भारताचा इतिहास स्थळे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी कुठे आहे?

3 उत्तरे
3 answers

थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी कुठे आहे?

2
१७४० मध्ये, वयाच्या ४०व्या वर्षी, थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू येथे झाला. येथे त्यांची समाधी आहे. समाधी स्थळ - 'रावेर-खेडी' – पश्चिम निमाड, जिल्हा. खरगोन-मध्यप्रदेश.३० डिसें, २०१५श्रीमंत बाजीराव पेशवा समाधी रावेरखेडी
श्रेणी ऐतिहासिक
महान पेशवे बाजीरावांची समाधी रावेरखेडी येथे आहे. उत्तर भारताच्या मोहिमेदरम्यान नर्मदेच्या काठावर येथे त्यांचा मृत्यू झाला. रावेरखेडीजवळ बकावन येथे नर्मदा दगडांमधून शिव-लिंग कोरले गेले आहेत.



बाजीराव पुतळा

थोरले बाजीराव पेशवे हे आयुष्यात एकही लढाई न हरलेले महापराक्रमी योद्धा तर होतेच, उत्तम प्रशासक, राजकारणी स्वामीनिष्ठ सेवक आणि रसिकही होते. 
. . . . . ….


रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे यांची आज पुण्यतिथी

बाळाजी विश्वनाथ यांचेनंतर त्यांचे चिरंजीव बाजीराव यांना शाहू महाराजांनी दिनांक १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपद दिले. बाजीरावाच्या पराक्रमाची गाथा फार मोठी आहे. ती विस्ताराने सांगणे आणि त्यांच्या उत्तर-दक्षिण भरार्‍यांना सूत्रबध्द करणे फार कठीण आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगली सत्ता खिळखिळी बनली असली तरी ती अद्याप पूर्ण मोडली नव्हती. परंतु अशा परिस्थितीत मोगल साम्राज्य आता आता फार काळ टिकणार नाही, हे अचूक हेरून बाजीराव आपले डावपेच आखत होते. तल्लख बुध्दिने डावपेचांची आखणी करावी आणि भक्कम हातांनी त्याची त्वरीत अंमल बजावणी करावी हेच बाजीरावांचे ब्रीद होते.

मराठी सत्तेचा उत्तरेत विकास करून सार्‍या उपखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती. उत्तरेत मोहिमेवर जाण्यापूर्वी बाजीरावांनी दक्षिणेकडील शत्रूंचा पूर्ण बंदोबस्त केला होता. त्यांनी कर्नाटकात दोन मोहिमा काढून अर्काटचा नबाब, गुबीचा मुरारराव घोरपडे, म्हैसूरचे वाडियार इ. अनेक संस्थानिकांना मराठ्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास भाग पाडले. याच वेळी दक्षिणेत निजाम उल मुल्क हा फार शिरजोर झाला होता. १७२५ चे सुमारास मोगलांशी फारकत घेऊन त्याने आपले स्वतंत्र राज्य ‘असफशाही’ स्थापन केले होते. वास्तविकत: मोगलांनी १७१९ च्या तहानुसार स्वराज्य चौथाई आणि सरदेशमुखीबाबत सनदा दिल्या होत्या. त्यानुसार त्या मुलुखातील सर्व सत्तांना मराठ्यांना चौथाई देणे भाग होते.

परंतु निजाम मात्र यास विरोध करीत असे. सातारकर शाहू महाराज आणि कोल्हापूरकर संभाजी महाराज यांपैकी खरा छत्रपती कोण ते आधी ठरवा आणि मगच माझ्याकडे चौथाई मागा असे निजामाचे म्हणणे होते. निजामाच्या अशा वृत्तीला बाजीरावांनी रणांगणावरच उत्तर दिले. औरंगाबाद आणि पैठण यांच्या मधे असलेल्या पालखेडला निजाम आणि बाजीराव यांच्या सैन्यांची गाठ पडली. अतिशय घनघोर लढाई झाली. त्यात निजामाचा सपशेल धुव्वा उडवत बाजीरावांनी त्याला पराभूत केले. अखेर नाईलाजाने निजामाने तह मान्य केला. मुंगी-शेगावचा तह म्हणून मराठ्यांच्या इतिहासात याची नोंद झाली आहे. यावेळी शाहू महाराजच खरे छत्रपती आहेत आणि चौथाईची रक्कम त्यांनाच दिली पाहिजे. असे बाजीरावांनी निजामाला सुनावले. कोंडीत सापडलेल्या पराभूत निजामाने ते बिनशर्त मान्य केले.

त्यानंतर कोल्हापूरकर संभाजी आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वारणेच्या काठावर मोठे युध्द झाले. त्यात कोल्हापूरकर संभाजीचा सपशेल पराभव झाला. अर्थात यावेळीही बाजीरावांची मौलिक मदत शाहू महाराजांना लाभली होती. परंतु येसूबाईंच्या मध्यस्थीने तह झाला. दोन बंधूंनी असे आपापसांत संघर्ष करू नये असे येसूबाईंचे मत होते. त्यामुळेच हा वारणेचा ऐतिहासिक तह घडून आला.

पुढे बाजीरावांनी बुंदेलखंडात जाऊन बंगषखान या मोगली सुभेदाराचा पराभव करून त्याने कैद केलेल्या छत्रसाल राजाची सुटका केली.

तरीही अद्याप निजामाचा पुरा बिमोड झाला नव्हता. निजाम सतत मराठ्यांच्या काही ना काही कुरापती काढतच होता. त्यातच आता पालखेड (१७२८) नंतर दहा वर्षांनी म्हणजेच १७३८ साली भोपाळ येथे निजाम आणि बाजीराव एकमेकांसमोर उभे ठाकले. दिल्लीच्या बादशहास मदत करण्यासाठी निजाम निघाला असतांना त्याचा तळ भोपाळ येथे पडला होता. ही संधी साधून बाजीरावांनी वेगवान हालचाली करीत अचानक भोपाळ वेढले आणि त्यांनी निजामाची बाहेरून येणारी रसद तोडली. नेमके याच वेळी बाजीरावांच्याच आदेशानुसार चिमाजीआप्पा तापी नदीच्या तीरावर मोर्चे बांधून बसला होता. त्यामुळे नासिरजंग या निजामाच्या मुलाला आपल्या पित्याच्या मदतीस जाताच आले नाही. बाहेरून नवी कुमक येऊ शकत नाही आणि येणारी रसदही तोडली गेल्याने निजाम पुरा कोंडीत सापडला होता. परिणामी परत एकदा निजाम आणि बाजीराव यांच्यात युध्द झाले. त्यात पुन्हा एकदा निजामाचा दारूण पराभव झाला. भोपाळची लढाई म्हणजे बाजीरावांच्या कारकीर्दीतील परमोच्च बिंदू.

एक जातिवंत मर्दाना लढवय्या म्हणून बाजीराव प्रसिध्द होते. दक्षिणेत वर्चस्व आणि उत्तरेत राजकीय नेतृत्व ही बाजीरावांची राजनीती होती.

बाजीरावांबद्दल सांगायचेच झाले तर, पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. बाळाजी विश्वनाथांपासून मिळालेला शौर्य, धैर्य आणि चातुर्य यांचा मौलिक वारसा नुसताच टिकवला नव्हे तर तो सातत्याने वृध्दींगतही केला. कल्पकता आणि धाडस यांचा सुरेख संगम बाजीरावांच्या कारकीर्दीत अनुभवण्यास मिळतो. त्यांची झेप उत्तम. सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट संपादन केल्याशिवाय थकणारी नाही. चिकाटीला कमी नाही आणि हाताला दम नाही. असाच प्रवास असल्यावर अपयश कोठून येणार? असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.

शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात करण्यात बाजीरावांचा सिंहाचा वाटा आहे.

अखेर दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी मध्यप्रदेशातील रावेरखेडी येथे बाजीरावांनी इहलोकीचा निरोप घेतला.

*************


बाजीराव पेशवे म्हटलं की सोबतच मस्तानी म्हणणं हे कर्तव्य असल्यासारखे लोक बाजीरावांना केवळ मस्तानीसोबत जोडतात. हे आजचं आहे असं नाही. नव्वदच्या दशकात राऊ कादंबरीवर आधारित राऊ याच नावाची मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू झाली होती. त्यात बाजीराव रविंद्र मंकणी होते आणि मस्तानी अश्विनी भावे! साहजिकच अश्विनी भाव्यांना भाव देण्यासाठी असेल पण त्याही मालिकेत मस्तानीचा प्रभाव वाढला होता आणि पराक्रमी बाजीराव झाकोळले गेले होते. संजय भन्साळीच्या सिनेमामुळे “मस्तानीचे प्रेमी” बाजीराव हे “पराक्रमी” बाजीरावापेक्षा मोठे ठरले. बाजीरावांवरील एका कार्यक्रमात मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे सर गेले होते. त्यात पराक्रमी बाजीराव कुठेच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. शांतपणे कार्यक्रम सोडून बाहेर आले. पण याच अस्वस्थतेतून “या सम हा” हे प्रचंड अभ्यासपूर्ण पुस्तक तयार झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी म्हणजे बाजीरावांनंतर सुमारे २०० वर्षांनी, युद्धतत्त्वांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. या युद्धतत्त्वांवर आणि युद्धशात्र शिकवताना जे महान जागतिक युद्धविषयक तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या युद्धनीतीवर बाजीरावांची प्रमुख युद्धे पित्रे सरांनी तोलून दाखवली आहेत. या सर्व युद्धात ज्याला जागतिक मापदंड म्हणता येतील अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्व युद्धे लढली आणि जिंकली आहेत. या युद्धांमध्ये खांडवा – बाळापूरची लढाई, गुजरात आणि कर्नाटक मधील मोहिमा या सुरुवातीला आहेत. या पुस्तकात सर्वाधिक चर्चा असलेली पालखेडची लढाई आहे. नंतर अमझेरा आणि बुंदेलखंड या लढाया आहेत. स्वराज्यातील आपसातील कलहाचे पर्यावसान म्हणजे दाभाड्यांच्या विरुद्ध केलेली डभईची लढाई आहे. शिवाजी महाराजांपासून सर्वांनी प्रयत्न करूनही हाती न आलेल्या जंजिऱ्याची मोहीम आहे. बाजीरावांनाही जंजिरा जिंकता आला नाहीच पण किमान सिद्दीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. ही आर्धी जिंकलेली लढाई सुद्धा आहे. त्यांनंतर बाजीराव दिल्लीच्या दारात जाऊन परत आले त्याची संपूर्ण व्यूहात्मक चर्चा आहे. निजामाला भोपाळच्या किल्ल्यात वेढून पुन्हा गुडघ्यावर आणलं ते आहे. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी केलेली शर्थ आहे आणि शेवटची लढाईत निजामाच्या मुलाला – नासिरजंगला – हरवले ते आहे. या सर्व लढाया/युद्धे याबद्दल लिहिताना पित्रे सर कुठेही बाजीरावांना “आपल्या कादंबरीचा हीरो” म्हणून कोणतीही सवलत देत नाहीत. जी आधुनिक युद्धतत्त्वे मानली गेली आहेत, त्या प्रत्येक कसोटीवर घासून बघतात आणि अखेरीस एक अजिंक्य सेनापती म्हणून बाजीरावांचं सोनं झळाळून उठतं.

ज्या १० आधुनिक युद्धतत्त्वांवर बाजीरावांच्या लढाया तोलून बघितल्या ती तत्त्वे आहेत –
१. उद्दिष्टाची निवड आणि पाठपुरावा
२. सुरक्षितता
३. गतिक्षमता
४. आक्रमक चाल
५. बळाचा मितव्यय
६. बळाचे केंद्रीकरण
७. विस्मयकारकता
८. मनोधैर्य
९. सहकार्य
१०. युद्धव्यवस्थापन
पालखेडच्या लढाईवर या पुस्तकात ३ प्रकरणे आहेत. वरील प्रत्येक पैलू त्यात तोलून बघितला आहे. उदा: निजामाला पूर्ण मात हे उद्दिष्ट होतं, त्याचाच पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शाहूंनी माघारी बोलावल्यावरही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करून, बाजीराव माघारी आले नव्हते. सहा महिने बाजीराव निजामाला आपल्या मागे लागण्यासाठी उद्युक्त करत होते. निजाम त्यांना गाठण्याआधीच पुढील टप्प्यावर पोहोचत होते. जेव्हा निजामाने बाजीराव आपल्या पकडण्याच्या बाहेर गेले आहेत असं वाटून माघारीची वाट धरली तेव्हाच बाजीरावांनी औरंगाबादवर चढाई केली आणि निजामाला पुन्हा बाजीरावांच्या मागे जावं लागलं. बाजीरावांकडे मुख्यतः घोडदळ असायचे. त्यामुळे गती, कमीत कमी बळाचा वापर आणि व्यवस्थापनात बुणग्यांची कोणतीही सोय करावी लागत नसे. पालखेडच्याच लढाईत निजामाचा तोफखाना हा युद्धक्षेत्रापासून काही किलोमीटर दूर अडवून ठेवला आणि बिना दात/पंजे असल्याप्रमाणे निजामाचे मनोधैर्य खच्ची केले. बाजीराव हे बारगिरांचे सेनापती होते. ते कायम आपल्या सैन्यात एका सैनिकासारखे वावरत. यामुळे त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य कायम उच्च असे. अनेक लढायांमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांचे निर्णय हे शिंदे, होळकर, पवार, चिमाजी आणि अन्य सरदार घेत. मात्र मूळ आराखडा बाजीरावांचा असे. त्यामुळे सैन्य विखुरलेले असताना केव्हा एकत्र करायचे आणि एकत्रित हल्ला करायचा याचे गणित पक्के असायचे.

या युद्धतत्त्वांशिवाय सुन्त्झू या चिनी युद्ध तत्त्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी “द आर्ट ऑफ वॉर” नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील तत्त्वे आजही जगन्मान्य आहेत. याही कसोटीवर बाजीरावांची युद्धे तपासून पाहिली आहेत. यातील मुख्य बाबी –
१. न लढताच जिंकणे सर्वात उत्तम – निजामाची सगळीकडून कोंडी केली, त्याचा तोफखाना त्याच्याजवळ येऊ शकला नाही आणि पालखेडला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई न होता निजाम शरण आला
२. जे अवघड आहे त्याची योजना ते सहज असतानाच आखावी, जे प्रचंड आहे, ते लहान असतानाच हाताळावे – निजामाने साताऱ्यावर चढाईचा विचार करताच बाजीराव वेगाने त्याच्या भागात घुसले आणि निजामाला त्याचा बेत बदलावा लागला. इथे जर निजाम साताऱ्यावर चालून गेला असता तर एकूण युद्ध खूप मोठं झालं असतं.
३. विजयाचा उन्माद साजरा करू नये, जे करतात ते रक्ततृषार्त असतात – बाजीरावांनी कधीही विजय साजरा केला नाही. दाभाड्यांना डभईला हरवल्यावर तर त्यांच्या आईंना भेटायला स्वतः गेले होते.
४. तुम्ही स्वतःला अजेय बनवा आणि शत्रू जेव्हा असुरक्षित असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करा. आपण हरणार नाही अशाच ठिकाणी मुरब्बी लढवैये मोर्चेबंदी करतात आणि पराभवाला कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही निमित्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत – डभईच्या लढाईत बाजीरावांनी आधी दाभाड्यांना बाकी सैन्यापासून दूर नेले आणि नंतर नदीच्या चंद्रकोरीत अडकवले. इथे बाजीराव हरण्याच्या सगळ्याच शक्यता दूर झाल्या.
याच तत्त्वज्ञानातील दुसरा एक तत्त्वज्ञ, चुंग हो ची, म्हणतो की – गोंधळ होण्यापूर्वी गोंधळाची जाणीव असणे, संकट येण्यापूर्वी संकटाची जाणीव असणे, विध्वंसापूर्वी विध्वंसाची जाणीव असणे आणि आपदेपूर्वी आपदेची कल्पना असणे हे गहन ज्ञान आहे… या आणि अशा सर्व बाबी या बाजीरावांच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात.

कार्ल फॉन क्लाऊजवित्स हा बाजीरावांनंतर ८० वर्षांनी जन्मला. त्याने “ऑन वॉर” या ग्रंथात हालचालप्रधान युद्धांबद्दल लिहिले आहे. त्याने खालील मुद्दे मांडले होते –
१. शत्रूचा अन्नपुरवठा तोडणे/कमी करणे – भोपाळच्या किल्ल्यात निजामाला जेवण मिळणे मुश्किल झाले होते
२. शत्रूच्या तुकड्या विलग राखणे – पालखेड आणि डभई या दोन्ही ठिकाणी मुख्य तुकडीला विलग केले गेले होते
३. शत्रूला माघार अधिक धोकादायक करणे – प्रत्येक लढाईतच शत्रूला परतीच्या वाटा पूर्ण बंद केल्या होत्या
४. शत्रूची स्वतंत्र ठाणी मोडणे – दिल्लीच्या चढाईच्या आधी बाजीरावांनी आपल्या लहान लहान तुकड्यांच्या मार्फत अनेक ठिकाणी शत्रूला मात दिली होती (अपवाद – होळकरांचा पराभव)
५. शारीरिक आणि नैतिक परिश्रमाची तयारी – जे अंतर सामान्य घोडदळ ५ दिवसात पूर्ण करे, तेच अंतर बाजीरावांचे सैन्य २ दिवसात पूर्ण करत असे. घोड्यावर बसल्याबसल्याच शेतातील दोन कणसं घेऊन जेवण पूर्ण होत असे.
६. नेमकेपणा आणि शिस्त – बाजीरावांच्या सैन्याने कधीही लुटालूट केली नाही, कधीही कोणत्याही स्त्रीवर हात टाकला नाही
याही प्रत्येक मुद्यांमध्ये बाजीरावांचे युद्धकौशल्य वादातीतपणे सिद्ध होते.

बेसिल हेन्री लिडेल हार्ट हा हालचालप्रधान युद्धावरील मोठा भाष्यकार आहे. त्याच्या मांडणीत
– उद्दिष्ट आणि क्षमता या जुळल्या पाहिजेत – बाजीराव दिल्लीच्या दारी जाऊन हल्ला न करता परतले
– बदलत्या परिस्थितीत लवचिकता असली पाहिजे – होळकरांची तुकडी पराभूत झाल्यावर आग्र्याला शत्रुसैन्याची पार्टी सुरू होती. ते बघून बाजीरावांनी आग्र्याला वळसा घालून थेट दिल्ली गाठली
– शत्रूला अनपेक्षित बाजूने हल्ला केला पाहिजे – बंगश जेव्हा बुंदेलखंडात होता तेव्हा ५ दिवसांचे अंतर २ दिवसात कापून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला होता
– शत्रूच्या क्षमता ओळखून, घाई न करता निर्णय घेतले पाहिजेत – निजामाला पालखेड आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी त्याचा तोफखाना वापरता आला नाही
– शत्रू सावध असताना हल्ला न करणे – बाजीरावांनी आग्र्याला हल्ला न करता थेट दिल्लीला धडक मारली
– जिथे विजय झाला तिथेच पुन्हा हल्ला न करणे आणि जिथे पराजय होतोय तिथेच अधिक वेळ न घालवणे – थोडक्यात लवचिकता असली पाहिजे – प्लॅन बी कायम तयार असले पाहिजेत

अशा विविध युद्धतत्वज्ञांच्या मुद्द्यांवर बाजीराव हे अद्वितीय योद्धे ठरतात.

अर्थात काही चुकीच्या म्हणता येतील अशा बाबीही होत्याच. त्याही पित्रे सरांनी व्यवस्थित मांडल्या आहेत.
१. त्यातील पहिली म्हणजे अति सौजन्यशीलता – सद्गुणविकृती. चाणक्यनीतीतील
अग्नि: शेषं ऋण: शेषं, शत्रु: शेषं तथैव च ।
पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषं न कारयेत् ।।
ही बाब बाजीरावांनी अमलात आणली नाही आणि निजामाला दोन वेळा मारता येत असतानाही सोडलं. वसईला सगळ्या धर्मांध पोर्तुगीजांना जिवंत जाऊ दिलं…
२. वसुलीच्या पद्धतीत कोणत्याही सुधारणा त्यांनी केल्या नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नव्हते, किंवा तेवढा वेळ मिळाला नाही
३. आधुनिक शस्त्रे, तोफा या आपल्या सैन्यात असाव्यात असा प्रयत्न केला नाही. त्यांचा भर वेगावर असल्याने दुर्लक्ष केले असेल, पण दुर्लक्ष केले हे खरे…
४. समुद्र केवळ आंग्ऱ्यांवर सोडला, त्यात कोणतेही नवीन प्रयोग केले नाहीत.
या उणिवा या गालावर लावलेल्या तीटासारख्या आहेत.

बाजीरावांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मोगल साम्राज्य नावापुरते शिल्लक राहिले. हिंदूपदपातशाही निर्माण होऊ शकेल हा विश्वास आला. मराठा सरदार हे गुजरात, माळवा आणि उत्तरेत स्थायिक झाले. या भागात सतत सुलतानी कराच्या ओझ्याखाली पिचलेल्या जनतेने मराठ्यांना मनापासून स्वीकारले आणि मराठ्यांनीही त्यांना सांभाळले. छोट्या स्वराज्याचे रूपांतर बाजीरावांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्यात केले. छत्रपतींच्या या सेवकाला शतशः नमन 





जीवनात एकही युध्द न हरलेला एकमेव महान योध्दा अशी जागतिक इतिहासात नोंद.

१८ ऑगस्ट १७०० श्रीमंत बाजीराव पेशवे …. 


बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा आईचे नाव राधाबाई बाजीरावांचे मूळ नाव विसाजी मात्र बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते वयाच्या १३ व्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३) बाजीरावांना चार मुलगे झाले त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले…

थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही हिंदवी स्वराज्य सैन्य भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय…

बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्रा च्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली…

बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला…

असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती…

थोरल्या बाजीरावांची मुद्रा :
“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान……।।”

उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला……







पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील सध्याच्या पुणतांबे गावाजवळ) येथे झालेला संग्राम. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची रणनीती म्हणून या संग्रामाचा उल्लेख होतो. बाजीरावांच्या रणनीती आणि राजकारणचातुर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी बाजीरावांना वयाच्या १९व्या वर्षीच पेशवाईची वस्त्रे दिली होती आणि बाजीरावांनी तो विश्वास या लढाईत सार्थ करून दाखविला.

पार्श्वभूमी : बाजीरावांनी १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदाचा पदभार घेतल्यानंतर लागलीच ते आलमखानाबरोबर मोहिमेवर गेले. पालखेडमधील त्यांचा प्रतिस्पर्धी निजाम-उल-मुल्क याच्या बरोबर त्यांची पहिली भेट ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण्यात आणि दुसरी २३ फेब्रुवारी १७२३ रोजी झबुवाजवळ बलाशामध्ये झाली. या भेटींदरम्यान आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या बाजीरावांची कर्तबगारी चलाख निजामाने हेरली. दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशाहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारीझखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ रोजी शक्करखेडा लढाईत मुबारीझखानाचा पराभव झाला. निजामाने मराठ्यांना ‘चौथाई’ देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला.

२० जून १७२५ रोजी बादशाहाने निजामाला दख्खनचा सुभेदार नेमले. लागलीच आपमतलबी निजामाने मराठ्यांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. १७२५ आणि १७२७ मध्ये बाजीरावांनी कर्नाटकामध्ये मोहिमा काढल्या. याच काळात १७२७ मध्ये निजामाने शाहू महाराजांचे चुलतबंधू कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की, छत्रपतिपदाचा हक्क उभयता दोन्ही बंधूंनी निश्चित करावा व मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. वास्तविक शाहू महाराजांनी कृष्णा आणि घटप्रभा नद्यांदरम्यानच्या प्रदेशाची मालकी संभाजीराजांना देऊ केली होती; परंतु त्यांना ते मान्य नव्हते. निजामाची ही विनाकारण लुडबुड शाहू महाराजांना आवडली नाही. शाहूंच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव होता. बाजीरावाने हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली होती. निजाम आणि संभाजी महाराज यांच्या सैन्याची हालचाल साताऱ्याच्या दिशेने होत असल्याची बातमी शाहू महाराजांना मिळाली. त्यांचा कट्टर शत्रू उदाजी चव्हाण साताऱ्याला शह देण्याच्या इराद्याने रहिमतपूरजवळ पोहोचला होता. निजामाच्या कारस्थानांची खात्री शाहू महाराजांना पटली. निजामाला धडा शिकविणे आवश्यक होते. १७२७चा पावसाळा संपताच बाजीराव फौजेनिशी निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत इ. भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला बेजार केले. चपळाईने विविध ठिकाणी हल्ले करून शत्रूला दमविण्याच्या रणनीतीमुळे निजामाचा तोफखानाही निरुपयोगी ठरला.

बाजीरावांची रणनीती : बाजीरावांची मदार सर्वथा घोडदळावर होती. निजामाच्या पाऊण ते एक लाख सैन्याविरुद्ध बाजीरावांच्या सेनेची संख्या फक्त पंचवीस ते तीस हजारांच्या घरात होती; परंतु शत्रूच्या संख्या वा शस्त्रबलाची पर्वा बाजीराव करत नसत. बुद्धिचातुर्यपूर्ण डावपेचांवर त्यांचा भर असे. शत्रूला वेढा घालणे, त्याची रसद तोडणे आणि त्याचा पाणीपुरवठा अडवणे यांसारख्या मार्गांचा परिणामकारक उपयोग करून शत्रूला गुडघे टेकविण्यास ते भाग पाडत. शक्यतो युद्ध न करता आणि आपल्या सेनेची वाताहत न होऊ देता प्रतिपक्षी सेनापतीचे मनोधैर्य खच्ची करून त्याच्यावर मनोवैज्ञानिक विजय मिळविण्याची अफलातून कला बाजीरावांना साध्य होती.

या वेळी आपल्या गती क्षमतेचा फायदा घेऊन मुघल सैन्याला लांब पल्ल्याचा पाठलाग करावयास भाग पाडायचे, ते थकून जेरीस आल्यावर त्यांना आपल्या निवडीच्या जागेच्या साठमारीत पकडायचे, रसद तोडून उपासमार करायची आणि शरण आणायचे, ही त्यांची योजना होती.

मराठा सैन्यापाशी तोफखाना नाममात्र होता; उलट, निजामाकडील तोफांचा संभार प्रबळ होता. हा असमतोल भरून काढण्याचा एकच उपाय होता, तो म्हणजे निजामाचा तोफखाना रणांगणाजवळ पोहोचण्याअगोदरच अडसर घालायचा. म्हणजेच शत्रूच्या सैन्याची त्याच्या तोफखान्यापासून ताटातूट करण्याची नीती! ही किमया बाजीरावांनी अद्भुत रीत्या साधली. पालखेडची लढाई हा या सर्जनशील रणनीतीचा बेजोड आविष्कार होता.

घोडदळाचा भर गतिमानतेवर असतो. ही वावटळ कोणत्या बाजूने आणि केव्हा धाड घालेल, याची बाजीरावांच्या शत्रूला सदैव धास्ती वाटे. कोणताही लवाजमा आणि अवजड सामान नसल्याने आपल्या योजना शत्रूच्या हालचालींनुसार किंवा लढाईच्या धावत्या परिस्थितीनुसार बदलण्याची लवचीकता त्यांना उपलब्ध होती. त्याचबरोबर शत्रूचा पराभव संरक्षणात्मक पवित्र्याने नव्हे, तर आक्रमक चालीनेच होऊ शकतो, यावर बाजीरावांचा दृढ विश्वास होता. अशा प्रकारे गतिमानता लवचीकता  आणि आक्रमकता  हे त्रिसूत्र बाजीरावांच्या सामरिक नीतीचा आणि कारवाईचा आत्मा होता.

बाजीरावांनी आखलेल्या युद्धयोजनेचे दोन पैलू होते. निजामाच्या सैन्याला आपला पाठलाग करावयास लावून स्वराज्याबाहेर दूरच्या मुलखात न्यायचे, त्याचे सैन्य दमल्यावर आपल्या निवडीच्या जागी त्याला घेरायचे आणि लढाईत त्याला पराजित करायचे. या कारवाईची धुरा बाजीरावांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. दुसरीकडे, आधीपासूनच आपल्या अनुपस्थितीत नाशिकपासून दक्षिणेकडील स्वराज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी बंधू चिमाजीआप्पांवर त्यांनी सोपविली होती. त्यासाठी शाहू महाराज आणि दरबार तात्पुरता पुरंदर किल्ल्यावर हलविण्यात आला होता. त्यांच्या संरक्षणासाठी पुणे परिसरात शिंद्यांच्या तुकडीला तैनात करण्यात आले होते. जुन्नर, पेडगाव, पाटस, खेड वगैरे मुलखांचे संरक्षण त्यांनी चिमाजीआप्पांवर सोडले होते. काही झाले तरी शत्रू पुरंदरवर कधीही हल्ला करू शकणार नाही, याची तजवीज करण्याचा दोन्ही बंधूंनी निर्धार केला होता.

युद्धपूर्व हालचाली : सुरुवातीचे डावपेच : जुलै-ऑगस्ट १७२७ मध्ये ऐवजखानाने सिन्नरवर हल्ला केल्यानंतर हालचालींना आरंभ झाला. जून ते सप्टेंबर १७२७ मध्ये निजामाच्या सैन्याचा तळ धरुर भीरमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये निजामाने भीरपासून साताऱ्याच्या दिशेने आगेकूच केली. बाजीरावांनी लागलीच गाजावाजाने औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले. नंतर पारनेर आणि अहमदनगर उजवीकडे सोडून ते पुणतांब्याला पोहोचले. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली आणि पूर्वेकडून वळून निजामाच्या हद्दीतील जालन्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बऱ्हाणपूरवर चाल करण्याची त्यांनी खोटी बतावणी केली. बऱ्हाणपूर त्या काळचे महत्त्वाचे व्यापार आणि दळणवळणाचे केंद्र होते; परंतु बऱ्हाणपूरला न जाता बाजीराव डिसेंबर १७२७ मध्ये वाशिममध्ये दाखल झाले आणि ‘चौथ’ गोळा केला. बऱ्हाणपूरच्या दिशेने बाजीराव जात आहेत, हे ऐकून निजामाचे धाबे दणाणले आणि त्याने आपले सैन्य बऱ्हाणपूरकडे वळविले. बाजीरावांना हेच अपेक्षित होते. त्यांनी वाशिम सोडले आणि मंगळूर-माहूर मार्गे वायव्येच्या दिशेने चोपडाला पोहोचून तापी नदी ओलांडली. १८ डिसेंबर १७२७ रोजी ते काकरमुडाला पोहोचले. नंतर बावापीर गंदोडला नर्मदा पार करून त्यांनी भडोचकडे आपला मोर्चा वळवला. हे कळल्यावर निजामाने दिशा बदलून भडोचच्या दिशेने आगेकूच केली. संथ चालीने मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या सैन्याने काही अंतरच कापले होते, तेव्हा बाजीराव गुजरातमधील छोटा उदयपूरजवळ पोहोचल्याची बातमी त्याला कळाली. एव्हाना १७२८चा जानेवारी उजाडला होता. गेले तीन महिने कूर्म गतीने चालणारे निजामाचे अगडबंब सैन्य पार थकून गेले होते. बाजीरावांचा पाठलाग करण्याची आपली चूक निजामाला कळून चुकली होती. आता बाजीरावांना परतण्यास भाग पाडण्याचा निजामासमोर एकच उपाय होता, तो म्हणजे पुण्यावर हल्ला करण्याचा.

निजामाने ‘पिछेमुड’ करून पुण्याचा रस्ता धरला. शिवाय निजामाला गुजरातचे वावडे होते; कारण तिथला मोगलांचा सुभेदार सरबुलंदखान हा निजामाचा कट्टर प्रतिस्पर्धी. निजाम त्याच्या मुलखात जाणे टाळेल, हे चाणाक्ष बाजीराव जाणून होते. निजामाचे सैन्य जुन्नर, उदापूर, नारायणगड, औसेरी, खेड जिंकून पुण्याला पोहोचले. ८ जानेवारी १७२८ रोजी निजामाच्या पुढाकाराने संभाजी महाराजांच्या लग्नाचा समारंभ पुण्याला झाला. निजामाची अपेक्षा होती की, बाजीराव घाबरून पुण्यास परततील; परंतु बाजीरावांचा चिमाजीआप्पांवर पूर्ण भरवसा होता. निजामाला पुन:श्च चालता करण्यासाठी बाजीरावांनी आपला मोर्चा निजामाची पूर्व राजधानी औरंगाबादकडे वळविला. ते तातडीने खानदेशात पोचले आणि १४ फेब्रुवारी १७२८ रोजी मराठा सैन्य धुळ्याजवळील बेलवाडला धडकले.

बाजीरावांच्या औरंगाबादवर हल्ला करण्याच्या मनसुब्यामुळे निजाम हबकला आणि त्याने पुणे सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. १२ फेब्रुवारीला तो अहमदनगरला पोहोचला. बाजीरावांना हेच पाहिजे होते. निजाम गोदावरी ओलांडण्याच्या दिशेने येत आहे, हे पाहून पालखेडमध्ये सापळा लावण्याचे बाजीरावांनी ठरविले. गेल्या चार महिन्यांच्या बाजीरावांच्या अथक परिश्रमापश्चात दिशाहीन भटकंतीनंतर दमले-भागलेले निजामाचे सैन्य मराठ्यांनी लावलेल्या जाळ्याकडे वाटचाल करीत होते. पालखेडची रणदुंदुभी गर्जू लागली.

मराठा सैन्य : मराठा सैन्य स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेल्या शिलेदारांचे होते. पंचवीस ते तीस हजार संख्येच्या बाजीरावांच्या सैन्यात बहुसंख्य घोडदळ होते. वाटेत मिळेल ते खाऊन ते आपला गुजारा करत. त्यामुळे शिधा आणि राहुट्यांचे ओझे त्यांच्याजवळ नसे. घोडेस्वाराच्या वैयक्तिक गरजा घोड्याच्या पाठीवरच असत. त्यायोगे गतिमानता आणि चपळता त्यांच्या अंगी बाणली जात असे. परंतु मराठा सैन्याची प्रमुख उणीव म्हणजे तोफखाना. तोफखान्याच्या उणिवेमुळे त्यांच्या गतिक्षमतेत जरी भर पडत असली, तरी मोगलांच्या जंगी तोफांपुढे मराठा सैन्याला कच खावी लागण्याची शक्यता होती.

नेतृत्व : बाजीरावांचे नेतृत्व कणखर, चतुर आणि सैन्याचे मनोबल उंचाविणारे होते. आपल्या सैनिकांत मिळूनमिसळून राहण्याने सैनिकांमध्ये निष्ठा आणि भरोसा निर्माण होत असे. सैन्याच्या तुकड्यांचे सेनापती सामान्य शिलेदारांमधून त्यांच्या गुणांची पारख करून निवडलेले होते. सैन्यात विलक्षण एकसूत्रता होती.

निजामाचे सैन्य : निजामाच्या सैन्याची संख्या लाखाच्या घरात होती. संख्याबलात आणि शस्त्रबलात श्रेष्ठ असूनही इच्छाबलात मात्र मराठ्यांच्या तुलनेत ते कमी होते. पैशाच्या मुबलकतेमुळे सुखलोलुपता अंगी भिनली होती. तसेच धनधान्य आणि इतर गरजा जनावरांवर लादून नेण्याच्या प्रथेमुळे त्यांच्या सवयी ऐषारामी होत्या आणि गतिमानता कमजोर होती. लढाऊ दलाच्या मानाने त्यांच्या साहाय्यदलाचा आकार अवजड असायचा (). मोगलांचा तोफखाना मात्र बलाढ्य होता आणि योग्य लक्ष्य लाभल्यास केवळ तोफांकरवीच शत्रूचा विध्वंस साधून विजय प्राप्त करण्याची त्यांच्यात क्षमता होती. परंतु बोजडपणामुळे आणि अवाढव्यपणामुळे मोगल सैन्यात एकसूत्रता, गतिमानता आणि लवचीकता यांचा पूर्ण अभाव होता.

नेतृत्व : निजाम-उल-मुल्क हा मोगल सेनापती एक कर्तबगार तुराणी होता. हा कावेबाज, कुटिल, शूर आणि कसलेला सेनानी होता. परंतु लढाईच्या मैदानावर आघाडीच्या सैन्यापासून निजाम खूप मागे असे आणि डावपेच त्याच्या सेनादलांतील नेते वापरीत असत. त्यामुळे लढाईच्या आघाडीवर निर्णयामधे विलंब होत असे. बहुसंख्य सैन्य मराठा सरदारांचे असल्यामुळे सैनिक निजामाशी निष्ठावान नव्हते.

रणभूमी : भौगोलिक विश्लेषण : समुद्रसपाटीपासून १६०० फूट उंचीवर असलेल्या पालखेडचे क्षेत्र मैदानी होते. गोदावरी नदी नैऋत्येला १५ मैलांवर असून तिथून जवळच प्रवरा नदी तिला मिळते. प्रवरेत मुठेचे पाणी येते. त्यामुळे गोदावरीचे पात्र रुंद, मुबलक पाण्याने भरलेले. ती ओलांडण्याची एकच जागा म्हणजे पुणतांबे. पालखेडच्या आग्नेयेस आणि पूर्वेच्या दिशेने शिवनाला ती वाहत असे. पालखेडच्या सान्निध्यातील पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्रोत होता. उत्तरेला प्रदेश चढत जात होता आणि २५ मैल दूर २२०० फूट उंचीवर घनदाट अरण्य होते. ते पार करणे कठीण होते. उत्तरेस अरण्य, पूर्वेस शिवनाला आणि दक्षिणेस गोदावरी अशा सर्व बाजूंनी अडथळ्यांनी वेढलेले पालखेडचे रणांगण बाजीरावांच्या डावपेचांना पूरक होते.

लढाईचा आराखडा : बाजीरावांच्या रणनीतीचे तीन प्रमुख घटक होते. त्यांच्या अनुमानानुसार निजामाच्या अगडबंब सैन्याला गोदावरी पार करण्यास तीन दिवस लागणार होते. पहिल्या दिवशी पाहणी आणि योजनेसाठी आघाडीच्या तुकड्या गोदावरी पार करून येणे अपेक्षित होते, दुसऱ्या दिवशी प्रमुख सेना, काही रसद आणि बाजारबुणगे आणि तिसऱ्या दिवशी तोफखाना आणि अवजड रसद. तोफखान्याला निजामाच्या इतर सेनेपासून वेगळे करण्याचा बाजीरावांचा मुख्य डाव होता. तोफखाना हे मोगलांचे प्रमुख अस्त्र होते. त्याला गोदावरी ओलांडण्यासच मज्जाव केला, तर त्यांचे हे युद्धविजयी अंगच निकामी होणार होते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सेना गोदावरी ओलांडून सापळ्यात आल्यावर पुणतांब्याची ओलांडण्याची जागाच आपल्या तुकडीद्वारे गोठवून टाकली की, १५ मैल दूर असलेला तोफखाना कुचकामी होईल, हा रणनीतीचा पहिला घटक होता.

दुसरा घटक निजामाची रसद तोडणे, हा होता. निजामी सैन्याचा शिधा आणि सामान गाढवांवर लादलेले असे. हा घोडे-गाढव चमू पालखेड रणक्षेत्रात आला की, रात्री गनिमी हल्ला करून त्यांना चारी दिशांना पळवून लावायचे आणि रसद व त्याबरोबर जनावरांच्या वैरणीची धूळधाण करायची, हा डावपेच.

तिसरा घटक म्हणजे शत्रूला पाण्याविना मारायचे. शिवनाल्याला तसे फेब्रुवारीमध्ये पाणी कमीच. विहिरीही कोरड्या. गोदावरी आणि शिवनाल्यावर शत्रुसैन्याला पाण्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, हा तिसरा कावा. निजामाच्या सैन्याचा शिधा आणि पाणी अडवले तर निजाम शरण येईल, याची बाजीरावांना खात्री होती. उत्तरेकडे अरण्य आणि दक्षिणेकडे गोदावरी याची पूर्णत: नाकेबंदी केली, तर त्यांचे मार्गच खुंटतील, हे निश्चित होते.

पालखेडची लढाई आणि तह : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस पालखेडमध्ये बाजीरावांच्या सैन्याची मोर्चाबंदी पूर्ण झाली होती. पूर्वेस बाजीराव, उत्तरेस पिलाजी जाधव, पश्चिमेस मल्हारराव होळकर आणि दक्षिणेस दवाजी सोमवंशी असे मांडणीचे स्वरूप होते. १७ फेब्रुवारी १७२८ या दिवशी निजामी सैन्याचा अग्रभाग धापा टाकत पुणतांब्याला पोहोचला. १८ फेब्रुवारीला निजामाने स्वतः गोदावरी पार केली. १९ आणि २० फेब्रुवारीला उरलेले सैन्य, जनावरे आणि जनाना पार झाले. आता फक्त गोदावरीच्या उतारापासून चार-पाच मैलांवर असलेला तोफखानाच पार होणे बाकी होते.

पुणतांबे ओलांडण्याची जागा २१ फेब्रुवारीला बाजीरावांच्या सैन्याकडून गोठविली गेली. तोफखान्याला तिथे पोहोचणे दुरापास्त झाले. शिवनाल्यावर पाणी आणण्यास गेलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संध्याकाळी रसदीच्या घोडे-गाढवांवर अचानक वावटळीसारखा हल्ला झाला आणि जीव वाचविण्यासाठी निजामाचे सैन्य चारी दिशांत सैरावैरा धावले. रात्री-अपरात्री सैन्याच्या तुकड्यांवर गनिमी हल्ले चालू झाले. २५ फेब्रुवारीपर्यंत मराठ्यांचा वेढा घट्ट झाला. निजामाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडू लागली. निजामाला बाजीरावांसमोर गुडघे टेकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. त्याने ऐवजखान आणि चंद्रसेन जाधव यांना बाजीरावांबरोबर सामोपचाराची बोलणी करण्यास धाडले. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे तहावर सह्या झाल्या. त्यातील १७ कलमे शतप्रतिशत शाहू महाराजांना अनुकूल होती. दक्षिणेतील सहा सुभ्यांचा चौथ व सरदेशमुखी, निजामाने काबीज केलेल्या गावांची मालकी आणि संभाजी महाराजांची कृष्णा, घटप्रभा प्रदेशाला संमती यांचा त्यात समावेश होता.

रक्ताचा थेंब न सांडता निजामाच्या प्रचंड सैन्याला शरण आणणे हा बुद्धी, मुत्सद्देगिरी आणि शक्तीचा अद्वितीय संगम होता. म्हणूनच फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या स ग्रंथात 
 Aपालखेडचा अग्रभागी समावेश केला आहे. या संग्रामामुळे मराठ्यांचे परंपरागत गनिमी युद्धतंत्र श्रेष्ठ आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.

– 

——————————-


तो फक्त २५वर्षांचा तरुण सेनापती होता. त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट वर कसलेला सेनापती. त्या तरुण विराकडे सैन्य फक्त २५,०००आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५०तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.
नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.
अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरूण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले.
अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तो ही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱयांना ही लढाई *Strategic Planning* चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

*25 फेब्रुवारी 1728* – *पालखेडची लढाई*

तो बलाढ्य शत्रू :- निजाम उल मुल्क वय : 57,

ते तरुण वादळ :- *श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे* वय : 28 फक्त







     

———————————-



उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात* आणि २० वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत, एकही लढाई न हरता ४१ लढाया जिंकून, हिंदवी स्वराज्य वाढवणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे (बल्लाळ बाळाजी भट) ह्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
* जन्म: १८ ऑगस्ट १७००, मृत्यू: २८ एप्रिल १७४०
फोटो: १) शनिवार वाड्यासमोरील थोरल्या बाजीरावांचे शिल्प (वर दिला आहे) २) इ.स. १७६० मधल्या हिंदुस्थानचा नकाशा (हिंदवी स्वराज्याचा विस्तार फिकट पिवळ्या रंगात दाखवला आहे)
– 



पंतप्रधान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती !!!
मराठा साम्राज्यास भारतात प्रतिष्ठा दिली त्या बाजीराव पेशव्यांची आज जयंती (१ ८ ऑगस्ट १ ७ ० ० ) कारकिर्दीत ४ १ लढाया केल्या त्यात एकातही हार नाही . General Montgomery व Grantt Duff या दोन ब्रिटीश लेखकांनी बाजीराव पेशव्या बद्दल बरेच लिखाण केले आहे .
दिल्लीकरांना महाराष्ट्राची गरज बाजीरावापासूनच पडू लागली . सध्या मात्र चित्र उलटे झाले आहे . नादीरशहाने आक्रमण करताच बादशाहने बाजीरावाची मदत मागीतली .परन्तु बाजीराव नर्मदा ओलांडायचे आताच लूट करून नादीरशहा परत गेला. बाजीरावास बहुधा उष्माघात किंवा विषम ज्वर झाला असावा . त्यातच त्याचा अंत झाला . नर्मदा तिरावर रावेरखेडा येथे त्याची समाधी नर्मदा प्रकल्पात बाधित होत असल्याने गुजरात सरकार आता त्याची नव्याने बांधणी करणार आहे
वास्तविक धनगर समाजातील मल्हारराव होळकर ,तसेच सामान्य मराठा कुटुंबातील सध्याच्या ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे,बडोदा येथील गायकवाड , देवासचे उदाजी पवार यांना पेश्व्यानीच त्यांचे अंगची धडाडी ,चातुर्य ,व्यवस्थापन कौशल्य पारखून मुलखाची जबाबदारी सोपविली व त्यांनी ती सार्थ केली . मस्तानी सारख्या आंतरधर्मीय स्त्री बरोबर विवाह करून सेकयुलर असल्याचा दाखलाही दिला परंतु समाजसुधारकांच्या यादीत बाजीरावाचे नाव नाहीच त्याच्या पराक्रमाची दखलही कोणी घेत नाही. पुण्यातील बाजीराव रस्ता सोडला तर त्यांचे नावे शाळा कॉलेज ,काही नाही निदान त्यांचे नावे सैनिक स्कूल तरी व्हावे .

झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मुळावर घाव घालणे हि बाजीरावाची रणनीती होती
महाराष्ट्रात त्याची आठवण कोणास नसो पण क्षात्र तेजाने तळपणाऱ्या या आपण अभिवादन करु.
* कसे जाल बाजीरावाचे समाधीकडे
मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर इंदूर ट्रिपचे वेळी बाजीराव समाधीस जरूर भेट द्या
रावेर खुर्द किवा रावेरखेडी येथे जाणेसाठी सनावद्वारून कटोरा मार्गे चांगल्या रस्त्याने जाता येईल मधेही रस्ते आहेत पण माहितीकारून मगच जावे खरगोन किंवा मंडलेश्वर कडूनही माहेश्वरचे बाजूने नर्मदेच्या दक्षिण तीरावर जाता येईल
.रावेर बाजीराव स्मृती ,ओंकारेश्वर . मांडू (राणी रूपमती ) ,उज्जैन(महांकालेश्वर ), बाघ गुंफा(पेंटीग्ज ) ,माहेश्वर (नर्मदा घाट ),इंदूर (खवैयांची नागरी ) ,धार हि मराठमोळी ठिकाणे हे सर्व एकाच ट्रीप मध्ये होईल
खाली हिंमतबहादूर श्रीमंत जितेंद्रसिह गाईकवाड बडोदा समाधीस्थानी

बाजीरावपेशवे यांचे जन्मस्थान
डुबेरे गावचा बर्वे वाडा – बाजीरावाचे जन्‍मस्‍थान
(चंद्रशेखर बुरांडे यांचा लेख ) —- श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील पानावरून साभार

थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले.

मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदीआहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत.

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चपखलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.

वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला ‘भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.

युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;
साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.



पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली 



श्रीमंत बाजीराव पेशवे

18 ऑगस्ट 1700 – 28 एप्रिल 1740

अजिंक्य
अजिंक्य सेनानायक श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा आज जन्मदिवस . त्यांच्या प्रेरणादायक स्मृतीस विनम्र अभिवादन !!

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी दि.17 एप्रिल 1720 रोजी बाजीराव बाळाजी भट उर्फ बाजीराव बल्लाळ पेशवेपदी विराजमान झाले . हिंदू पद पातशाही आणि हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायम अपराजित राहिलेले अजिंक्य सेनानी श्रीमंत बाजीराव पेशवे .

2 एप्रिल 1720 रोजी बाजीरावांचे तीर्थरूप , पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या दुःखद निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे चिरंजीव बाजीराव यांची पेशवे पदावर नियुक्ती केली . त्यानंतर पेशवेपद वंशपरंपरागत भट घराण्याकडे राहिले . बाजीराव मृत्यूपर्यंत पेशवेपदी राहिले . मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे बहुमोल कार्य बाजीरावांनी केले . आपल्या पेशवेपदाच्या करकीर्दीत बाजीराव एकही लढाई हरले नाहीत . ब्रिटिश फिल्ड मार्शल बर्नार्ड माँटगोमेरी – ” Bajirao was possibly the finest cavalry general ever produced by India . ”

बाजीरावांचा जन्म दि.18 ऑगस्ट 1700 रोजी चित्पावन ब्राह्मण भट घराण्यात झाला . श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे ते सुपुत्र . त्यांचे कनिष्ठ बंधू चिमाजी अप्पा हे ही त्यांच्या सारखेच पराक्रमी होते . बाजीराव आपल्या वडिलांच्या लष्करी मोहिमेत सामील होत असत . मुघल सत्ता उखडून टाकून अखंड हिंदुस्थानात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा ते बाळगून होते . ढासळत्या मुघल साम्राज्याला आक्रमकपणे धक्का देऊन नेस्तनाबूत करण्याची मनिषा ते बाळगून होते . हल्ला , हल्ला मुळांवर सारखा हल्ला करीत रहा म्हणजे कितीही विशाल असला तरी तो वृक्ष कोसळतोच हे त्यांचे तत्त्व होते .

पेशवेपदी नियुक्त झाल्यावर बाजीरावांसमोर खडतर आव्हाने उभी होती . तरुण वयात झालेल्या त्यांच्या पेशवेपदी नियुक्तीमुळे नारो राम , अनंतराम सुमंत , श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांसारखी ज्येष्ठ मंडळी नाराज होती . आपल्या सारखेच तरुण आणि धडाडीचे योद्धे मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे आदिंना त्यांनी हाताशी धरून त्यांना मराठा साम्राज्याच्या विस्तारात सहभागी करून घेतले . तेव्हा ही सर्व मंडळी विशीतले तरुण होते .

मोगलांचा वजीर निजाम उल मुल्क असफ जहाँ दक्षिणेत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करून दख्खनवर प्रभुत्व मिळविण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांसमोर नव नवीन आव्हाने उभी करत होता .

नवीन ताब्यात आलेल्या माळवा व गुजरातची घडी बसवायची होती .

सिद्दीचा जंजिरा या सारखे मराठा साम्राज्यातले प्रांत जरी मराठा साम्राज्यात असले तरी त्यावर पेशव्यांचे पूर्ण नियंत्रण नव्हते .

आपल्या कारकीर्दीत बाजीराव या सर्व आव्हानांना पुरून उरले . वयाच्या केवळ चाळीसाव्या वर्षी दि.28 एप्रिल 1740 रोजी या महान सेनानायकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .

बाजीराव सहा फूट उंच होते . तेजस्वी पण सतत रणांगणात असल्यामुळे रापलेली कांती बाजीरावांना शोभून दिसत असे . पांढरे शुभ्र आणि फिक्या रंगाचे कपडे त्यांना पसंत होते . संपूर्ण सेनेला त्यांनी आपल्या करड्या शिस्तीत ठेवले होते . त्यांच्या विरश्रीयुक्त भाषणांनी सैन्यात उत्साहाची लाट पसरत असे .

त्यांची पालखेडची लढाई हे युद्धशास्त्रातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे . अमेरिकन सेनेत ते रोल मॉडेल आहे आणि त्या धर्तीवर सैनिकांना युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जाते .

अटक पासून कटक पर्यंत भगवा फडकवायचा आणि भारतवर्षात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे युगपुरूष शिवाजी महाराजांचे स्वप्न बाजीरावांनी बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरवले होते .

तरुण तडफदार बाजीरावांनी तीन दिवस दिल्लीला ओलीस धरले होते . लाल किल्ल्यातून बाहेर पडण्याची मुघल बादशहाची हिंमत झाली नाही . औरंगजेबाचा नातू दिल्लीहून पलायनाच्या विचारात होता . आपली ताकद दाखवून बाजीराव परत फिरले .

दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश कमांडर जनरल माँटगोमेरी यांनी ” हिस्ट्री ऑफ वॉरफेयर ” या आपल्या पुस्तकात बाजीरावांची मुक्त कंठाने स्तुती केली आहे . विजेच्या चपळाईने अत्यंत तेज आक्रमणाच्या बाजीरावांच्या शैलीचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे . हे पुस्तक ब्रिटन मध्ये ‘ डिफेन्स स्टडीज कोर्स ‘ मध्ये शिकवले जाते . हीच युद्धशैली दुसऱ्या महायुद्धात ‘ ब्लिट्झक्रिग ‘ म्हणून वापरली गेली .

बाजीरावांचे युद्ध रेकॉर्ड भारतातल्या सर्व सेनानायकांपेक्षा अव्वल दर्जाचे मानले जाते . चाळीस पेक्षा जास्त लढाया ते लढले आणि एकही हरले नाहीत .

नर्मदेपार सेना घेऊन जाणारे आणि चारशे वर्षांच्या यवनी सत्तेला दिल्लीत जाऊन ललकारणारे बाजीराव हे पहिले मराठा सेनानी होते .

बाजीरावांनी गुजरात , माळवा , बुंदेलखंड जिंकले नसते आणि नर्मदा आणि विंध्य पर्वतातून येणारे सर्व मार्ग आपल्या ताब्यात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी , अकबर औरंगजेबासारख्या आक्रमकाचे विशाल सेनेसह आक्रमण अटळ होते .

आपल्या पदरच्या सेनापतींच्या शौर्याची बाजीरावांना कदर होती . इतिहासात मराठी साम्राज्याची ताकद म्हणून पुढे आलेले होळकर , शिंदे , पवार , गायकवाड आदि घराणी बाजीरावांची मराठा साम्राज्याला देणगी आहेत . ग्वाल्हेर , इंदूर , धार , देवास , पुणे , बडोदा अशी शक्तीस्थाने मराठा साम्राज्यात बाजीरावांमुळेच अस्तित्वात आली .

बाजीराव हे पहिले असे योद्धे होते ज्यांचा शिक्का सत्तर ते ऐंशी टक्के भारतावर चालत होता . मोगल साम्राज्याला त्यांनी दिल्ली आणि आसपासचा प्रदेश एवढेच सिमित ठेवले होते . बाजीरावांनी निजाम , मोगलांसह पोर्तुगीजांवरही कितीतरी वेळा मात केली होती . छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत पेशवे म्हणून संपूर्ण देशात बाजीरावांनी आपली जरब बसवली होती .

हिंदू पद पातशाहीचा सिद्धांत सर्वप्रथम बाजीरावांनी मांडला . प्रत्येक हिंदू राजाला अर्ध्या रात्री मदत करायला ते तत्पर असत पूर्ण देशाचा बादशहा एक हिंदू असावा हे त्यांचे लक्ष्य होते . बाजीरावांच्या छत्रछायेखाली बुंदेलखंडाची रियासत जिवंत होती . छत्रसालाच्या मृत्यूनंतर त्याचा एक तृतीयांश हिस्सा बाजीरावांना मिळाला .

दिल्लीवर आक्रमण ही त्यांची अत्यंत साहसी चाल होती . छत्रपती शाहू महाराजांना ते नेहमी म्हणत मोगल साम्राज्याचा पाया दिल्लीवर आक्रमण केल्याशिवाय मराठ्यांची ताकद बुलंद होऊ शकणार नाही आणि दिल्लीला तर मी कधीही आपल्या पायाशी झुकवेन

महाराष्ट्र आणि अधिकांश पश्चिम भारत बाजीरावांनी मोगल आधिपत्यातून मुक्त केला होता . नंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला . मोगल बादशहाशी बगावत केलेला निजाम दक्षिणेतील मोठी ताकद होता . कमी सैन्य असूनसुद्धा निजामाला बाजीरावांनी कैक युद्धात हरवले होते आणि त्याच्यावर अनेक अटी लादल्या होत्या . बुंदेलखंडात त्यांनी मोगल सिपाहसालार मोहम्मद बंगशला हरवले होते .

इ.स.1728 ते 1735 च्या दरम्यान बाजीराव पेशवे अगणित लढाया लढले . पूर्ण माळवा , गुजरात ताब्यात घेतला . बंगश निजामासारखे बडेबडे सिपाहसालार परास्त केले . औरंगजेबाचा बारावा वंशज मोगल बादशहा मोहम्मद शहाने बंगशला हटवून जयसिंहाला बाजीरावावर पाठवले . बाजीरावांनी त्यालाही हरवलं .

दि.12 नोव्हेंबर 1736 ला बाजीराव पेशव्यांनी पुण्याहून दिल्लीला कूच केले . आग्र्याच्या सादातवर त्यांचे आक्रमण रोखण्याची जबाबदारी होती . मल्हारराव होळकर आणि पिलाजी जाधवांची सेना यमुनेच्या दुआबात पोहोचली . त्यांना घाबरून सादातने दीड लाखांची फौज उभी केली . एका मोर्चावर एवढे सैन्य मराठ्यांकडे कधीच नव्हतं पण त्यांची रणनीती अजोड होती . रणनीतीप्रमाणे मल्हारराव होळकरांनी मैदान सोडले . बाजीरावांनी सादात खाँ आणि मोगल दरबाराला धडा शिकवण्याचा निश्चय केला . सर्व मोगल सैन्य आग्रा मथुरेत अडकले , इकडे बाजीरावांनी थेट दिल्लीवर धडक मारली . आजच्या ताल कटोरा स्टेडियमवर बाजीरावांनी आपली छावणी टाकली . दहा दिवसांचे अंतर बाजीरावांनी केवळ 48 तासात न थकता न थांबता केवळ पाचशे घोड्यांच्या साथीत पूर्ण केले . मोगल बादशहा बाजीरावांना इतक्या जवळ पाहून घाबरला . स्वतःला लाल किल्ल्यात सुरक्षित ठिकाणी कोंडून त्याने मीर हसन कोकाच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा हजार सैन्याची तुकडी बाजीरावांवर धाडली . केवळ पाचशे मर्द गड्यांसह बाजीरावांनी या सेनेचा दारुण पराभव केला . 28 मार्च 1737 हा तो दिवस होता . मराठी सत्तेच्या पराक्रमाचा तो सर्वश्रेष्ठ दिवस होता . बाजीराव तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते . पुऱ्या दिल्लीला बाजीरावांनी एक प्रकारे बंधक बनवले होते .

दिल्लीहून निजामाच्या नेतृत्वाखाली मोगलांची विशाल सेना आणि दक्षिणेतून बाजीरावांची मराठी सेना दि.24 डिसेंबर 1737 ला भोपाळ येथे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या मराठी सैन्याने मोगल सैन्याचा जबरदस्त पराभव केला . जीव वाचवण्यासाठी निजाम लगेचच तहासाठी तयार झाला . माळवा मराठ्यांच्या ताब्यात आला . खंडणी म्हणून पन्नास लाख रुपये बाजीरावांना द्यावे लागले . पुढचे अभियान पोर्तुगीजांविरुद्ध होते . कित्येक युद्धात त्यांनाही हरवून बाजीरावांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती .

बाजीराव पेशव्यांचे अल्पायुष्यात निधन झाले नसते तर अहमदशहा अब्दाली किंवा नादीरशहा डोईजड झाले नसते इंग्रज आणि पोर्तुगीज अशा पाश्चिमात्त्य सत्ता ही आपले बस्तान बसवू शकल्या नसत्या केवळ चाळीसाव्या वर्षी बाजीरावांचा मृत्यू ही भारत देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती .

छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , श्रीमंत पेशवे बाजीराव , श्रीमंत पेशवे माधवराव आपल्या दुर्दैवाने अल्पायुषी ठरले अन्यथा आज वेगळाच इतिहास दिसला असता .

आपल्या देदिप्यमान पराक्रमाने मराठा साम्राज्य अतुलनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ह्या अजिंक्य अपराजित योद्ध्यास त्रिवार मानाचा . . . 



उद्यमं साहसं धैर्यं बलं बुद्धी: पराक्रम: |
षडेते गुण सम्पन: नाम तस्य प्रतापी बाजीराव:| …… श्रीरंग घारे

बाजीराव पेशव्याने आपल्या आयुष्यात काय मिळवल

बाजीरावाच्या राजकारणांची आणि मोहिमांची फलश्रुती अशी झाली की १८व्या शतकात अख्या हिंदुस्थानात मराठ्यांचा आणि फक्त मराठ्यांचा बोलबाला होता. एका सत्तेचा अस्त झाला (मुघलांच्या) तर मराठ्यांच्या सत्तेचा उदय झाला. लाल किल्ल्यावर भगवा ध्वज लागत होता, शिवाजी महाराजांचं स्वप्न अंशत: पूर्ण झालं. कलकत्ता (आता कोलकाता ) हे शहर खंदकाचं शहर म्हणून ओळखलं जात होतं, हा खंदक मराठ्यांसाठी म्हणजे मराठ्यांपासून सुरक्षा म्हणून खणला होता. पाटणा शहराभोवती मराठ्यांच्या भीतीनं कोट उभारला. मुघलांच्या कुठल्या राणीला किंवा खोजाला किती पगार द्यायचा हे मराठे पुण्यात बसून ठरवत होते. हे सगळं बाजीरावच्या हयातीत झालं नाही पण त्या पेशव्याने केलेल्या परिश्रमाची ही फलश्रुती होती. मुघल नाक रगडत मराठ्यांकडे आले तुम्ही आमची सुरक्षेची जवाबदारी घ्या! खरंच देव, देश अन धर्मापायीच मराठे अटकेपार गेले. घरापासून दूर १३०० कि. मी. पानिपतात लढले, पडले आणि नैराश्य व मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले. म्हणून पुन्हा सांगतो १८ व्या शतकाचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास आहे, शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्याने केलेल्या मेहनतीचे फळ आहे ते!

बाजीराव पेशवा हा एक लढवय्या, एक पंतप्रधान, एक राजकारणी, एक स्वामिनीष्ठ इमानदार सेवक होता. जस शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात फक्त स्वराज्य, स्वातंत्र्य याचाच ध्यास घेतला तसाच बाजीरावने आपल्या उण्या-पुऱ्या फक्त ४० वर्ष्याच्या आयुष्यात आणि २० वर्ष्याच्या कारकीर्तीत फक्त देश आणि देश याचाच विचार केला. आपल्या या २० वर्षाच्या कार्यकाळात ह्या पेशव्याची घोडदौड पहिली तर दात घशात जातील, सुरतेपासून तर बुंदेल खंडापर्यंत आणि कावेरीपासून तर दिल्लीपर्यंत उभ्या आयुष्यात १,७५,००० की. मी. घोडदौड करणारा हा एकमेवाद्वितीय अजिंक्य योद्धा. मोहिमेवर असताना कणसं तर कधी पिशवीतून चणे खाऊन शत्रूला पाळता भुई थोडी करणारा हा आमच्या मातीतला आमच्या हाडामासाचा एक जिगरबाज! एकदा छत्रपती शाहूला कुणीतरी विचारलं
“एका बाजूला ५०,००० ची फौज आणि दुसऱ्या बाजूला एकटा पण सशस्त्र बाजीराव पेशवा, कोणाला निवडाल?” शाहूने क्षणाचाही विलंब न करता बाजीरावाला निवडलं होतं!

बाजीरावानं दोन चार जिल्ह्यांचं विस्कळीत स्वराज्य, साम्राज्यात बदललं. मराठ्यांची घोडी एकाचवेळी कावेरीचं आणि यमुनेचं पाणी, म्हणू त्या ठिकाणी पीत होती. उभ्या हिंदुस्तानात भल्याभल्यांना बाजीरावनं आपल्या तलवारीचं पाणी पाजलं. बुंदेल खंडात बाजीरावनं चारीमुंड्या चित केलेला बंगश बाजीरावाच्या आईचा म्हणजे राधाबाईंच्या यात्रेची जवाबदारी घेतो, तिची वहाण डोक्यावर घेऊन नाचतो. बाजीरावनं दिल्लीच्या बादशहाला, दिल्लीत मराठी हिसका दाखवला होता, बादशहाच्या तोंडचे पाणी पळाले होते.

अश्या या भारत मातेच्या वीर पुत्राचे आज त्याच्या ३१८व्या स्मृती दिनानिमित्त स्मरण




१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे… हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर…. त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा! बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित होतं… पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव खरोखर किती मोठा होता हे आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा ‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

“जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!”

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले. “उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!”

ह्याला म्हणतात मराठी बाणा!

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला… आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं… इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला.. जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली… घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला!

अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल, “इधर कोई समाधी है क्या?”

” सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?” असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली! कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,
“ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?” रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली… ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम… जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत! सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील! अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला…. सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा हाच तो…… बाजीराव! गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती! कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!……..असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन! डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!! आता काय करायच ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू! असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली! आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो! आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणून देखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली !

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, “पेशवा बाजीराव की समाधी कहा है?” असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही गोष्ट घडली खरी! असो! मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, “इधर कोई समाधी है क्या?”
“मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!”, असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब! नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, ” दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?”
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले…. “समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो…..”

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!! पेशवा सरकार! पेशवा सरकार!!! इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य! मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या! ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी…….
“अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?” असे प्रश्न विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे ! मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते! शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान? कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा…. पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो! परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’! बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत होते….

पेशवा सरकार! पेशवा सरकार!! पेशवा सरकार!!!


पेशवा सरकार!





 
थोरले बाजीराव



त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४ १ लढाया केल्या त्यात एकातही हार नाही तसेच “”दिल्ली दरबारी ज्या व्यक्तीने महाराष्ट्रास प्रतिष्ठा दिली त्या थोरले बाजीराव पेशव्यांची आज पुण्यतिथी(२ ८ एप्रिल १ ७ ४ ० )

**ब्रिटिश जनरल मॉंटगोमेरि General Montgomery यांनी थोरले बाजीराव यांचे बद्दल बरेच लिखाण केले आहेव त्यांच्या युद्धनितीचे वर्णन केले आहे .
१७व्या शतकात दिल्लीकरांना महाराष्ट्राची गरज बाजीरावांचे पासूनच पडू लागली . सध्या मात्र चित्र उलटे झाले आहे .
नादीरशहाने आक्रमण करताच बादशाहने बाजीरावाची मदत मागीतली .परन्तु बाजीराव नर्मदा ओलांडायचे आताच लुट करून नादीरशहा परत गेला. बाजीरावास बहुधा उष्माघात किंवा विषम ज्वर झाला असावा . त्यातच त्याचा अंत झाला .
नर्मदा तिरावर रावेरखेडा येथे त्याची समाधी नर्मदा प्रकल्पात बाधित होत असल्याने गुजरात सरकार आता त्याची नव्याने बांधणी करणार आहे
वास्तविक धनगर समाजातील मल्हारराव होळकर ,तसेच सामान्य मराठा कुटुंबातील सध्याच्या ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे,गायकवाड ,उदाजी पवार यांना पेशव्यानीच पुढे आणले आहे. मस्तानी सारख्या आंतरधर्मीय स्त्री बरोबर विवाह करून सेक्युलर असल्याचा दाखलाही दिला परंतु समाजसुधारकांच्या यादीत बाजीरावाचे नाव नाहीच त्याच्या पराक्रमाची दखलही कोणी घेत नाही. पुण्यातील बाजीराव रस्ता सोडला तर त्यांचे नावे शाळा कॉलेज ,काही नाही निदान त्यांचे नावे सैनिक स्कूल तरी व्हावे . 

“”””झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मुलावर घाव घालणे हि बाजीरावाची रणनीती होती “”””
महाराष्ट्रात त्याची आठवण कोणास नसो पण क्षात्रतेजाने तळपणाऱ्या बाजीरावांना शतश प्रणाम 

– श्री.माधव विद्वांस यांनी १४ विद्या ६४ कला या संस्थळावर दिलेला लेख … फेसबुकवरून साभार दि. २८-०४-२०१९

***************************************

बाजीरावाचे समाधीकडे कसे जाल ?



मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर इंदूर ट्रिपचे वेळी बाजीराव समाधीस जरूर भेट द्या .
रावेर खुर्द किवा रावेरखेडी येथे जाणेसाठी सनावद वरून कटोरा मार्गे चांगल्या रस्त्याने जाता येईल मधेही रस्ते आहेत पण माहिती काढून मगच जावे खरगोन किंवा मंडलेश्वर कडूनही माहेश्वरचे बाजूने नर्मदेच्या दक्षिण तीरावर जाता येईल .
रावेरखेडा बाजीराव स्मृती , ओंकारेश्वर, मांडू (राणी रूपमती ) , उज्जैन(महांकालेश्वर ), बाघ गुंफा(पेंटीग्ज ) , माहेश्वर (नर्मदा घाट ), इंदूर (खवैयांची नागरी ), धार हि मराठमोळी ठिकाणे हे सर्व एकाच ट्रीप मध्ये होईल
मार्ग दक्षीणेकडून कडून <>खंडवा –सनावद– बेदीया –भोगावनिपाणी –रावेरखेडा
मार्ग उत्तरेकडून <>माहेश्वर –कासारवड –बेदीया –भोगावनिपाणी –रावेरखेडा



हर हर महादेव 


श्रीमंत बाजीराव साहेब पुण्यतिथी (२८ एप्रिल १७४० )

छत्रपती शाहू महाराजांनी १७२० साली पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या १९ वर्षाच्या ज्येष्ठ पुत्रास म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांस पेशवे पदावर नियुक्त केले. पेशवे पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पुढील वीस वर्षे बाजीराव साहेबांनी मराठा साम्राज्याचा विस्तार सबंध हिंदुस्तानभर वाढवला. अत्यंत प्रभावशाली व्यक्तित्व, जन्मजात नेतृत्वशक्ती, अद्भुत रणकाैशल्य, अदम्य साहसी वृत्ती, इ. सर्व अंगीभूत गुणांमुळे बाजीराव साहेबांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून मराठा साम्राज्याची ओळख निर्माण केली, दरारा निर्माण केला. आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एक हि युद्धं न हारलेला एकमेव अपराजित योद्धा, सेनानी अशीच त्यांची ओळख होती अन ती आज हि कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारा हा मराठा साम्राज्याचा महान पराक्रमी पेशवा २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदाकाठी रावेरखेडी येथे परलोकीच्या प्रवासाला कायमचा निघून गेला.
”आम्ही तो थोरल्या आबासाहेबांचे पाईक” असं श्रीमंत बाजीराव साहेब म्हणत असत अन तसंच ते जगले.

हिंदुस्तानच्या या महान सुपुत्रास व मराठा साम्राज्याच्या या एकमेवाद्वितीय अपराजित महापराक्रमी प्रधानपंतास मन:पुर्वक अभिवादन … मुजरा 


”तुझे तेज अंगी शतांशी जरीही, उजळून टाकू दिशा दाही दाही” हिच एकमेव प्रार्थना श्रीमंत बाजीराव साहेबांच्या चरणी. 







उत्तर लिहिले · 25/7/2021
कर्म · 121765
0
पुणे
उत्तर लिहिले · 15/8/2022
कर्म · 0
0

थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी येथे आहे.

अधिक माहिती:

  • बाजीराव पेशवे (जन्म: १६ ऑगस्ट १७०० - मृत्यू: २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी होते.
  • त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
  • रावेरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठी त्यांची समाधी आहे. याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620

Related Questions

भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
जटायु मंदिर कोठे आहे?
काशी विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल माहिती सांगा?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या जागेचे नाव काय?
भारतातील धबधबे कोणते आहेत?
औरंगाबाद विषयी सर्व माहिती मिळेल का?