2 उत्तरे
2
answers
धनुर्वाताची लक्षणे काय आहेत?
7
Answer link
धनुर्वात:- या रोगाचें कारण विशिष्ट प्रकारचे जंतू हें होत व ते बहुधा मातींत असतात. शेतांतील अगर बागेंतील थोडी माती जनावरांच्या शरीरांत त्वचेखालीं टोंचली तर बहुधा धनुर्वात होतो असे प्रयोग केले आहेत. कोणी मनुष्य पायगाडीवरून अगर दुसर्या कोठें पडून त्याचें अंग खरचटलें किंवा बोटास लागलें. अगर अनवाणी चालतांना ठेंच लागली तर जखमेंत जंतुप्रवेश होऊन दांतखिळी बसून पाठ ताठणें हें मुख्य लक्षण दिसून येण्यास सुरवात होते. सुईनें, टांचणीनें झालेली किती बारीक जखम असली किंवा हाड मोडून जखमेंतून दिसत आहे इतकी मोठी असली तरी जर तिला शेण, माती, धुरळा याचा संसर्ग होऊन, अगर उपजलेल्या मुलाच्या नाळीवाटेहि जंतुप्रवेश होऊन धनुर्वात होतो. बाळंतपणानंतर लागलीच, किंवा शस्त्रक्रियेनंतर अगर सुईनें क्विनाईन टोंचल्यावर स्वच्छतेच्या अभावीं हा रोग होतो. पूर्वीं हा रोग आपोआपहि होतो अशी समजूत होती. पण जखम कळेल न कळेल इतकी असल्यामुळें ही समजूत बळावली असावा. परंतु आतां या समजुतीस कोणी थारा देत नाहीं. चांगली बळकट सशक्त माणसें विशेषत: या रोगास बळी पडतात.
लक्षणें:- दांतखिळी बसून मान व पाठ ताठ होते व त्यामुळें असह्य वेदना होतात. त्याचें कारण त्या भागांतील स्नायू वरच्यावर वाताचा वेग येऊन आकुंचन पावतात. कुचल्याच्या सत्तवाचा विषार झाला असतांहि हुबेहूब अशीच लक्षणें होतात. पण मुख्य फरक हा कीं, धनुर्वातामध्यें स्नायू सदा ताठलेले असून वाताचा वेग येईल तेव्हां त्यांत ताठरपणाची व वेदनाची आणखी भर पडते. पण विषारामध्यें वेदनांचा वेग अगर झटका येऊन तो निघून गेल्यावर मध्यंतरीं शरीरस्नायू नेहमींप्रमाणें मऊ व शिथिल असतात. दु:खाची गोष्ट ही कीं, इतक्या परम वेदना होत असूनहि मेंदु व संज्ञाशक्ति शाबूत असल्यामुळें आपले स्नायू यंत्राच्या मगरमिठींत सांपडल्यामुळें आपला शक्तिपात होत जाऊन आपला मृत्यु समीप येत आहे याची पूर्ण जाणीव बिचार्या रोग्यास असते. उष्ण कटिबंधांत हा रोग विशेष झपाटयानें होतो, तो इतका कीं सकाळीं हातांत कांच शिरून जखम व्हावी व धनुर्वात होऊन रात्रीं मरावा; इतक्या तीव्रतेचे हे भेद क्वचित येथें पहाण्यांत येतात. याचें कारण येथील माती गरम असल्यामुळें तींत जंतुवृद्धि जशी झपाटयानें होते तशी ती थंड प्रदेशांतील मातीमध्यें होत नाहीं. ह्या रोगाचे जंतू जखमेंत शिरल्यावर फक्त तेथेंच वस्ती करितात. इतर कांहीं जंतूंप्रमाणें रक्तांत प्रवेश करीत नाहींत. मात्र त्यांपासून तेथें असें जलाल विष उत्पन्न तयार होतें कीं तें मज्जातंतूंच्या मार्गानें पृष्ठवंशरज्जूमध्यें प्रवेश करून शरीरांतील सर्व सिद्ध स्नायूंनां त्यांतील मज्जातंतूमुळेंच वायूचे झटके येतील अशी बाधा करतें. ही विषबाधा इतकी त्वरित होते कीं, जखम झाल्यावर तो अवयव तोडण्याच्या पूर्वींच पृष्ठवंशापर्यंत विषसंसर्ग पोंचलेला असतो व त्यापासून विषबाधा न होण्याची आशा बिलकूल नसते.
सकाळीं रोगी जागा होतांना त्यास पाठींत चमत्कारिकच वाटूं लागतें. आपली मान रात्रीं तिच्यावर वारा बसून ताठली आहे अशी समजूत प्रथम होते, त्याबरोबरच थोडया वेदना तेथें सुरू होतात. नंतर तोंड उघडतांना कांहीं अडचण पडत आहे असेंहि त्याच्या ध्यानांत येऊन आपणास जबडा उघडून ''आ'' करण्यास पंचाईत पडत आहे याची जाणीव त्यास होते. ओष्टयुगुलाचे दोन्ही कोंपरे मागें व खालीं सरकून ताठल्यामुळें चेहर्यास विकृत हास्य केल्याचें स्वरूप येतें. पुढें दांतखिळी इतकी गच्च आंवळून बसते कीं, ती उघडून पोटांत कांहीं पाण्याचा अगर दुधाचा घोंट घालणें मुष्कलीचें होतें. म्हणून खाण्याचे पातळ पदार्थ चमच्यानें गालाच्या आंतील जागेंत भरवले म्हणजे शेवटच्या दाढामागें फट असते तीकडून अन्ननलिकेंत तें अन्न जातें. यानंतर अन्ननलिकेचे स्नायू विषग्रस्त झाल्यामुळें पातळ पदार्थ गिळण्यास फार अडचण पडूं लागते. पोट, उदर यांचे स्नायू ताठल्यामुळें त्यावर हात ठेवून पाहिलें असतां आपण एखाद्या फळीवर हात ठेविला आहे किंवा काय असा भास होतो. इतकें काठिण्य स्नायूंनां येतें. हातापायांच्या स्नायूंनांहि असेंच होतें व वाताचा झटका आला म्हणजे त्यांत वांब अगर गोळा उत्पन्न होतो, व त्या गोळ्याची वेदना पराकाष्ठेची असते. यानंतर छातीच्या स्नायूंनांहि ताठरपणा येतो. म्हणजे मग शरीरांतील सर्व स्नायू अहोरात्र ताठलेले राहून जेव्हां जेव्हां धनुर्वाताचे वेदनायुक्त झटके येतात तेव्हां त्या ताठरपणांत अधिक भर पडून रोग्याचे फार हाल होतात. कधीं तर वेदना इतक्या जोराच्या येतात कीं रोगी धनुष्याप्रमाणें पुढें किंवा मागें किंवा उजव्या, डाव्या बाजूला त्यामुळें वांकडा होतो व म्हणूनच या रोगाचें धनुर्वात हें नांव पडलें आहे. झटक्याचा जोर इतका असतो कीं एखादेवेळीं एखादा स्नायू त्यामुळें तुटतोहि. झटका आला असतांना रोग्यास वेदना असह्य होऊन अंगाला घाम सुटतो व तो निघून गेला कीं रोगी अगदी थकून मृतप्राय पडतो. छातीचे स्नायू ताठल्यामुळें श्वसनक्रियाहि नीट चालत नाहीं व म्हणून त्याचा जीव फार गुदमरतो.
साध्यासाध्यविचार:- इजा अथवा जखम झाल्यानंतर एक आठवडयाच्या आंत जर वातलक्षणें दिसून येण्यास आरंभ झाला तर रोग प्राय: असाल्याच आहे असें जाणावें. दहा दिवसांनंतर लक्षणें सुरू झालीं तरीहि वरीलप्रमाणेंच रोग असाध्य समजण्यास हरकत नाहीं. परंतु जखम होऊन पंधरा दिवस, तीन आठवडे किंवा अधिक काळ लोटला असेल तर रोग साध्य आहे अशी आशा करण्यास हरकत नाहीं. सूतिकावस्था, गर्भपात, मोठाल्या जखमा, छाती, पोट यांवरील जखमा यानंतर झालेला धनुर्वात असाध्य असतो. हातापायांवरील जखमामुळें झाल्यास तो साध्य असतो.
उपचार व शुश्रूषा:- पहिलें काम जखम कोठें असेल तिचा तपास करून जंतुघ्न औषधानें तिचें शुद्धीकरण करणें हें होय. कारण या भयंकर जंतूबरोबर जखमेंत पूयवर्धक जंतूंचें मिश्रण असल्यावर जें विषसंवर्धन होईल तें अधिक बेसुमार होईल यांत शंका नाहीं. हें शुद्धीकरण यथाशास्त्र करण्यास अडचणीची जागा असेल तर तेथें चाकूनें जागा बरीचशी कापून अगर, डागून किंवा शुद्ध कारबॉलिक अॅसिडनें भाजून काढावी. नंतर रोग्यास अंधार असलेल्या जागीं स्वस्थपणें निजवून ठेवावें. त्याच्या भोंवतीं दारें, खिडक्या खडखडा वाजवून, आरडाओरड करून, एकदम लख्ख उजेड करून त्यास कटकट केल्यानें झटके अधिक वेळां येतात, व त्यांचा जोरहि प्रखर असतो. जोर फार असल्यास रोग्याच्या मानानें त्यास मार्फिया टोंचून घालावा. अगर झटक्याच्या वेळीं क्लोरोफार्म हुंगवावा. जोर फारच असेल तर तो रोज दोनदां तीनदांहि हुंगविण्याखेरीज गत्यंतर नसतें. गळ्यावाटें पातळ अन्न अगदींच जात नसल्यास गुदद्वारावाटें पातळ पदार्थ पिचकारीनें घालून रोग्याचें पोषण करावें. या रोगांत लस टोंचून घालण्याचा उपयोग होतो असें अलीकडे अनुभवास येऊं लागलें आहे. लस त्वचेखालीं अगर स्नायूंत टोंचतात. दोन्हीं प्रकारानें एकदम टोंचणंहि उपयुक्त असतें व तें लक्षणांत सौम्यता येईपर्यंत रोज सुरू ठेवावें. जखमेजवळील स्नायूंत टोंचावें. याशिवाय झटके शमन करणारीं पुढील औषधें सौम्य रोग असल्यास व मोठया प्रमाणांत दिलीं तर उपयुक्त होतात. तीं औषधें (१) क्लारेल हैड्रेट (३०-४० ग्रेन), (२) पोटयाशियम ब्रोमाइड (६० ग्रेन). हीं दोन्ही औषधें मिश्र करून दर ४-६ तासांनीं द्यावींत. (३) पोटांत अगर गुदद्वारावाटें क्लोरेटोन (१०-१५ ग्रेन) ३०-४० ग्रेन तिळाचे तेलांत विरघळवून पिचकारीनें घालावें. (४) त्याचप्रमाणें पॅराल्डीहाइड औषधाचा द्रव करून (३-५ ड्राम) त्याचा बस्ति द्यावा. जरूर तर झोपेसाठीं मार्फियाची पिचकारी वरचेवर द्यावी. पण त्यापेक्षां वरील झटके शमन करणारीं औषधेंहि झोंप आणतातच. तीं औषधें दिलीं तरी लस टोंचून रोगचिकित्सा करण्याचें रहित करूं नये.
0
Answer link
धनुर्वाताची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
हे काही धनुर्वाताची लक्षणे आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- स्नायूStubbornness (Muscle stiffness): धनुर्वातामध्ये जबड्याच्या स्नायूंची stiffness येते, ज्यामुळे जबडा उघडणे कठीण होते.
- गिळताना त्रास: घशातील स्नायूंच्या stiffnessमुळे गिळताना त्रास होतो.
- मान आणि खांद्यांमध्ये stiffness: मान आणि खांद्याचे स्नायू ताठ होतात.
- पोट आणि पाठीमध्ये stiffness: पोटाचे आणि पाठीचे स्नायू ताठ झाल्यामुळे शरीर धनुष्याप्रमाणे वाकते.
- श्वास घेण्यास त्रास: छातीतील स्नायूंमध्ये stiffness आल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
- इतर लक्षणे: ताप, घाम येणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयगती वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.
ही लक्षणे infection झाल्यानंतर काही दिवसांनी दिसू लागतात. वेळेवर उपचार न केल्यास, tetanus जीवघेणा ठरू शकतो.
हे काही धनुर्वाताची लक्षणे आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.