मनोहर आहिरे यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास ‘काझीचं वाडगं’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील काही भाग…
काझीचं वाडगं ः नागसेनवाडी – नागसेननगर असा नामांतराचा प्रवास झालेल्या झोपडपट्टीत आम्ही पैदा झालो, वाढलो. नाशिक-पुणे महामार्गावर असल्याने तसंच भारताचा सर्वात मोठा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा रोडवर वसलेली ही वस्ती. पाहिलं नाही; परंतु बुजुर्गांकडून ऐकलेल्या माहितीवरून बुधाभाऊ मोरे नावाच्या एका मातंग (तेव्हाचा मांग) कार्यकर्त्याने या वस्तीसाठी तेव्हाच्या नगरपालिकेशी झगडा केला आणि ही वस्ती स्थिरावली.
मांगा- महारांची वस्ती म्हणून वाडगं, वाडा नाही आणि इंग्रजांच्या दिमतीला असलेल्या काझींना बिदागी म्हणून दिलेली ही जागा म्हणून काझीचं वाडगं. लहानपणी एक काझीबाबा पांढरा शुभ्र पायजमा, झब्बा आणि काळी टोपी, काळा चश्मा, उंची साधारणपणे साडेसहा फूट, दरमहा चार आणे वसुलीसाठी यायचा. आठवतंय त्याप्रमाणे सत्तर-ऐंशी घरांपैकी वीस-पंचवीसच त्याला भीक घालायचे. एकादा एका बाईशी काझी काहीतरी आडवंतिडवं बोलला. पुढच्या फेरीच्यावेळी त्या बाईने पैसे देण्याऐवजी घरातला कुत्रा अंगावर सोडला. म्हातारा काझीबाबा पळूही शकत नव्हता. आसपासच्या लोकांनी सोडवलं; पण तोपर्यंत पायजमाच्या बटा निघाल्या होत्या. त्यानंतर काझीबाबा कधीही दिसला नाही. असं हे काझीचं वाडगं. पलीकडे येसकरवाडा, महारवाडा, मोठा राजवाडा असा प्रवास करणारी; परंतु आर्थिकदृष्ट्या जरा सक्षम आणि पक्की घरे असलेली वस्ती. परंतु, ‘जयभीम’पेक्षा तिरस्काराच्या आणि बेगडी शहाणपणाच्या गप्पाच येथे अधिक ऐकायला मिळायच्या. अनेकदा तर ‘काझीचं वाडगं अन् मुतायचं गाडगं…’ अशीच शिवी अधिक ऐकायला मिळायची. मन लहानपणी खजील व्हायचं. पण तेव्हाच्या वस्तीत शिकणार्या पँथर्सनी नागसेन या महान बौद्ध भिक्खूचं नाव दिलं अन् शहाण्यांचे दात त्यांच्या घशात घातले. आई सांगते त्याचप्रमाणे या वस्तीत वसलेलं आमचं पाचवं घर,१९३५ चं. याचा अर्थ आमच्या सर्व भावंडांचा जन्म याच वस्तीतला, वाडग्यातला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या साक्षीने आणि साथीने अनेक वस्त्यांना कवचकुंडल्यांप्रमाणे जपलं. आमची वस्तीही त्यास अपवाद राहिली नाही. वेगळेपणा मात्र एक होता, विटंबनेचा निषेध करण्यासाठी पहिला दगड फेकला जायचा तो वडाळा नाक्यावर, अर्थातच नागसेनवाडीच्या वाडग्यातून. याच वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घराघरापर्यंत पोहोचविणारा आवाज होता. ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात एक प्रकारचा आंबेडकरी यल्गार पुकारला होता. उभ्या महाराष्ट्राला माहीत असलेलं नाव… लोककवी, कविवर्य वामन तबाजी तथा वामनदादा कर्डक…!
नागसेनवाडीचे प्रवेशद्वार म्हणजे वामनदादांचं घर. वामनदादा… ‘पिकतं तिथं विकत नाही’ अशी अवस्था असलेला हा काव्यमय शब्दसम्राट आमच्या नाशिकला संपूर्ण कधीच कळाला नाही. यावर पुढे वाचू! नागसेननगराची रचनाच न्यारी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानं अधिक घट्ट झालेली वस्ती काळानुरूप बदलत गेली. जुना आग्रा रोड ते पूना रोड अशा चौकोनात ही वस्ती. कोळीवाडा, कातारआळी मागे मुस्लीम पट्टा, शेजारी गारुडाळी (गारुडी समाजाची वस्ती) आणि फ्रंटला महार, नवबौद्ध आणि मिश्र जाती-जमातींचे. परंतु, सर्वांच्या ‘जयभीम’चा आवाज मात्र सारखाच होता. तो बेंबीच्या देठापासून घातलेला असायचा.
मला आठवतंय तोपर्यंत वस्तीत लाईट नव्हती, रस्ते नव्हते, पक्की एखाद्-दोन घरं असतील. रात्र झाली की रॉकेलच्या बत्त्यांच्या उजेडात पाटा रुचण्याचा आवाज एकमेकाला साद आणि साथ देत असायचा. मग जिच्याकडे धने कमी असतील तिने धने मागायचे आणि चार-पाच मिरच्या द्यायच्या. वहिनीने (माझ्या मोठ्या भावजयीने) सांगितलं, की पळत जायचं (खेळणं मध्येच थांबवून) आणि ही बार्टर इकॉनॉमी मेनटेन करायची. ऐनवेळी तिच्या ध्यानात यायचं, की तेलच नाही. मग विनवण्या करून चार आण्याचं (पंचवीस पैसे) गोड्याचं तेल माणिकशेठच्या दुकानातून पळत जाऊन आणायचं. अनेकदा (अंबाबाई-माणिकशेठची बायकोच असायची दुकानावर अन् बॅक ग्राऊंडला माणिकशेठचा तर्रर्र झालेला आवाज) इथेही इकॉनॉमिकल सायकल मेनटेन झालेली असायची. वहिनीनं पाच पैसे अधिक दिलेले असायचे. अर्थात, शिव्या बोनसमध्ये. ही माझ्याच नाही तर वस्तीतल्या प्रत्येक घर घर की कहाणी होती. आमचं उदाहरण सँपल म्हणून लिहिलं.
चंद्राचा उजेड आणि त्याची भ्रमंती हेच वस्तीचं घड्याळ. अंधार इतका की डोळ्यांत बोट घातलं तरी समजायचं नाही. पण, कम्युनिकेशन नेटवर्क मात्र स्ट्राँग, कधी रेंज जायची नाही. आमचा पापडवाला म्हणजे ग्रेटच. एवढ्या अंधारात तो आपली मुगाच्या तळलेल्या पापडांची कटोरी (काड्याची पाटी) पाठीवर घेऊन न चुकता घुसायचा आणि पुन्हा एकच आवाज द्यायचा… है… पापड्डवाला… बस्स! प्रतिउत्तरात दोन-तीन आरोळ्या यायच्या, गिर्हाईकांच्या! आमचा हा पापडवाला मामू क्रमशः त्या दारात, ओट्यावर, ओसरीवर जायचा अन् त्याच घराच्या उजेडात पैसे मोजून पापड द्यायचा. कधीही त्याचा हिशेब चुकला नाही. वस्तीची प्रगती झाली. म्युनिसिपाल्टीचे दिवे लागले अन् आमचा अंधारातला पापडवाला मामू नाहीसा झाला. कितीही आठवलं तरी चेहरा आठवत नाही. कारण तो अंधारातच उभा असायचा. आता त्याच पापडाची चव घेण्यासाठी वाटतं वस्तीत जावं, मनपाला सांगून सर्व लाईटस् घालवावेत, किर्रर्र अंधार करावा आणि आवाज द्यावा… ‘है… पापडवाला…’ पण भीती वाटते… पापडवाला मामू आला नाही तर…?