2 उत्तरे
2
answers
गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) बद्दल माहिती?
3
Answer link
*गुरुपौर्णिमेचे महत्व आणि माहिती:-*
@@@***@@@
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
संदर्भ : सनातन संस्थानिर्मित ग्रंथ ‘ सण,धार्मिक उत्सव व व्रते ‘
गुरु-शिष्यांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.
*गुरुपौर्णिमा विषयी माहिती*
**************************************
आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥
या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्या शिवरायांनीरामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे.
सामन्यत: गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षिस किंवा मोबदला असा समजला जातो. परंतु गुरुदक्षिणा म्हणजे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तसंच जनकल्याणासाठी त्याचा योग्य वापर. गुरुदक्षिणा गुरुप्रती समर्पण आणि सन्मान या भावनाचं प्रतिक आहे. साधकासाठी हा दिवस महत्वाचा असतो. या दिवशी कृष्ण मंदिर, दत्तमंदिर तसंच साई मंदिरात हा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. नारायणपुरच्या दत्तमंदिर आणि शिर्डीच्या साई मंदिरात भाविक मोठया प्रमाणावर गर्दी करतात, अनेक साधक मठांमध्ये आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमतात. शास्त्रीय संगीत तसंच नृत्य क्षेत्रातले कलाकार या दिवशी कार्यक्रम आयोजित करुन गुरुप्रती आदर व्यक्त करतात. प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात .
0
Answer link
गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा)
गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे जो गुरुंचे (शिक्षकांचे) त्यांच्या शिष्यांनी केलेल्या योगदानाला आदराने साजरा करतो. हा सण आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येतो.
महत्व- गुरुपौर्णिमे हा दिवस गुरु-शिष्य परंपरेचा उत्सव आहे.
- गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि नैतिक मूल्यांची शिकवण देतात.
- या दिवशी शिष्य आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.
- असे मानले जाते की या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांनी महाभारत, पुराणे आणि वेदांचे संकलन केले. त्यामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
- बौद्ध धर्मात, या दिवशी गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिला उपदेश दिला होता, त्यामुळे हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी महत्त्वाचा आहे.
- या दिवशी लोक आपल्या गुरुंची पूजा करतात, त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्या चरणी वंदन करतात.
- मंदिरे आणि मठामध्ये विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- शिष्य गुरुंच्या जीवनातील प्रेरणादायी कथा आणि शिकवणुकींचे स्मरण करतात.
- काही लोक या दिवशी उपवास करतात आणि दानधर्म करतात.
गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला आपल्या जीवनातील गुरुंचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाला ओळखण्याची संधी देतो.
अधिक माहितीसाठी: