3 उत्तरे
3 answers

देवदासी म्हणजे नेमके काय?

6
देवदासी: हजारो वर्षांपासून चालत आली प्रथा, अजूनही पूर्णतः बंदी नाही
या राज्यात सुरु आहे प्रथा
कर्नाटक,आंध्र प्रदेश,तेलंगणा,महाराष्ट्र,ओडिशा,गोवा आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांतील काही भागांमध्ये देवदासी प्रथा सुरु असल्याचे अनेक दाखले मिळालेले आहेत.
काय आहे देवदासी प्रथा?
देवदासी प्रथेची सुरुवात केव्हा झाली यावरुन इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत,मात्र सहाव्या शतकात ही प्रथा सुरु झाल्याचे बहुतेकांचे मत आहे.

देवदासी प्रथा प्रथम दक्षिण भारतात सुरू झाली आणि ती जवळ जवळ विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत चालू होती. गंमत म्हणजे त्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी वैधानिक पावलेही दक्षिणेतच उचलली गेली!
पैसे मिळवण्याचा हेतू मनात ठेवून स्वशरीराचा उपभोग एकाहून अनेक पुरुषांना देणारी स्त्री हिलाच वेश्या म्हणता येईल.

देवदासी


डोक्यात जटा आली म्हणजे देवीचा कोप होणार. हा कोप होऊ नये, म्हणून मग त्या मुलीला देवीसाठी सोडले जाते. देवदासीची पूर्वापार चालत आलेल्या प्रथेला आज काही प्रमाणात आळा बसला आहे. अंधश्रद्धा, गरिबी यातून जन्मलेल्या आणि टिकलेल्या या प्रथेवर कायदेशीररीत्या इंग्रजांनी सर्वप्रथम बंदी घातली, पण लोकांच्या मनातील अंधश्रद्धा तसेच समाजातील खालच्या वर्गातील गरिबी, अशिक्षितपणा नष्ट झाला नाही. या गोष्टीचा गैरफायदा घेत देवीच्या नावावर सुरू असलेली आर्थिक, शारीरिक शोषणाची ही दुष्ट प्रथा आजही महाराष्ट्रासह कर्नाटकात सुरू आहे. राज्य सरकार, सेवाभावी संघटना, संस्था आणि समाजसेवक यांनी ही प्रथा बंद होण्यासाठी पुढाकार घेतला असून गेली अनेक वर्षे याबाबत सर्वच थरावर जनजागरण सुरू आहे.


ब्रिटिशांनी देवीला मुली सोडणे, तिला देवदासी बनवणे हा गुन्हा आहे, असा कायदा १९३४ साली केला होता. त्यानंतर अलीकडे महाराष्ट्र व कर्नाटक सरकारनेही कायदा केला आहे. त्यामुळे उघडपणे डोंगरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली किंवा मुलगे सोडले जात नाहीत, परंतु अजूनही चोरून पुजा-याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. हे प्रमाण आता खूप कमी झालं आहे. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असे. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात. त्यावर ठेवलेला नारळ हे शंकराचं प्रतीक मानलं जातं.

यावेळी पाच जोगतिणींची ओटी भरली जाते. हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना करावा लागतो. या लहान मुलीला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते. त्या रात्री या जोगतिणी यल्लम्माची भक्तीपर गाणी म्हणतात.

हा विधी आटोपल्यावर ही मंडळी आपल्या गावी परत येतात. इथे आल्यावर ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. कारण त्या गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं की, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये. लहान वय असल्यामुळे ती मुलगी कशीबशी साडी सावरत हे सगळं करत असते. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची तिला कल्पनाही नसते. साधारणपणे लहान वयातच या मुलींना सोडलं जातं. कधी कधी तर पाळण्यात असतानाही सोडलं जातं.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे डोंगरावर यल्लम्मा देवीचं मंदिर आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या काळात देवीच्या दर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला ‘रांडाव पुनव’ तर पौष पौर्णिमेला ‘आहेव पुनव’ म्हणतात. शिवाय चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा असते. ती १५ दिवस चालते. या काळात यल्लम्माला सोडलेल्या जोगतिणी आणि जोगते (पुरुष) विशिष्ट कर्मकांड पार पाडत असतात. रांडाव पुनवेला गावाबाहेर जाऊन हातातल्या बांगडय़ा फोडायच्या व आहेव पुनवेला पुन्हा भरायच्या.

यल्लम्माला सोडल्या जाणा-या मुली, बरेचदा मागासवर्गातील म्हणजे महार, मांग, चांभार जातीच्या असतात. (क्वचितच कुठे मराठा किंवा इतर जातीतला मुलगा किंवा मुलगी सोडली जाते, तेही अशिक्षितपणामुळे किंवा अंधश्रद्धेमुळे) या जातींत आधीच मागासलेपण त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. या मंडळीचा देवीवरचा अंधविश्वास इतका पराकोटीचा आहे की साध्या-साध्या गोष्टी जरी आयुष्यात घडल्या तरी त्या देवीच्या कोपामुळे घडल्या, अशी त्यांची समजूत कुणातरी म्हाता-या जोगतिणीने करून दिली तरी ते मुली सोडायला तयार होतात.

काही गोष्टी तर पूर्वापार चालतच आहेत. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जाते. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नाही. पण एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं.

यावरून असं लक्षात आलं की, केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मुल झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेते व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करते. याबद्दल एका म्हाता-या जोगतिणीला विचारलं असता ती म्हणाली, ‘‘लेका असं नाय केलं तर आमचं हाल कुत्रबी खायचा नाय! कोण बघणार आमाला म्हातारपणी.’’

दुसरी एक जोगतीण याविषयी असं म्हणाली, ‘‘हे यल्लम्माचा गळ्यात बांधलेलं ‘दर्शन’ दुस-या कुणाच्याबी गळ्यात आपण मरायच्या अगोदर बांधाया पायजे, नायतर देवीचा कोप होतो. सुखानं मरान येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या नायतर नात्यातल्या कुणाच्याबी मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातन सुटलो!’’ ही अंधश्रद्धा इथे असली तरी खरं कारण हे आर्थिक आहे. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी तिला बघेल, याची सोय ती करून ठेवत असते.

अशा या वयात आलेल्या तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असतात, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची नजर असते. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होते. झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो.

त्याच्यापासून तिला मुलं झाली तर त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवाही फार दिवस टिकतो, असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ‘‘हे मूल माझं कशावरून?,’’ असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ‘‘मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,’’ असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं.

या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात.या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

लग्नप्रसंगी खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. (एकीच्या हातात चौंडकं, दुसरीच्या हातात तुणतुणं, तिसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी असते.) लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो.

यल्लम्माला मुलगेही सोडली जातात. मुलगे सोडण्याचे प्रमाण फार कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग केला जातो. या मुलींना शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं. काही जणी पळूनही शहराकडे येतात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात.

मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर खालच्या वर्गातील मुलींचा असा बळी दिला जातो.

ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. निपाणी, गडहिंग्लज या भागात सामाजिक कार्य करणारे प्रा. सुभाष जोशी व देवदासी प्रथेचे निर्मूलन आणि देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या पत्नीने स्थापन केलेली ‘सावली’ ही स्वयंसेवी संस्था, प्रा. विठ्ठल बन्ने आदी मंडळी गेली अनेक वर्षे अभ्यासपूर्ण आंदोलन करून ही प्रथा बंद व्हावी यासाठी आजतागायत प्रयत्न करत आहेत.
उत्तर लिहिले · 30/7/2017
कर्म · 28530
2
आज आपल्या देशात स्त्रिया सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत एक महिलाही राष्ट्रपती होवून गेली. परंतु आपल्या समाजातील स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे ज्याला महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो तो वर्ग आहे देवदासी स्त्रियांचा.
  प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेचे प्राबल्य जास्त दिसते. आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात. रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळय़ा वाहिल्या जातात. मुला-मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते. मुलां-मुलींना इसब,खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळय़ा बनवतात.देवदासी प्रथेतील लिंब नेसणे, परडय़ा भरणे, जोगवा मागणे या अनिष्ट प्रथांनी मन विषण्ण होऊन जातं. आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला भरपूर पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी !देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं..देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी मिळते व तो वाढीस लागतो. देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळय़ा वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच! विशेष म्हणजे ही प्रथा समाजातील खालच्या वर्गात अजूनही सुरुच आहे. ज्या ठिकाणीअशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते.देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमा भागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्रय़ात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणार्या दलित देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात.मागासलेल्या समाजात देवदासी प्रथा अस्तित्वात होती आणि आहे. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत त्या तशाच आहेत.देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळतं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते. अनेक कायदे करूनही ही प्रथा संपलेली नाही.बहुसंख्य देवदासींना या प्रथेतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्यावर आलेला प्रसंग आपल्या मुलां-मुलींवर येऊ नये यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे. मात्र त्यांच्या जागृतीच्या प्रमाणात उपाययोजनांचा अभाव कटाक्षाने आढळतो. म्हणूनच देवदासी प्रथा निर्मूलनाच्या व पुनर्वसनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वरुपाच्या कायद्याची गरज आहे.पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवदासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजदेखील या भागात बर्याच देवदासी डोक्यावर रेणुका देवीचा जग व हातात यल्लमाची परडी घेऊन जोगवा मागताना दिसतात. म्हणून त्यांचे पुनर्वसन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या मुलांसाठी ठिकठिकाणी वसतीगृह चालविली जात असली तरी किती मुलं याचा फायदा घेतात हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकेल.मनात खोलवर रुजलेल्या धार्मिकश्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी अबलांच्या शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पणया जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होतआहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाचीआणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे.  एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना या जन्मात जरी मिळाला तरी खूप काही त्यांनी मिळवलंय असं म्हणता येईल. राज्यकर्त्यांमधील बदलते धोरण, लहान वयातच घरच्यांनीच लादलेले उपेक्षेचे जीवन, सतत पत्करावी लागणारी लाचारी, इच्छा असो वा नसो सतत देहावर होणारे अत्याचार हे सर्व निमूटपणे सहन करावं लागतं. आजच्या या आधुनिक युगातही स्त्रीला भोगाव्या लागणार्या या यातनांची समाजानं थोडीतरी दखल घ्यायला हवी.
  , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी यागरीबांना मिळते. देवदासी या ' ईश्वरी ' नावाखाली बहुतेक मुलींना 'शरीरविक्रयाचा धंदा' करावा लागतो.कोणाच्या सडक्या मेंदूतून हि कल्पना निघाली असेल ते माहित नाही पण हि प्रथा आपल्या समाजात असणे म्हणजे माणूस म्हणून जगायच्या आपण लायकीचे नाही हेच दर्शवते....
उत्तर लिहिले · 30/7/2017
कर्म · 210095
0

देवदासी ही एक धार्मिक प्रथा आहे ज्यामध्ये कुमारी मुलींचे विवाह देव किंवा मंदिराशी लावले जातात.

प्रथेचा इतिहास:

  • प्राचीन काळात, देवदासी प्रथा मंदिरांना समर्पित महिलांशी संबंधित होती.
  • त्या मंदिराची देखभाल करणे, नृत्य आणि संगीत सादर करणे यांसारख्या धार्मिक विधींमध्ये भाग घेत असत.
  • कालांतराने, या प्रथेला अनेक प्रकारे भ्रष्ट स्वरूप आले.

सद्यस्थिती:

  • देवदासी प्रथा भारतात कायदेशीररित्या নিষিদ্ধ आहे.
  • या प्रथेमुळे महिलांचे शोषण होते आणि त्यांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जातात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कुटुंबात स्त्रीच्या वाट्याला येणारे स्थान स्पष्ट करा?
स्त्रियांना आजही पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते, याविषयी तुमचे मत काय आहे?
खालील शब्द कोणत्या वयोगटाशी निगडित आहे ते लिहा: 'वडा' (वृद्ध व्यक्ती)?
बिना सहकार नाही उद्धार?
भाषावाद म्हणजे नेमके काय?
सामाजिक जीवनात सर्वांना कशाची गरज असते?
समाजधारणेसाठी काय पायाभूत असते?