Topic icon

प्रदूषण

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
                                   वायू प्रदूषण

वायू प्रदूषण ( Air pollution) :- वायू प्रदूषण तेव्हा उद्भवते जेव्हा वायू, कण आणि जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक किंवा अत्यधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो. यामुळे मानवांमध्ये रोग, अलर्जी आणि मृत्यू देखील होऊ शकतात; हे इतर सजीवांना जसे की प्राणी आणि अन्न पिके यांस हानी पोहोचवू शकते आणि नैसर्गिक किंवा मानव निर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात.केवळ बाहेरील वायू प्रदूषणामुळे २.१ ते ४.२१ दशलक्ष अकाली लोकांचा मृत्यू होतात

२०१४ जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता,  अंदाजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने प्रतिध्वनी व्यक्त केली.

वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.




1: प्रदूषक घटके

नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.


भारतातील एअर् इंडियाची चळवळ

सल्फर डायॉक्साईड (SO2) -: जेव्हा कोळसा किंवा रॉकेल जळते तेव्हा त्यांमध्ये असणाऱ्या गंधकाचे-सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होतो. सल्फर डायॉक्साईड पाण्यात लवकर विरून जातो. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फ्यूरिक अम्ल तयार होते व यालाच अम्लधर्मी पाऊस म्हणतात. अम्लधर्मी पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन अम्लयुक्त होते व हळूहळू नापीक बनते. असल्या पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सल्फर डायाक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते.
सल्फर डायॉक्साईड हा कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होत असल्याने त्याचे प्रमाण वीटभट्या, वीज निर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वाऱ्याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने. अतिदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, वीजनिर्मिती प्रकल्पात गंधकरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबर मधून त्याचे शुद्धीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व अम्लधर्मी पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायॉक्साईड असतो.


नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड (NO and NO2) -: अतिउच्च तापमानावर (१००० अंश सेल्शियस अथवा त्यापेक्षा जास्ती) जेव्हा ज्वलन होते त्यावेळेस हवेतील नायट्रोजनचेही ज्वलन होऊन त्याचे नायट्रोजन ऑक्साईड व नंतर डायॉक्साईड बनते. मुख्यत्वे दुचाकी-चारचाकींच्या इंजिनमध्ये तापमान १००० पेक्षाही जास्त असते त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होऊन वाहनांच्या धुराड्यांमार्फत वायुप्रदूषण होते. नायट्रोजन डायॉक्साईड सुद्धा सल्फर डायॉक्साईड प्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो परंतु याची पाण्यात विरण्याची क्षमता कमी असते व तो बराचसा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. यामुळे जास्तीत जास्त कफनिर्मिती होऊन सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडतात. वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायॉक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे प्रकार घडतात. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहेमीचे आजार बनून जातात.

नायट्रोजन डायॉक्साईड कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असणे गरजेचे आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजन डायॉक्साईडचे पुन्हा ऑक्सिजन व नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. यासाठी ज्यात कन्व्हर्टर नाहीत अशा जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचे आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करून नायट्रोजन डायॉक्साईडचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर काम करत आहेत.


ओझोन (O3) -: ओझोन शरीरास चांगला असतो हा एक चुकीचा समज आहे. ओझोनमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असतात यातील तिसरा अतिशय आक्रमक असतो व मिळेल त्या गोष्टीचे ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्‍न सातत्याने करत असतो. ओझोनची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. तिथला ओझोन सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो. परंतु आपल्या नजीकच्या वातावरणातील ओझोन एक आक्रमक रसायनाचे काम करत असतो. ओझोन श्वसन नलिकेत कफामध्ये अजिबात न विरघळता सरळ फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचतो व फुफ्फुसांतील पेशींवर अतिशय संहारक पद्धतीने हल्ला चढवतो यामुळे जेव्हा हवेत ओझोनचे प्रमाण जास्त असते तेव्हा छातीत कळ येण्यासारखे प्रकार घडतात. ओझोनच्या सातत्याच्या माऱ्यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन दम्यासारखे रोग वाढीस लागतात. या अगोदर नमूद केलेल्या नायट्रोजन ऑक्साईडची ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो, तसेच ओझोनचेही नायट्रोजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो.
जर नायट्रोजन ऑक्साईड व व्हीओसींचे प्रमाण कमी राहिले तर ओझोनचे प्रमाण मर्यादित रहाण्यास मदत होते. ओझोनमुळे केवळ मानवी शरीरावरच नव्हे तर रबर, प्लॅस्टिक, कपडे यांच्यावरही परिणाम होतो. ओझोनच्या संपर्कात येऊन रबराची लवचीकता कमी होते. कपड्यांचे रंग उडतात, इत्यादी दुय्यम परिणाम आहेत.


व्होलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC) -: विविध रसायने व रासायनिक उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व व्हीओसी. तयार होतात. यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षितपण असतात. बहुतांशी व्हीओसींचे सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होऊन जाते व ओझोन अंततः घातक प्रदूषक घटकाचे काम करतो. पेट्रोलपंपावरील गाडी भरताना उडणारे पेट्रोल, घराला रंग देताना थिनर व ऑईलपेंटचा वापर इत्यादी गोष्टी वातावरणातील व्हीओसी वाढवतात.वातावरणातील व्हीओसी कमी करण्यासाठी उघड्यावरील रसायनांचा वापर टाळणे, इमारतींसाठी व घरांमध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे.

कार्बन मोनॉक्साईड(CO) -: आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. वीटभट्या, छोटे छोटे तसेच मध्यम व मोठे वीजनिर्मितीसंच, वाहनांचीया इंजिने यांमधून हा बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायु अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकते, परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, विचारक्षमता अथवा कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार घडतात.कमी तापमानावरील (७०० अंश से किंवा त्यापेक्षा कमी) ज्वलन, तसेच ज्वलनासाठी पुरेशा ऑक्सिजनची कमतरता हे कार्बन मोनॉक्साईड तयार होण्याची कारणे आहेत.



धुळीचे प्रदुषण

ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात न जाणारे. १० मायक्रोमीटर (PM10)पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण केवळ रहदारीमुळेच होते असे मानणे चुकीचे आहे. धूलिकण मानव निर्मित तसेच निसर्ग निर्मितही असू शकतात. मानव निर्मित धूलिकण हे ज्वलन व तत्सम प्रक्रियांतून निर्माण होतात. तसेच कुठेही चालणारी बांधकामे, विविध प्रकारचे कारखाने, शेतीतील विविध प्रकारची कामे हे मानव निर्मित धूलिकणांचे स्रोत आहेत. निसर्गही हवेतील धूलिकण कमी अथवा जास्त करण्यात मोठा हातभार लावत असतो. फुलांच्या बहार येणाऱ्या मोसमात काही ठिकाणी हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढते. तसेच कोरड्या प्रांतातून वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ येऊ शकते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी धूळ स्पेन, इटली, ग्रीस, स्वित्झर्लंड, सायप्रस इत्यादी देशांत मोठ्या प्रमाणात येऊन तेथील हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवते.



अतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे (PM2.5) : हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्म कण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म (नॅनो आकारात) काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. दोन स्ट्रोकवाल्या वाहनांमुळे, तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे, शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिसूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्ती आहे.




हवामान बदलास जवाबदार घटक

जागतिक तापमानवाढ


कार्बन डायॉक्साईड प्रदूषण

वरील प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर पटकन दिसून येतो. मात्र निसर्गातील काही घटक या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यात सातत्याने मदत करत असतात. वरील सर्व घटकांचा वातावरणात टिकून रहाण्याची क्षमता काही मिनिटांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असते. याचा अर्थ प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना योजल्यास त्याचे परिणाम काही महिन्यातच दिसून येतात. परंतु खालील घटक हे वातावरणात कित्येक वर्षे, दशके, किंबहुना शतके टिकून रहातात व हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जवाबदार आहेत. हवामान बदलामध्ये जागतिक तापमानवाढ ही सर्वात चिंताजनक बाब आहे व इतर बदल हे सयुक्तिकपणे अपेक्षित आहेत.

कार्बन डायॉक्साईड (CO2) -: सध्याचा सर्वात चर्चिला जाणारा चिंतेचा विषय जागतिक तापमानवाढ हे कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणारा परिणाम आहे. साधारणपणे १९९० पर्यंत कार्बन डायॉक्साईड हा प्रदूषक घटकांमध्ये मानला जात नव्हता कारण कोणत्याही ज्वलनाचा अंतिम पदार्थ कार्बन डायॉक्साईडच असतो. तसेच आरोग्यावर याचे परिणाम गंभीर मानले जात नव्हते. तापमानवाढीचा व कार्बन डायॉक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा जवळचा संबंध आहे हे शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्बन डायॉक्साईड हा महत्त्वाचा प्रदूषक घटक आहे याला मान्यता मिळाली.
कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण ०.३ टक्के इतके अपेक्षित आहे. निसर्गातील अनेक प्रकियांमध्ये (जीवसृष्टीतील श्वासोछ्वास) कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत असतो. परंतु निसर्गाने वनस्पतींना प्रकाश संश्लेषणातून कार्बन डायॉक्साईडला पुन्हा कार्बन व ऑक्सिजन वेगळे करण्याची क्षमता प्रदान केली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीने पृथ्वीवरील वनस्पतींची कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता कमी झाली. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले व वाढत आहे. सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.३८५ टक्के इतके आहे.

मिथेन (CH4) -: मिथेन हा देखील हरितगृह परिणाम दाखवणारा वायू आहे व कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने दुष्‍परिणामकारक आहे. कार्बन डायॉक्साईड खालोखाल मिथेनचे उत्सर्जन होत असल्याने साहजिकच त्याचे उत्सर्जन हा चिंतेचा विषय आहे. मिथेनच्या उत्सर्जनाला मानव तसेच निसर्गही जवाबदार आहे. अनेक जीवाणूंच्या जैव रासायनिक प्रक्रियेत नैसर्गिकपणे मिथेन बाहेर पडतो. उदा० कचरा कुजणे, दलदली तसेच भूगर्भातील मिथेन अथवा नैसर्गिक वायूंचे स्रोत. ज्वालामुखी इत्यादी. मानवामुळे मिथेनच्या उत्सर्जनात वाढ होऊन वातावरणातील मिथेनचे प्रमाण वाढत आहे. प्रक्रिया न केलेल्या कचरा, पाळीव प्राण्यांचा वाढता वापर, प्रक्रिया न केलेले सांडपाणी यांमधून बाहेर पडणारा बायोगॅस, ( बायोगॅसमध्ये मिथेनचे ६० टक्के प्रमाण असते)इत्यादी कारणे महत्त्वाची आहेत. मिथेन हा ज्वलनशील वायू असल्याने त्याचा जास्तीतजास्त उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी करून घेतल्यास मिथेनचे हवेतील प्रमाण कमी होण्यात मदत होईल. यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प इत्यादी ठिकाणी बायोगॅस वातावरणात जाण्यापासून शक्य तेवढा रोखणे व त्या गॅसचा ऊर्जास्रोत म्हणून वापर करणे गरजेचे आहे.
  • डायनायट्रोजन ऑक्साईड (नायट्रस ऑक्साईड) (N2O)
  • क्लोरो फ्लुरो कार्बन (CFC)




                             वायुप्रदूषणाचे स्रोत


प्रदूषणाचा आढावा


नैसर्गिक स्रोत
  • ज्वालामुखी - सल्फर डायॉक्साईड, इतर अनेक वायू व मोठ्या प्रमाणावरील धूलिकण
  • दलदली - मिथेन.
  • नैसर्गिकरीत्या लागणारे जंगलातील वणवे - कार्बन डायॉक्साईड व सूक्ष्म धूलिकण


मानवनिर्मित स्रोत

  • वाहने - नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड, व्हीओसी, कार्बन मोनॉक्साईड व डायॉक्साईड, सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण,
  • कारखाने- व्हीओसी, कार्बन डायॉक्साईड,
  • वीजनिर्मिती व सिमेंट प्रकल्प - मोठ्या प्रमाणावर कार्बन डायॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड, नायट्रोजन डायॉक्साईड, काजळी (सूक्ष्म धूलिकण)
  • कचरा व सांडपाणी - मिथेन
  • पेट्रोलपंप - व्हीओसी.
  • शेती - %शेतीजन्य उत्पादनातून तयार होणारे व्हीओसी, शेतामधील कामांमधून तयार होणारे धूलिकण.
  • नैसर्गिक कारणे - परागकण जे झाडांमुळे हवेत पसरतात
  • शेतात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक तसेच रासायनिक खतांमुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.

परिणाम

आरोग्यावरील परिणाम

वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड.हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो..



निसर्गातील इतर घटकांवर परिणाम

केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनीवर व पिकांवर होतो.शेतातील पिक उदा. गहू ज्वारी इतर खराब होतात असे निदर्शनात आले आहे.




इतर परिणाम

  • रबर ओझोनच्या संपर्कात आल्यामुळे ते कडक बनते व त्याचे आयुष्य कमी होते. तसेच ओझोनच्या अस्तित्वाने कपड्यांचे रंगही/ गाड्यांचे रंगही फिके होतात.
  • ताजमहाल, ग्रीसमधील अक्रोपोलिस या व जगातील इतर महत्त्वाच्या वास्तूंचे सौंदर्यदेखील वायूप्रदूषणामुळे कमी झाले आहे.
  • साध्या बांधकामाचे आयुष्य कमी होते.
  • कार्बन डायॉक्साईडच्या सातत्याच्या उत्सर्जनाने जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावणे चालू झाले आहे.
उत्तर लिहिले · 26/8/2023
कर्म · 9395
1
वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
उत्तर लिहिले · 16/7/2023
कर्म · 48335
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही