2 उत्तरे
2
answers
जलकंठेश्वर मंदिर वेल्लोर बद्दल माहिती द्यावी?
3
Answer link
जळकंठेश्वर मंदिर, वेल्लोर







लंडन चे ब्रिटिश म्युझियम म्हणजे अलीबाबा ची गुहाच. जगाच्या काना कोपऱ्यातून चोरून आणलेल्या मौल्यवान वस्तूंचे निर्लज्ज पणे मांडलेले प्रदर्शन. भारताचा वारसा ही या दरोड्यातून सुटलेला नाही. बऱ्याच देवांच्या मूर्ती राजरोसपणे त्या म्युझियम मध्ये आपापले अंग चोरून आणि भारतीयांच्या नाकर्तेपणाची साक्ष देत बसलेल्या दिसतात.
तामिळनाडू च्या बाहेर फारसे परिचित नसलेले एक मंदिर. ह्या मंदिराचा एक मंडप इतका सुंदर, की ईस्ट इंडिया कंपनीचा एक गव्हर्नर त्याच्या अद्भुत सौंदर्याने संमोहित झाला. त्याने ती अक्खी इमारतच सुटी (मराठीत डिसमेंटल) करून लंडन ला न्यायची ठरवली. सायबाचे काम म्हणजे टोटल पद्धतशीर. प्रत्येक खांब, प्रत्येक मूर्ती ला नंबर दिले गेले, इमारतीचे विविध अंगांनी नकाशे काढले गेले. आणि लंडन मध्ये असे जड आणि मौल्यवान सामान आणण्यासाठी 'पेशल' जहाज बनवले गेले, आणि ते वेळेवर तेथून निघालेही.
वरुण देवाच्या कृपेने ते जहाज बुडाले. जोपर्यंत दुसरे जहाज तयार होत होते, तोपर्यंत दक्षिण भारतातील राजकीय स्थिती बदलली होती, आणि ती लुटीची योजना स्थगित झाली ती कायमचीच. भारताचा हा मौल्यवान ठेवा केवळ नशिबानेच भारताकडे राहिला.
त्या देवळाचे नाव श्री जलकंठेश्वर मंदिर. तामिळनाडू चे वेल्लोर शहर त्याच्या भक्कम भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध. त्याच किल्ल्यात हे देवालय आपल्याला पाहण्यास मिळते. विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या चिन्ना बोम्मी नायक ह्याने हे सुंदर मंदिर सोळाव्या शतकात बांधले. देऊळ विजयनगर स्थापत्य शैलीचा एक सर्वोत्कृष्ट नमुना मानले जाते.
देवळात जाण्यासाठी दोन बलाढ्य गोपुरातून आपल्याला प्रवेश करावा लागतो. हे देऊळ शिवलिंगाखेरीज नटराज, गणपती, सुब्रमण्यम, नवग्रह अश्या अनेक देवांचे निवासस्थान आहे.
ह्याच देवळाच्या प्रांगणात आहे वेल्लोर मधील सर्वात सुंदर इमारत - देवळाचा कल्याणम मंडपम. कल्याण मंडप तीन थरांतून विभागला आहे. सर्वात वरच्या विभागात एक व्यासपीठ आहे जे एका बलाढ्य कुर्माने आपल्या पाठीवर तोलून धरले आहे. पूर्वी ह्याच व्यासपिठाचा वापर लग्न विधींसाठी केला जात असे. ते जडजंबाळ व्यासपीठ तोलून धरण्यास त्या कासवाला अष्ट दिशांचे हत्ती, दिगपाल, नाग मदत करीत आहेत.
व्यासपीठाच्या वर तीन वेढे असलेल्या कमलपुष्पाचे झुंबर पाहावयास मिळते. कमलपुष्प उलटे टांगलेले असल्याने त्याच्यावर पडणारे पावसाचे थेंब व्यासपीठावर स्थानापन्न पाहुण्यांच्या डोक्यावर पडू नयेत, म्हणून पोपट त्या पुष्पावर उलटे लगडले आहेत. उलटे लटकून ते पोपट ते थेंब ग्रहण करण्यात मग्न आहेत. पुष्पाच्या सभोवती अकरा युगुले एकमेकात हात गुंफून नाच करीत आहेत. त्याच्या भोवती आपण अष्ट दिगपाल आणि त्यांचे छत्र चामर धरलेले सेवक आपण पाहू शकतो.
मंडपाचे छत सेहेचाळीस खांबांनी तोलून धरले आहे. मंदिर प्रांगणासमोरचे खांब सोप स्टोन ने बनले असून मागील बाजूंचे खांब ग्रॅनाईट दगडापासून बनलेले आहेत. मागील बाजूंच्या खांबांवर आपणास रामायण, महाभारत, पुराणे ह्यांच्यातील निरनिराळे ज्ञात आणि अज्ञात असे प्रसंग पाहावयास मिळतात.







पुढच्या खांबांवर अविश्वसनीय अश्या कलाकृतींची गर्दी. शरभ, व्याल, मकर हे सगळे पौराणिक प्राणी. राजसत्तांचे आणि शक्तींची प्रतीके. बाहेरील आठ खांबांवर तुम्ही शरभ स्वार, व्याल स्वार आणि घोडेस्वार स्वार पाहू शकता. शरभ आणि व्यालांचे दागिने, त्यांच्यावर आरूढ होणाऱ्या स्वरांची ऐट, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांच्या सेवकांचे हावभाव, त्यांची शिरस्त्राणे, त्यांचा आवेश, सारे काही थक्क करणारे. ह्या खांबांविषयी आपण पुढच्या लेखात सविस्तर माहिती घेऊ.
विजयनगर साम्राज्यानंतर वेल्लोर किल्ल्याची मालकी बदलत गेली आणि किल्ल्याबरोबरच मंदिराच्या गर्भगृहातही अंधार पसरला. विजापूर सुल्तानांकडे सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा असे मानले जाते की मूळ शिवलिंग सथुवाचारी नावाच्या जवळच्या खेड्यात लपवून ठेवले गेले. जवळजवळ 300 वर्षे, मंदिर त्याच्या मालकाशिवाय होते. विजापूर सल्तनत ते ब्रिटीश राज पर्यंत हे सुंदर मंदिर, त्याचे मंडप, त्यातील खोल्या चक्क लष्करी चौकी, आणि हत्यारे व दारुगोळा साठवण्याची जागा म्हणून वापरले जात होते. मुस्लिमांच्या काळात बहुतेक मूर्तींचे भंजन झाले, किंवा त्या किल्ल्याच्या खंदकात टाकून देण्यात आल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल तीस वर्षांच्या अथक प्रयत्नाअंती शिवलिंग त्याच्या मूळच्या जागेवर बसवण्यात आले, ज्याचे आपण आज दर्शन घेऊ शकता.
आपण जर वेल्लोर ला गेलात, तर हे जळकंठेश्वर मंदिर म्हणजे न चुकवण्यासारखे. ते पाहून तुम्हाला तुमच्या संस्कृतीचा अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही.
ह्या जळकंठेश्वर मंदिराविषयी आणखी माहिती हवी असल्यास, मंदिराचे अजून काही फोटो पाहायचे असल्यास आपण ह्या संकेतस्थळावर पाहू शकता.
0
Answer link
जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोर
जलकंठेश्वर मंदिर हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील वेल्लोर शहरात असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर वेल्लोर किल्ल्याच्या आतमध्ये स्थित आहे.
इतिहास:
- मंदिराचे बांधकाम 16 व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात झाले.
- कालांतराने, हे मंदिर जीर्ण झाले होते.
- 1980 च्या दशकात, वेल्लोरच्या लोकांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला.
वास्तुकला:
- मंदिराची वास्तुकला विजयनगर शैलीतील आहे.
- मंदिरात उंच गोपुरम (प्रवेशद्वार) आहे.
- मंदिरात अनेक सुंदर मंडप आणि खांब आहेत.
- मंदिराच्या गर्भगृहात जलकंठेश्वर (शिवलिंग) स्थापित आहे.
- मंदिरात अनेक देवी-देवतांच्या मुर्त्या आहेत.
विशेषता:
- हे मंदिर वेल्लोर शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.
- मंदिराच्या आवारात एक मोठे तळे आहे.
- मंदिरात महाशिवरात्री आणि इतर हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
मंदिराला भेट देण्याची वेळ: सकाळी 6:00 ते रात्री 8:00 पर्यंत (वेळेत बदल होऊ शकतो)
जवळचे रेल्वे स्टेशन: वेल्लोर कटपडी जंक्शन
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: