2 उत्तरे
2
answers
लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?
0
Answer link
लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात
मंगलाष्टकं…. आपल्या हिंदू विवाहपद्धतीमधील एक महत्त्वाचा विधी आहे. विवाहप्रसंगी जेव्हा वधुवर एकमेंकासमोर पहिल्यांदा येतात त्यावेळी दोघांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. मंगलाष्टके म्हणजे आठ श्लोकांचे, मंगल वचनांचे अष्टक असते. मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत. मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्य जीवनासाठी द्यावयाच्या आशिर्वादात आहे. पारंपरिक रित्या मंगलाष्टकं ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. एक चरण संपल्यानंतर शुभमंगल सावधान असे म्हणतात. दोघांना आपल्या सुखीजीवनाची सुरुवात करायची आहे त्यासाठी देवांचा आणि ज्येष्ठ मंडळींचा आशिर्वाद तसेच वास्तवाचे भान हे सगळं काही या मंगलाष्टकातून सांगण्यात येते. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा आहे.
मंगलाष्टकांची सुरुवात ‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम।’ असे म्हणून करतात. आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीचे नाव घेऊन करतात त्यामुळे मंगलाष्टकांमध्ये विघ्नहर्त्याचे नाव प्रथम घेतले जाते. त्यानंतर ‘गंगा, सिंधु, सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा’ अशी सगळी नद्यांची नावे घेतात. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या सगळ्या पवित्र नद्या आहेत. त्या नद्यांचे आशिर्वाद वधुवरांना मिळावेत. तसेच नदी प्रवाही असते; दगडांमधून वाट काढत पुढे जाते त्याप्रमाणे या दोघांनी आयुष्यात पुढे जायचे आहे. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करून आपले लक्ष्य गाठायचे आहे. अशाप्रकारे मंगलाष्टकांच्या प्रत्येक चरणात देवतांचे नाव घेऊन त्यांना आवाहन करून वधुवरांसाठी त्यांच्यासाठी आशिर्वाद घेतला जातो. तुलसी विवाह करताना मंगलाष्टके म्हटली

जातात. मंगलाष्टकांची सांगता नेहमी पुढील श्लोकाने होते.
‘तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||’
याचा अर्थ असा की ‘आजच्या दिवशीचे हे लग्न, हा दिवस चांगला आहे, चंद्र आणि तारांचे बलही चांगले आहे, विद्या आणि दैव यांचेही चांगले बल पाठीशी आहे. परंतु यातील काही जर चांगले नसेल तर, हे महाविष्णू (लक्ष्मीपती) तुमच्या स्मरणाने हे सगळे चांगले होवो. जी काही उणीव आहे ती तुमच्या नामस्मरणाने भरून काढली जावो.’
वधुवराच्या लग्नात जी मंगलाष्टके असतात तीच तुलसी विवाहात असतात. उपनयन संस्कार किंवा मुंज यावेळी ही मंगलाष्टके म्हणतात त्यात ‘कुर्यात बटो मंगलम्’ असे म्हटले जाते. याविषयीचा हा लेख सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.
मंगलाष्टकांमध्ये ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणतात त्यावेळी नातेवाईक वधुवरांवर अक्षता टाकतात. यातील ‘सावधान’ शब्द महत्त्वाचा आहे. आपण सावधान हा शब्द केव्हा वापरतो? ‘सावधान… कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय’ म्हणजे काय? ‘सावध रहा, काळजी घ्या. पुढे संकट आहेत. पण तुम्ही सावधगिरी बाळगलीत तर त्यातून नक्की बाहेर पडाल.’ जबाबदारी स्विकारण्याचा अलार्म म्हणजे सावधान असे म्हटले तरी चालेल. मंगलाष्टकांमध्ये सावधान हेच सांगते, ‘वधू आणि वरा, आता लक्ष दे. तुमचे ब्रह्मचर्य संपले असून आता तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहात, त्याबद्दल असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवा.’ त्या जाणीवांचे कवन म्हणजे मंगलाष्टके होय. या कवनांमधून अतिशय सुंदर प्रकारे जबाबदारीची जाणीव वधुवरांना विवाह लागताना करून दिली जाते.
समर्थ रामदार स्वामी यांच्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच, सावधान हा शब्द ऐकल्यानंतर विवाहमंडपातून ते पळून गेले. त्यांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. स्वत: प्रपंच न करता श्रीसमर्थांनी ‘आधी प्रपंच करावा नेटका’ हे सांगितले. श्रीसमर्थांसह कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा, असे सांगितले नाही. प्रपंच नेटका केल्यानंतर मन प्रपंचामधून निघण्यासाठी त्यास ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे,’ असे श्रीसमर्थ सांगतात. तर असे आहे सावधान शब्दाचे महत्त्व ज्याचा मंगलाष्टकांमध्ये उपयोग करून पुढील जीवनात येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. आमच्या सर्वांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत हे सुद्धा आवर्जून सांगितले जाते.
0
Answer link
मंगलाष्टकं म्हणजे काय?
मंगलाष्टकं म्हणजे आठ शुभ श्लोक. हे श्लोक विवाह सोहळ्यात म्हटले जातात. 'मंगल + अष्टक' या दोन शब्दांनी मिळून 'मंगलाष्टक' हा शब्द तयार झाला आहे. मंगल म्हणजे पवित्र किंवा शुभ आणि अष्टक म्हणजे आठ.
लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?
- सकारात्मकता: मंगलाष्टकांमुळे वातावरण सकारात्मक आणि पवित्र होते.
- शुभारंभाची प्रार्थना: हे श्लोक नववधू आणि वर यांच्या नवीन जीवनाची सुरुवात करताना देवांकडे आशीर्वाद मागण्यासाठी असतात.
- वैवाहिक जीवनाचे महत्त्व: मंगलाष्टकांमध्ये वैवाहिक जीवनातील प्रेम, समजूतदारपणा आणि त्याग यांसारख्या महत्वाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन दिलेले असते.
- संस्कृती आणि परंपरा: मंगलाष्टकं ही आपल्या संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे ते विवाहविधीमध्ये गायले जातात.
मंगलाष्टकांचा अर्थ:
मंगलाष्टकांमध्ये नववधू आणि वर एकमेकांना साथ देण्याची, एकमेकांचा आदर करण्याची आणि प्रेमळ जीवन जगण्याची शपथ घेतात. हे श्लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत, अशी प्रार्थना करतात.
संदर्भ:
- मंगलाष्टकांबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.