जात व कुळे पंथ धर्म

महानुभाव हा पंथ आहे का जात?

3 उत्तरे
3 answers

महानुभाव हा पंथ आहे का जात?

7
महानूभाव पंथा बदल अधिक माहिती(संकलित) पुरवण्याचा प्रयत्न करतो....


ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभावसंप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात. महानुभाव पंथाचे मूळ पुरुष गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ हे होते परंतु या पंथाचे प्रणेते मात्र चक्रधर आहेत. चक्रधरांचा कालखंड (इ. स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. देवगिरीच्यायादवांची कारकीर्द या वेळी महाराष्ट्रात होती.

समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात चक्रधरांनी शंकराचार्य(अद्वैत) व रामानुजाचार्य (विशिष्टाद्वैत) यांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ करून (ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून) आपल्या द्वैती तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सामान्य देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्यावर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय अशा सर्वांनाच संन्यास घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन, लिंगायत, नाथ इत्यादी संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. चक्रधर आणि पुढे ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते.

●ओळख

महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाबआणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथावर भाष्य-महाभाष्य लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप श्री चक्रधरस्वामीयांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचे वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे.

यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यांनी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला ते हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात.

◆महानुभावीय तत्त्वज्ञान

‘सूत्रपाठ’ या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते, या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास ‘द्वैती पंथ’ म्हणतात. ‘देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे’ असे या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे.

●जीव : जीव बद्धमुक्त म्हणजे बद्ध असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे. तो मूलतः स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे पण अविद्येमुळे त्याला काळसरपणा प्राप्त झालेला आहे. तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात, तसा जीव हा ‘पाच पिशीं’नी युक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमळ या त्या पाच पिशी होत. यासाठी उद्धवगीतेत मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टांत दिला आहे. यांतील सर्वांत तळाचे मडके अविद्या हे आहे. हे अविद्येनेच मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील.

●प्रपंच : प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. कारणप्रपंच व कार्यप्रपंच असे त्यांनी प्रपंचाचे दोन भाग केले आहेत. अव्यक्त असणारी पंचमहाभूते व त्रिगुणी म्हणजेच कारणप्रपंच होय. कार्यप्रपंचाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम हे त्रिगुण यांच्यातून झाली आहे.

●देवता : देवतांना महानुभावांनी गौण मानले आहे. परमेश्वर हा नित्यमुक्त असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. (परमेश्वर एकु सोडविता) परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे, अथवा भक्ती केली म्हणजे, जीवाला मोक्ष मिळतो. मोक्ष परमेश्वराकडूनच मिळू शकतो. देवतांकडून नाही. देवतांचे कार्य सृष्टीतील जिवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे होय.

वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने आहेत.

महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात.

◆महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान

व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत, असे काही विद्वान मानतात. त्यांच्या मते दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला.महानुभाव समप्रदाय हा अहिसा वदि आसुन अहिसा परम धर्म हे त्याचे एक महत्वाचे तत्व आहे

◆चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक

बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते.

पहा: महानुभाव साहित्य संमेलन

आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. या संमेलनाचे अध्यक्ष महंत बाभुळगावकरशास्त्री होते

●प्रमुख महानुभावी व्यक्ती

केशिराज बास

नागदेवाचार्य

गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ

नागराजबाबा

भास्करबाबा जामोदेकर (भानुकवी)

बाभूळगांवकरबाबा शास्त्री

परसरामबास : परसरमबास हे महानुभावीय साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी लीळाचरित्राची प्रत हरवल्यावर त्याची पामाणित प्रत तयार करण्याचे काम केले.पंथातील शाखांची निर्मिती करून त्यांच्या आचार्यांना महंतपद देऊन परसरामबास यांनी पंथात एकोपा टिकवला. परसरामबास यांच्या कार्याची ओळख डॉ. भू.मा ठाकरे यांनी ’महानुभावी संशोधनाचार्य परसरामबास वाङ्‌मय आणि तत्त्वज्ञान’ या पुस्तकात करून दिली आहे.

उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 123540
1
महानुभव हा एक पंथ आहे. महानुभव हे जात नाही, ते एक प्रकारचे पंथ आहे.
उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 10
0
महानुभाव हा एक पंथ आहे, जात नाही. हा पंथ 13 व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केला.

महानुभाव पंथाबद्दल अधिक माहिती:

  • हा पंथ বেদ, উপনিষদ आणि भगवत গীতাকে মান্য করে।
  • चक्रधर स्वामी हे या पंथाचे मुख्य दैवत आहेत.
  • महानुभाव पंथाचे अनुयायी কৃষ্ণ, दत्तात्रेয়, এবং আরো কিছু দেবদেবীর পূজা করে।
  • हा पंथ महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये पसरलेला आहे.

संदर्भ:

महानुभाव पंथ - উইকিপিডিয়া

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

12 व्या शतकात अल्लामप्रभु यांनी कोणत्या संप्रदायाचा प्रसार केला?
महानुभाव पंथाचे उपास्य दैवत कोणते?
श्रीकृष्ण प्रणामी संप्रदाय काय आहे?
महानुभाव पंथाची माहिती मिळेल का?