3 उत्तरे
3
answers
मृत माणसाच्या पिंडाला कावळ्याने का शिवावे?
1
Answer link
, मृत व्यक्तिच्या पिंडाला कावळा शिवल्यानंतरच
त्याचा आत्मा मुक्त होतो, ह्या आपल्याकडील
समजुतिकडे कसे पहावे? धार्मिक भाग म्हणून
की अंधश्रद्धा म्हणून? हा प्रश्न महाराष्ट्रातील
इतक्या ठिकाणी आणि तोही भल्या भल्या लोकांनी मला विचारला आहे,
की याचे उत्तर कधीतरी द्यायला हवेच होते. हिंदू
धर्मातील हा दशपिंडी विधी. मृताच्या मुलाने
स्मशानभूमीत जाऊन संपूर्ण मुंडन करायचे.
भटजी सांगेल तो विधी करायचा. मग
मेलेल्या माणसाच्या आत्म्याला समाधान मिळावे
म्हणून चांगले जेवण पत्रावळीवर वाढायचे.
पानापासुन दूर बसायचे. कावळा चटकन
पानाला शिवाला, तर मृत व्यक्तिच्या सर्व
इच्छा तृप्त झाल्या असे मानायचे
आणि कावळा अन्नाकडे फिराकलाच नाही तर मग
मेलेल्या माणसाच्या संभाव्य अतृप्त इच्छा लक्षात
घेऊन त्याप्रमाणे कावळयातून प्रकट
होणाऱ्या आत्म्याला शब्द द्यायचा. तो पटला तर
कावळा येतो, पिंडाला टोच मारतो आणि नाहीतर
त्याची कितीही आर्जवे करा, तो शिवता शिवत
नाही. ही अंधश्रद्धा आहे हे भल्याभल्यांना पटत
नाही. त्यांचे मत असे की आजचे विज्ञान असे
मानते, की भूकंप अथवा वादळ यांची चाहुल
काही पशुपक्षांना आधीच लागते. ढिगाऱ्यातील प्रेत
माणसाला समजत नाही; पण कुत्र्याला वास येतो.
आपल्या पूर्वजांनी पशुपक्षी यांचा गाढा अभ्यास
केला होता. त्यांना कावळयाची ही अद्वितीय
शक्ति समजली असणार ! पूर्वजांनी हा शोध
लावला, तेंव्हा त्यांना कोणाला गंडवायचे नव्हते.
तेंव्हा या सगळयाचे संशोधन करायला नको काय ?
वरवर पाहता बिनतोड वाटणारा हा युक्तिवाद
किती भुसभुशीत व भ्रामक आहे, हे डोळसपणे जर
विचार करायला लागले की लगेच समजते.
घटनाक्रम पहा. किती गोष्टी गृहीत धरल्या आहेत?
नंबर १..
प्रत्येक व्यक्तीला आत्मा हा असतोच.
नंबर २..
व्यक्तिच्या निधनानंतर निदान दहा दिवस
तरी आसमंतात आत्मा तरंगत राहतो.
(किंवा स्वर्गातुन अथवा नरकातुन
दहाव्या दिवशी स्मशानात ड्यूटीला हजर राहतो)
नंबर ३..
हा आत्मा शुद्ध शाकाहारी माणसाचा असला,
तरी मेलेल्या माणसावर मजेत
टोचा मारणाऱ्या कावळयाच्या शरीरात जाण्यास
त्याला काही वाटत नाही.
(त्या आत्म्याची केवढीही इच्छा असली तरी शाकाहारी कावळा त्याला मिळणे
अशक्यच)
नंबर ४..
कावळयाच्या शरीरात
शिरलेल्या या अशरीरी आत्म्याला माणसाचा मेंदुही लाभतो.
कारण त्याशिवाय माणसाची भाषा, त्यातील सर्व
आशयांसह त्याला कशी समजणार ?
नंबर ५..
अतृप्त आत्म्याला जे आश्वासन हवे असेल ते
दशपिंडीसाठी स्मशानात आलेल्यांकडून मिळाले
की कावळा लगेच कृति करतो.
नंबर ६..
हे काम झाले रे झाले, की बिचारा आत्मा घाईघाईने
देह सोडतो, कारण कावळे थोड़े आणि आत्मे फार
झाल्याने बाकीचे आत्मे आपला नंबर
कधी येतो म्हणून बिचारे रांगेत ताटकळत उभेच
असतात.
नंबर ७..
प्रत्येक जिवमात्रात एकच आत्मा असतो म्हणे;
परन्तु कावळा हा असा अद्भुत पक्षी आहे,
की ज्याच्यामध्ये अधूनमधून काही काळासाठी एकाच
वेळी दोन आत्मा राहतात. एक
त्याचा स्वतःचा आणि दूसरा दहाव्या दिवशी स्मशानात
अवतरलेल्या कोणातरी मानवाचा. 'विचार तर कराल'
यासाठी यापेक्षा चांगले उदाहरण शोधून सापडणार
नाही.
प्रत्येक प्राण्याला जिवाची भीती असतेच.
एरवी आपल्याला सतत हुसकावाणारी माणसे आज
पान मांडून प्रेमाने आपल्याला बोलावता आहेत,
त्यामागे आपल्या जिवाला काही धोका तर नसेल
ना ? असा विचारही न
करण्याएवढा कावळा बावळा नसतो. माणसे
पिंडाजवळ असली तर त्यांना भिऊन कावळे लगेच दूर
उडून जातातच; परंतु ती लांब
गेली तरी कावळा अन्नावर एक चोच मारून उडून
जातो. कावळाने पानाला शिवला की जमलेली माणसे
निघून जातात. मगच कावळे पानावर यथेच्छ ताव
मारतात. शिवाय पिंड ठेवण्याच्या आधी काही काळ
कावळयाच्या पोटाला दुसरे काही अन्न मिळालेले
असू शकते. पोट भरलेले असताना आणि त्यामुळे
भूक नसताना देखिल आवडीचा पदार्थ म्हणून
अन्नावर ताव मारणे हा माणसाचा गुण आहे;
कावळयाचा नव्हे.
कावळयाने पिंडाला शिवणे या प्रकारावरून
मृतात्म्याचे अस्तित्व, त्याची इच्छापूर्ती याचे
निष्कर्ष काढण्याची घाई कावळयाला आजिबात
नसली, तरी माणसाला असते. न तापासलेल्या रुढीने
कसे अंधाळेपण येते याचेच हे उदाहरण.
या साऱ्यांबाबत परत तेच प्रश्न
विचारणाऱ्यांना तुमच्या सारख्याच तरुण पण चलाख
मित्राने छान जबाब दिला होता.
तो म्हणाला "प्रयोग करुया, जन्मभर
शाकाहारी असलेल्या माणसाचे खमंग मांसाहारी पिंड
मांडुया. खरे तर कावळे त्यापासून दूर रहायला हवेत.
आपली घोर थट्टा करण्यासाठी मांसाहारी पिंड
मांडणाऱ्या माणसालाच टोची मारून त्याने बेजार
करावयास हवे. पण खात्री देतो असे, घडणार
नाहीच. उलट कावळे झटपट येतील
मांसाहारी पिंडावर मजेत ताव मारतील."
त्यांची समज त्यांचा मेंदू तेवढा आणि तशीच
त्यांची कृति देखिल. पण ते तर बोलून चालून
कावळेच. खरा प्रश्न, पिंड ठेवून
कावळयांसाठी ताटकाळत बसणाऱ्या माणसाच्या मेंदूचे
करायचे काय ?
1
Answer link
कावळा हा सर्व भक्षण करणारा पक्षी आहे. तो कोणताही सजीव मृत झाल्यावर सजीवांचे मृतदेह खाऊन परीसर स्वच्छ करण्यास निसर्गातील प्रत्येक सजीवाला मदत करतो . असे असताना
मानव प्राण्यांनी जेव्हा मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून कावळ्याला त्याच्या हक्काचे अन्न कमी प्रमाणात मिळु लागले त्याला त्याचे हक्काचे अन्न मिळावे म्हणून मानव प्राण्यांने मृत झालेल्या माणसाचे शरीर कावळ्यांना खायला देण्याऐवजी मृत माणसाचे पिंड तयार करून व मृत माणसाच्या आवडीचे सर्व पदार्थ कावळ्यांना खायला देण्यास सुरुवात केली ते अन्न कावळ्याने शिवल्यास व खाल्यावर मृत माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते
0
Answer link
हिंदू धर्मामध्ये, मृत व्यक्तीच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श करणे महत्त्वाचे मानले जाते. यामागे अनेक कारणे आहेत:
- पितरांचे प्रतीक: कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, कावळा हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला पितृलोकात घेऊन जातो. त्यामुळे, जेव्हा कावळा पिंडाला स्पर्श करतो, तेव्हा तो आत्मा मुक्त होतो आणि त्याला शांती मिळते.
- अन्न ग्रहण: कावळा हा अन्न ग्रहण करणारा पक्षी आहे. पिंडाला कावळ्याने स्पर्श केल्याने, ते अन्न योग्य ठिकाणी पोहोचले आहे, असे मानले जाते.
- शुभ शकुन: पिंडाला कावळ्याने स्पर्श करणे हा शुभ शकुन मानला जातो. यामुळे, कुटुंबाला आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
याव्यतिरिक्त, काही लोकांचे असेही मत आहे की, कावळ्याला यमलोकाचे द्वारपाल मानले जाते. त्यामुळे, कावळ्याने पिंडाला स्पर्श केल्याने, मृत व्यक्तीचा आत्मा यमलोकात प्रवेश करतो आणि त्याला न्याय मिळतो.
टीप: ही माहिती धार्मिक आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे.