Topic icon

होळी

5
देशभरात आज होळीला उत्साहात सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी पेटवण्यात येते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.
या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.

18
होळी

होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्री ष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा.[१]

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

होळीचे महत्त्व

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

आख्यायिका

लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूनेधाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव" धूळवड आणि "रंगोत्सव" रंगपंचमी हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.


समारोप

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

उत्तर लिहिले · 21/2/2018
कर्म · 115390