळाच आकर्षकपणा येतो. मेलॅनिन या द्रव्याचे प्रमाण रक्तात वाढल्यामुळे काही जणींना हे अनुभवास येत नाही. त्यांची त्वचा गरोदरपणात काहीशी काळवंडते. हे काळसर चट्टे विशेषत: दोन्ही गालांवर दिसून येतात. तसेच पाठीवर, पोटावर, पायांवरही हे काळसर डाग वाढतात. यावर कोणताही उपाय नसतो; परंतु या डागांची फारशी काळजी करण्याची गरज नाही. प्रसूतीनंतर काही महिन्यांनी हे डाग कमी होतात व अजून थोड्या काळानंतर आपोआप नाहीसे होतात.
गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे पोटाची त्वचा ताणली जाते. त्वचेच्या आत असलेल्या कोलॅजिन तंतूंच्या रचनेतील बदलामुळे पोटावर ‘स्ट्रेच मार्क्स’ किंवा रेषा दिसायला लागतात. सुरुवातीला लालसर गुलाबी रंगाच्या या रेषा काही महिन्यांनी काळसर रंगाच्या दिसायला लागतात. औषधांच्या दुकानात हे व्रण फिके करणारे अनेक मलम उपलब्ध आहेत. ते जरी वापरले तरी त्यांचा परिणाम खूप होत नाही. घरच्या घरी उपलब्ध असलेले खोबरेल तेलही जर हलक्या हाताने रोज लावले तरी चालते. त्वचा ताणल्यामुळे झालेला हा परिणाम असल्याने प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत झाले की हे व्रण कमी दिसायला लागतात.
गर्भाची हालचाल जाणवणे
गर्भाची हालचाल अगदी लवकर म्हणजे ७-८व्या आठवड्यातच सुरू झालेली असते. गर्भाचा आकार आणि वजन खूप कमी असल्याने गरोदर स्त्रीला ही हालचाल जाणवत नाही.
गर्भावस्थेच्या १८-२२ आठवड्यांत सर्वांत प्रथम स्त्रीला ही हालचाल स्पष्टपणे जाणवायला लागते. हा क्षण खूपच सुंदर, सुखद असतो. आपल्या शरीरात वाढणा-या इवल्याशा जिवाची ही खूण आनंददायक असते. लवकरच येत्या २-३ महिन्यांत तो इवलासा जीव मातेच्या हातात प्रत्यक्ष येणार असतो. पहिल्या गरोदरपणात ही हालचाल थोडी उशिरा जाणवायला सुरुवात होते. २४ ते २८ आठवड्यांमध्ये गर्भाचा आकार व त्याच्या बाजूला असलेल्या गर्भजलाचे प्रमाण व्यस्त असल्याने गर्भाच्या हालचाली खूप होतात. या वेळी गर्भ पोटाला झालेला स्पर्श, मोठा आवाज या सर्वांना हालचाल करून प्रतिसाद देतो.
या काळाच्या २० व्या आठवड्यात सोनोग्राफी तपासणी, रक्त चाचणी तसेच इतर काही त्रास जसे की चक्कर येणे, उलट्या, पाठ आणि पाय दुखणे, पायावर सूज येणे हे शारीरिक त्रास जास्त प्रमाणात होत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेदनाशामक औषधी घेऊ नयेत.
0
Answer link
गर्भधारणेदरम्यान भूक वाढणे हे एक सामान्य लक्षण आहे. बर्याच स्त्रियांना पहिल्या तिमाहीत (पहिला महिना ते तिसरा महिना) मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो, त्यामुळे त्यांची भूक कमी होते.
सामान्यपणे, गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत (चौथा महिना ते सहावा महिना) भूक वाढायला लागते. ह्या वेळेत मळमळ कमी होते आणि शरीराला वाढणाऱ्या बाळासाठी जास्त पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे गर्भवती महिलांना जास्त भूक लागते. काही स्त्रियांना तिसऱ्या तिमाहीत (सातवा महिना ते नववा महिना) देखील भूक वाढू शकते.
प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे कुणाला लवकर भूक वाढते तर कुणाला उशिरा.
टीप: अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.