नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
ओळखल का मला? मी तुमची सर्वांची लाडकी मराठी भाषा बोलतेय .अलीकडे माझे महत्त्व कमी झाले आहे असे मला वाटत आहे. कारण लहानग्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात .का? तर ते या तंत्राद्यानाच्या युगात मागे राहू नये म्हणून. पण माझे महत्त्वही तेवढेच आहे जेवढे इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आहे.आपण ज्या प्रदेशात राहतो ती आपली मातृभाषा होते.त्या अर्थी मी तुमची मातृभाषा आहे.कारण लहान मुल जेव्हा पहिला शब्द बोलतो तो मराठीतूनच असतो.
म्हणून असे म्हटले जाते- "माझी मराठी ही माय जशी दुधावरली साय
बाळा बोलाया शिकविते सरस्वतीचा वास तिच्यामंदी हाय"
आज २७ फेब्रुवारी आहे म्हणजेच माझा दिवस.आज कविवर्य वि.वा.शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांनी मराठीतून अनेक साहित्य, कथा,कादंबऱ्या लिहिल्या. त्यावर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे कवी होय. आपण सर्वांनी "नटसम्राट" हा सिनेमा नक्कीच पहिला असेल. तो देखील त्यांच्याच साहित्यातून घेतला आहे.
आपल्या देशात अनेक संत होऊन गेले त्यांनी देखील मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे-
"माझिया मराठीची बोलू किती कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके."
या मराठी दिनी मला एवढेच म्हणायचे आहे कि मराठी भाषा ही आपली मायबोली आहे तर तुम्ही सर्वांनी तिचा आदर केला पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन-
"माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत"
अशी रसाळ मायबोली हृदयात घेत असे ठाव कोठे आहे का अशी बोली असेल तर मजला दाव."
एक तुतारी दया मज आणुनि फुकिन मी जी स्वप्राणाने"
अगदी केशवसुतांनी लिहिल्याप्रमाणेच माझी अवस्था झाली आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मान्यता पावलेली मी 'मराठी' माझ्या मनातील वेदना तुमच्यासमोर मांडू इच्छिते.
ज्ञानभाषा म्हणून संस्कृत भाषेचा प्रभाव जनमानसावर असताना तेराव्या शतकापासून मराठी संतांनी मराठी या तत्कालीन बोलीचा आग्रह काव्यलेखनासाठी धरला आणि संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम, रामदासांपर्यंतच्या संतकवितांमुळे मला समृद्ध काव्यपरंपरेचा वारसा लाभला.
तेरावे शतक हा सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ. यादरम्यान समाजाच्या धर्मभावना प्रबळ होत्या. असे असताना अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा आणि अराजकता दूर करण्यासाठी संतांच्या मांदियाळीने ओवी, अभंग, भारूड इ. लेखनप्रकारांच्या माध्यमातून माझा वापर करून आदर्श कल्पना मांडल्या.
संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे पंडिती कवीही मग संस्कृत महाकाव्याचा परिचय मराठीतून देऊ लागले.
त्यानंतर वीरश्री आणि प्रेम निर्माण करणारे शाहिरी काव्य बहरास आले. शौर्य आणि पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या काव्यमय वीरगाथा म्हणजे पोवाडा आणि शृंगार रसाने रसरसलेली लावणी आजही लोकांना हवीहवीशी वाटली ती त्यातील अलंकारिक, वृत्तांच्या सौंदर्यामुळे (भाषिक सौंदर्य)! त्याच तेराव्या शतकात लीळाचरित्रातील सूत्रपाठाचे लेखनही झाले.
ललित, रूपक, कथा, कादंबरी, पत्र, आठवणी, नाटक, आत्मकथन अशी साहित्याची विविध अंगे नावारूपास आली. प्रचंड ग्रंथसंपदा, नावाजलेले, ज्ञानपीठ पुरस्कारासारखे साहित्य पुरस्कार मिळवणारे अनेक साहित्यिक माझ्या वापराने मोठे झाले. त्यांच्याबरोबरच मीही मोठी झाले.
एवढी समृद्धी असूनही इंग्रजी या परक्या नव्हे, सावत्र बहिणीने माझ्या महाराष्ट्रात मला दूर लोटून आपले वर्चस्व गाजवावे?
मी स्वभावाने गरीब आहे म्हणून माझ्या स्वभावाचा गैरफायदा घ्यावा?
मला मान्य आहे आज उच्चशिक्षण घेण्यासाठी सर्वत्र इंग्रजीचा वापर केला जातो. पण म्हणून मातृभाषेचे महत्त्व कमी ठरते का?
माणूस आपल्या मातृभाषेतून विचार करतो ते तो त्याच भाषेतून उत्तम रीतीने प्रकट करणार नाही का?
इंग्रजीच्या देखणेपणाला भुलून माझ्या सात्त्विक सौंदर्याकडे तुम्ही डोळेझाक करणार का?
मी ऐकतेय की मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने अनुदान दयावे यासाठी प्रयत्न होताहेत. दहा कोटी लोक ही भाषा बोलत असताना?
अरेरे ! माझ्या मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान नसावा यासारखे दुर्दैव कोणते?
पण म्हणतात ना, वाळवंटातही कुठेतरी 'हिरवळ' दिसतेच. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून मराठीप्रेमी नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करताना दिसताहेत. माझ्यासाठी ही भाग्याचीच बाब आहे ना !
कार्यालयीन कामामध्येही आता मराठीचा वापर होताना दिसतो. दुकानांच्या पाट्या मराठी नावाने झळकताना पाहून मला आनंद होतो. रेडिओवर मराठी गाणी; दूरदर्शनवर झळकणाऱ्या मराठी वाहिन्या या संस्कृतीच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने माझ्यासाठी मोलाचे कार्य करत आहेत.
महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या अमराठी बांधवांमध्ये तुम्हीच माझ्याविषयी आपुलकी, गोडी निर्माण करू शकता ना ! त्यासाठी अमाठी शाळेतही हा मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या भाषेचा पोग्य तो, योग्य तिथे, योग्य वेळी सन्मान राखण्यास तुम्ही प्रयत्नशील राहाल असा मला विश्वास वाटतो.
महाराष्ट्रात मराठीची अस्मिता जोपासणे हे केवळ तुमच्याच हातात आहे.
एक आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे खरेखुरे भवितव्य ज्या मराठी भाषेच्या भवितव्यावर अवलंबून आहे त्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्व. यशवंतराव चव्हाण पांनी २१ डिसेंबर १९६० रोजी 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि म्हणूनच मराठी मातीशी इमान राखणारा 'जाणता शासनकर्ता' म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचा गौरव केला. हे काही मी विसरलेली नाही.
त्यामुळे साहजिकच
'हिचे पुत्र आम्ही,
हिंचे पांग फेडू
तिला बैसवू वैभवाच्या शिरी'
ही जुलियनांची अपेक्षा खरी ठरणार अशी आशा निर्माण झाली.