माझ्या स्वप्नातील गाव निबंध?

“माझे गाव” म्हटलं कि सर्वांच्या मनात एक आपुलकीची भावना आणि उत्साह निर्माण होतो. गावाकडच्या आठवणी लगेच आपल्या मनात यायला लागतात. गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते आपले जुने घर, चावडी,गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता. आत्ताच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात सुद्धा अजूनही सुट्टीमध्ये शहरातील भरपूर लोक गावाकडे जातात. मला गावाला जायच म्हटलं की खूप आनंद होतो आणि लगेचच मी तयारीला लागते. कधी परीक्षा संपतेय आणि कधी मी गावाला जातेय असे मला वाटते. माझ्या गावाला जायला मुंबई-पुणे महामार्ग लागतो. त्यानंतर चांदणी चौकामधून माझ्या गावाच्या दिशेने रस्ता आहे. माझ्या गावाला जाताना मध्ये घाट लागतो. घाटामधून जाताना सगळीकडे हिरवळ दिसते. घाटामध्ये खूप नागमोडी वळणे आहेत. मला तिथून जाताना खूप भीती वाटते पण गावाला जाणार याचा एक आनंदही मनामध्ये असतो त्यामुळे भीती निघून जाते.त्यानंतर थोडा घाट उतरल्यानंतर काही गावे दिसतात. हिरवेगार शेती दिसते. घाटाच्या पायथ्याशीच आमचे गाव आहे. गावाला “ग्रामपंचायत मुठा आपले सहर्ष स्वागत करीत आहे” अशी कमान आहे. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वचजण कसे आहेत, बाकीचे शहरातील नातेवाईक कसे आहेत याची चौकशी करतात .घरी गेल्यानंतर सर्वचजण आजी आजोबासुद्धा आमची दारात बसून आतुरतेने वाट पाहत असतात. खरंच गावाकडची माणसं माणुसकी विसरत नाहीत. त्यांच्यामध्ये एक आदराची आणि आपुलकीची भावना असते. माझ्या गावामध्ये भैरवनाथाचं, विठ्ठल-रुक्मिणी आणि जननी देवीचं मंदिर आहे. गावामधील सर्वच लोक सर्व मंदिरांमध्ये भक्ती भावाने पूजा, आरती करतात. गावामध्ये कोणाच्या घरी काही शुभकार्य किंवा काही कार्यक्रम असेल तर सर्वजण नैवेद्य दाखवतात आणि कार्य चांगले होण्यासाठी प्रार्थना करतात. गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की ग्रामदैवताचे दर्शन घेतले तर कार्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि कार्य व्यवस्थित पार पडते. या जननी देवीच्या मंदिराशेजारी मुठा नदी वाहते. त्यामुळे नदीच्या परिसरात खूपच प्रसन्न वाटते. गावात आणखी खंडोबाचे आणि तुकाई देवीचे मंदिर आहे. गावातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरांमध्ये वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला यात्रा असते.आम्ही यात्रेला सुद्धा दरवर्षी गावाला जातो. यात्रेच्यावेळी खूप मजा येते. सर्व मामा,मावश्या आणि सर्व भावंडे एकत्र जमतात. यात्रेत भरपूर खेळणी,पाळणे आणि अनेक छोट्या-मोठ्या वस्तू विकायला असतात.आमच्या गावात यात्रेत कुस्तीच्या स्पर्धा सुद्धा असतात.आमचे गाव कुस्तीगिरांसाठी संपूर्ण मुळशी तालुक्यात खूप प्रसिद्ध आहे. यात्रेत गाण्यांचे, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा असतात. यात्रेच्यावेळी संध्याकाळी देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते. त्यावेळी ढोल ताशा लेझीम अशा वाद्यांच्या गजरात पालखी संपूर्ण गावात फिरून पुन्हा मंदिरात दर्शनासाठी ठेवली जाते. यात्रेच्यावेळी सर्वांच्या घरी पुण्यातून तसेच शहरातील विविध भागातून पाहुणे यात्रेसाठी आलेले असतात. गावामध्ये जाण्यासाठी पूर्वी वाहने नव्हती. पूर्वी लोक पायी किंवा बैलगाडीने प्रवास करायचे पण आता एसटी आणि इतर वाहनांची सुद्धा सोय झाली आहे. आमच्या गावात पूर्वी मोजकीच दोन-तीन दुकाने होती पण आता वाढली आहेत आता गावात बँक आणि डेअरी सुद्धा झाली आहे. आमच्या गावाच्या काही अंतरावर लवासा सिटी झाली आहे त्यामुळे रस्ते सुद्धा खूप सुधारले आहेत आणि गावात सुद्धा खूप प्रगती झाली आहे. आमच्या गावाकडच्या घराजवळ पेरू,आंबा,जांभूळ आणि चिंच यांची झाडे आहेत.त्यामुळे आम्ही सर्व भावंडे कैऱ्या काढतो, चिंचा जांभळं पाडतो आणि पुण्याला येताना घरी सुद्धा आणतो. गावातील नदीजवळ दोन-तीन वडाची झाडे आहेत तिथे आम्ही सर्व भावंडे सूर पारंब्या खेळतो. संध्याकाळी मामी किंवा आजीच्या हातची चुलीवरची भाकर-भाजी खायला मिळते त्यावेळी मन खूप तृप्त होते. आम्ही सर्व भावंडे मिळून शेतामध्ये चुलीवर भात बनवून खातो. गावामध्ये जर कोणाकडे लग्न किंवा काही कार्यक्रम असेल तर आम्ही सर्वजण आवर्जून जातो खास जेवणासाठी.कारण आम्हाला हरभरा, वांगे आणि बटाटा यांची गावाकडे बनवतात ती शाक भाजी आणि बुंदी खायची असते. खरं तर गावाकडच्या जेवणाला एक वेगळीच चव असते. पावसाळ्यात तर आमच्या गावाला एक वेगळेच हवामान असते. खूपच पाऊस त्यात हिरवेगार शेतं आणि डोंगर दिसतात. घरातून बाहेर पडता येत नाही एवढा पाऊस गावाला असतो. पावसाळ्यात भरपूर पर्यटक त्याबाजूला फिरायला येतात कारण आमच्या गावाच्या जवळ लवासा सिटी,वरसगाव धरण,पानशेत धरण अशी भरपूर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. असे हे माझे गाव. सुट्टी कधी संपते नाही ते कळतच नाही आणि पुन्हा घरी परत यावेसेच वाटत नाही कारण गावाला आल्यावर आईच्या कुशीत आल्यासारखे वाटते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श गाव कसं असावं, याविषयी तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे विचार. त्यांच्या जयंतीनिमित्त…
ग्राम्सुधार्नेचा मुल मंत्र।
सज्जनांनी व्हावे एकत्र।
संघटना हेच शक्तीचे शुत्र।
ग्राम्राज्या निर्माण करी.
मित्रांनो! आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होते ते महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे. आपल्या प्रत्येक गावाला आज फार पुढे जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून आपले प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल. गावा-गावातून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी दिल्लीचे थोर-थोर नेते येत आहेत. येत राहतील. अनेक पुढारी मला आपल्या छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारीत असतात. अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पूज्य महात्मा गांधीजी किंबहुना आपल्या सर्वच संतमहात्म्यांची इच्छादेखील हीच होती.
पुढार्यांनी आमच्या गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे, पण केवळ त्यासाठी आपले काम होता उपयोगी नाही. नाहीतर त्यात तकलादूपणा-दिखाऊपणा येईल. आपल्याला कार्याची धुंदी चढली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली. त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका, मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी सोडू? अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले.
भक्त गोर्या कुंभाराने मडकी घडवून समाजाची सेवा केली. त्यात त्याची तन्मयता इतकी झाली होती, की स्वतःचे मूल मातीत तुडवले गेले तरी त्याला भान नव्हते. मडके घडविण्यात त्याने कधीतरी बेईमानी किंवा चुकारपणा केला काय? या तन्मयतेने नि इमानदारीनेच त्याची भक्ती योगी-तपी लोकांहूनही श्रेष्ठ ठरली. गावचे काम अशाच वृत्तीने आपण केले तर तीच खरी भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! किंबहुना देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे असे काम करणेच मी अधिक श्रेष्ठ समजतो.
ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते, शोषकखड्डे, धान्यभांडार इत्यादी व्यवस्थाकार्ये त्यात करावी लागतात. ग्रामपंचायत नसताही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी ते करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करून घेईल तर सेवामंडळ प्रेमाने समजावून करायला लावील. आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग तुमचाच पैसा सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो त्यासाठी पैशाचे जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात. सेवाप्रेम व सहकार्याने स्वयंप्रेरणेने केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने होत नाही. प्रेमाने लोकात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूज्य विनोबांची ग्रामदानाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी कटिबद्ध होणे याचेच नाव आहे ग्रामदान!
मित्रहो! आपण सर्वच याकडे वळलो आहोत. आपणाला बसण्या-उठण्यापासून ते प्रत्येक काम व्यवस्थित करण्याकडे लक्ष पुरवायचे आहे. गावाच्या उद्धारातच आमचा खरा उद्धार आहे याची जाणीव आपणाला होऊ लागली आहे. त्यासाठी रस्ते, घरे, गोठे व उकिरडे दुरुस्त करणे तर आवश्यकच आहेत, पण माणसेही दुरुस्त करावयाची आहेत. आळशी, व्यसनी, बेकार व गुंडप्रवृत्तीचे कोणीही असता उपयोगी नाही. त्याप्रमाणेच जातीपातीचेही उच्चाटन करून आपण सर्व एक आहोत, एकाच कुटुंबातील आहोत ही जाणीव होऊन एकोप्याने सर्वांनी वागले पाहिजे. गरीब-अमीर, अडाणी-पंडित, उच-नीच असले भेद शक्य तितक्या त्वरेने नष्ट व्हायला पाहिजेत.
अस्पृश्यता व विषमता हा हिंदुधर्मावरील कलंकच नव्हे तर हे मेठे संकट आहे. जगात ख्रिस्तीधर्म, इस्लामधर्म व बौद्धधर्म यांची लोकसंख्या क्रमाने एकापेक्षा एक कमी आहे. त्या सर्वाहून कमी हिंदुधर्मियांची लोकसंख्या आहे. त्याची तत्त्व फार उच्च व व्यापक आहेत, पण रुढय़ांनी खूपच गोंधळ घातला आहे. ही शुद्ध तत्त्वे व्यवस्थितपणे अजून व्यवहारात न आणली गेली तर पुढे या थोर धर्माचे काहीच मूल्य उरणार नाही. यासाठी आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून धर्ममय जीवन करणे अत्यंत जरुरीचे आहे. अमानुष व निरर्थक रुढय़ांना मूठमाती द्यावयाची आहे. जातीने उच्च म्हणविणारा पण कामात आळशी, अशाला सामान्य सेवक समजून काम देणे आणि कुळाने हलका मानला गेलेला पण गुणांनी थोर, अशा व्यक्तीला प्राधान्य देणे आज आवश्यक आहे. द्वेषमत्सर कोणाचाही नको. सहकारिता, सद्भावना, सद्गुण, सत्प्रेम यांचे पवित्र वातावरण गावभर निर्माण करून गावाला एक आदर्श कुटुंब बनविणे हेच महान पुण्यकार्य आहे, हाच खरा धर्म आहे! अशा धर्माने रसरसलेले छोटे-मोठे आदर्श गाव पाहून कोणाच्याही हृदयात नवचैतन्य निर्माण होईल, असे कार्य आपण आपापल्या गावी करू शकलो तर तीर्थोतिर्थी जाण्याऐवजी लोक आपल्या गावाचे दर्शन घ्यायला वारंवार उत्सुकतेने येतील. श्रीगुरुदेव आपणास ही प्रेरणा व शक्ती देवो, हीच प्रार्थना!
प्रामाणिकतेने करणे काम।
हेचि आमुचे ईश्वरनाम।
सर्व जीवमात्रासी ऐक्यप्रेम।
धर्म हा आमुचा।।
माझ्या स्वप्नातील गाव
प्रत्येकालाच आपले गाव खूप आवडते. माझ्या स्वप्नातील गाव एक सुंदर आणि आत्मनिर्भर गाव असेल. ते एक असं ठिकाण असेल जिथे सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.
स्वप्नातील गावाची रचना: माझ्या स्वप्नातील गाव निसर्गरम्य वातावरणात वसलेले असेल. गावात हिरवीगार झाडे, स्वच्छ नद्या आणि सुंदर डोंगर असतील. घरांची रचना पारंपरिक असेल, पण ती आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असेल. प्रत्येक घराला स्वतःची बाग असेल, ज्यात ताजी फळे आणि भाज्या उगवतील.
गावातील सुविधा: माझ्या स्वप्नातील गावात एक चांगले विद्यालय असेल, जिथे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. एक आधुनिक रुग्णालय असेल, जिथे गावकऱ्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असेल. गावाला जोडणारे चांगले रस्ते असतील आणि नियमित बस सेवा उपलब्ध असेल. गावात एक मोठे ग्रंथालय असेल, जिथे लोकांना विविध विषयांवरील पुस्तके वाचायला मिळतील.
गावातील जीवनशैली: माझ्या स्वप्नातील गावातील लोक आनंदी आणि समाधानी असतील. ते एकमेकांना मदत करतील आणि सण-उत्सव एकत्र साजरे करतील. गावात जातीय भेद आणि धार्मिक तेढ नसेल. सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतील. गावात व्यसनांचे प्रमाण नसेल आणि प्रत्येकजण निरोगी जीवन जगेल.
गावाची अर्थव्यवस्था: माझ्या स्वप्नातील गाव आत्मनिर्भर असेल. गावातील लोक शेती आणि लघुउद्योग करतील. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्यामुळे उत्पादन वाढेल. गावात तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी चांगली बाजारपेठ असेल.
पर्यावरण: माझ्या स्वप्नातील गाव पर्यावरणाचे रक्षण करणारे असेल. गावात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला जाईल. कचरा व्यवस्थापनाची चांगली सोय असेल. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी वापरले जाईल. गावात सौरऊर्जा आणि पवनऊर्जा वापरली जाईल, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल.
माझ्या स्वप्नातील गाव एक आदर्श गाव असेल, जिथे प्रत्येकजण सुखी आणि समाधानी असेल. मला आशा आहे की माझे हे स्वप्न लवकरच साकार होईल.