ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा पवन ऊर्जा

पवनऊर्जेचे फायदे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

पवनऊर्जेचे फायदे काय आहेत?

2
वाऱ्याची गती बदलत असल्यामुळे, तसेच तो कधीकधी अगदी मंद होत असल्यामुळे त्यापासून प्राप्त होणाऱ्या ऊर्जेत स्थैर्य नसते. त्याशिवाय खनिज तेलाच्या किंमती बऱ्याच कमी असल्यामुळे वाऱ्याची ऊर्जा वापरणे बरेच अडचणीचे आणि खर्चाचे आहे. ह्या कारणांमुळे पवन ऊर्जेचा विशेष उपयोग केला जात नाही; परंतु खनिज इंधने काही काळानंतर संपुष्टातच येणार असल्यामुळे पवन ऊर्जेचा भविष्य काळाच बराच उपयोग केला जाईल. पवन ऊर्जेचा एक मोठा फायदा आहे, तो म्हणजे पवन ऊर्जेच्या वापरामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होत नाही. त्याशिवाय पवन ऊर्जा ही न संपणारी आणि स्वस्त ऊर्जा आहे. तिचे मुख्य दोष अस्थिरता आणि अनियमितता हे होत. वाऱ्याच्या ऊर्जेचा उपयोग करणारे कोणतेही यंत्र ५९.३ टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जा वाऱ्यापासून प्राप्त करून घेऊ शकत नाही. ही सैद्धांतिक सीमा आहे. प्रत्यक्षातील सीमा यापेक्षा बरीच कमी आहे.

पुरातन कालापासून पवन ऊर्जेचा उपयोग पाणी उपसणे, धान्य दळणे वा बागायती सिंचन या कामांसाठी केला जात असे; पण स्वस्त खनिज इंधने प्राप्त झाल्यापासून पवन ऊर्जेचा उपयोग बराच कमी झाला.

पृथ्वीवर ज्या भागांत वारे जोराने वाहतात त्या भागांत वाऱ्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल, याकडे सध्या लक्ष केंद्रित झाले आहे. या भागात वीजनिर्मिती फायदेशीर होऊ शकेल. त्याकरिता योग्य पवनचक्क्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या चक्क्यांद्वारे कमी खर्चात वीज निर्माण करता येईल.

वारा ज्या भागांत जरा मंद अथवा मध्यम गतीचा आहे त्या भागांत वाऱ्याचा उपयोग करण्यासाठी जास्त संवेदनक्षम पवनचक्क्या निर्माण करण्यासंबंधी संशोधन चालू आहे. वीजनिर्मिती सोडून इतर कामांकरिता पवन उर्जेचा उपयोग ह्या भागांत संवेदनक्षम चक्क्यांच्या द्वारे करता येईल.

भारतातील कोणत्या भागात पवन ऊर्जा किती प्रमाणात उपलब्ध आहे हे वाऱ्याच्या निरीक्षण सामग्रीवर आधारित संगणनाद्वारे ए. मणी आणि दि. आ. मुळे यांनी विंड एनर्जी डेटा फॉर इंडिया (१९८३) ह्या पुस्तकात स्पष्टपणे मांडले आहे. ही माहिती पवन उर्जेच्या वापरासाठी प्रकल्प योजणाऱ्या संस्थांना उपयुक्त आहे.

भारतामध्ये गुजरात राज्यात कच्छ परिसरात वारा जोराने वाहत असल्यामुळे तेथे पवन ऊर्जेपासून वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

कोणत्या प्रकारच्या पवनचक्क्या कार्य क्षम आणि उपयुक्त होतील यासंबंधी कर्नाटक राज्यातील बंगलोर शहरातील राष्ट्रीय वैमानिकीय प्रयोगशाळेत संशोधन केले जाते.

वाऱ्याची गती साधारणपणे १० मी. उंचीवर मापली जाते. पवनचक्कीची उंची यापेक्षा बरीच जास्त असते. त्यामुळे चक्कीच्या उंचीवरील वाऱ्याच्या गतीचा अंदाज बांधण्यासाठी पॉवर नियमाचा उपयोग केला जातो.

पवन ऊर्जेचा उपयोग आपण निरनिराळ्या प्रकारांनी करू शकतो. पुरातन कालापासून शिडांच्या नौका सागरावरून हाकारण्यासाठी वाऱ्याच्या ऊर्जेचा उपयोग करण्यात आलेला आहे. अनुकूल ईशान्य व्यापारी वाऱ्यांचा उपयोग पुरातन काली भारताची आफ्रिकेशी असलेली व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. अनुकूल वाऱ्यांचा उपयोग करून डीझेलची बचत करण्यासाठी आधुनिक मालवाहतुकीच्या डीझेलवर चालणाऱ्या मोठ्या बोटींना शिडांची जोड देण्यास सुरुवात झाली आहे. वारा गतिमान, स्थिर व नियमित असलेल्या भागांत मोठ्या पवनचक्क्या उभारून त्यांचा वीजनिर्मितीकरिता उपयोग केला जात आहे आणि डीझेल किंवा दगडी कोळसा यांची बचत करण्यात येत आहे. अस्थिर व अनियमित वारा असलेल्या भागांत अनुकूल वेळी योग्य पवनचक्कीचा उपयोग करून दळण, लाकडे कापणे, तेल काढणे, ऊस गाळणे, तळ्यातील किंवा विहिरीतील पाणी उपसून सिंचन करणे, पाणी एका ठराविक उंचीवरील मोठ्या टाकीत उपसून साठविणे आणि त्या पाण्यापासून जलविद्युत जनित्र चालवून वीज निर्माण करणे, अनुकूल परिस्थितीत वीज निर्माण करून व तिचा उपयोग करून पाण्यापासून हायड्रोजन व ऑक्सिजन निर्माण करून त्यांचा साठा करणे इ. विविध कामांकरिता करण्यात येतो किंवा येऊ शकतो.

पवनचक्क्यांचे नवनवीन प्रकार निर्माण होत आहेत. उभ्या आसाची पवनचक्की कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाऱ्यात काम करते. आडव्या आसातील पवनचक्कीतील पात्यांचे चक्र वाऱ्याच्या दिशेत ठेवण्यासाठी चक्राच्या मागच्या बाजूस दोन निमुळत्या पट्ट्यांचे सुकाणू जोडावे लागते. पवनचक्कीच्या निर्मितीमध्ये दोन गोष्टींकडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य सामग्री वापरून पवनचक्कीची किंमत एका विशिष्ट मर्यादेखाली ठेवणे आणि पवनचक्कीची कार्यक्षमता शक्य तेवढी वाढविणे या त्या गोष्टी होत. [⟶ पवनचक्की; शक्ति-उद्‍गम].

इतर उपयोग

साधारणपणे वारा कोणत्या दिशेने आणि गतीने वाहतो ह्या माहितीचा उपयोग घरबांधणी उद्योग आणि विमानतळावरील धावपट्टी बांधणे यांसाठी केला जातो. ह्या माहितीचा उपयोग करून घराची दिशा, घराची दारे व खिडक्या यांची योजना योग्य रीतीने करून घरात वायुवीजन चांगले ठेवण्यास होतो. ज्या दिशेत वारा जास्तीत जास्त वेळा वाहत असतो त्या दिशेत धावपट्टी बांधतात.

घराच्या शीतलीकरणासाठी वाऱ्याचा उपयोग केला जातो. ज्या भागात कोरडा व गरम वारा वाहतो त्या भागात घरांतील दारे व खिडक्या यांना वाळ्याचे पडदे लावून पडद्यावर पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली जाते. ओल्या पडद्यातून बाहेरचा कोरडा व गरम वारा आत आला म्हणजे बाष्पीभवनाच्या क्रियेमुळे तो थंड होतो. त्यामुळे उन्हाळ्यात आल्हाददायक वाटते.

उत्तर लिहिले · 23/9/2018
कर्म · 13485
0

पवनऊर्जेचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • पर्यावरणास अनुकूल: पवन ऊर्जा हे स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होते.
  • नैसर्गिकरित्या विपुल: पवन ऊर्जा नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे ती कधीही न संपणारी ऊर्जा आहे.
  • कमी खर्चिक: पवन ऊर्जा प्रकल्पांची स्थापना खर्चिक असली तरी, एकदा सुरू झाल्यावर पवन ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी असतो.
  • रोजगार निर्मिती: पवन ऊर्जा क्षेत्रात पवन टर्बाइनची निर्मिती, स्थापना आणि देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते, त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतात.
  • शेतीसाठी उपयुक्त: पवन ऊर्जा प्रकल्प शेतजमिनीवर उभारले जाऊ शकतात, ज्यामुळे शेती आणि ऊर्जा उत्पादन एकाच वेळी करता येते.
  • ग्रामीण भागासाठी वरदान: पवन ऊर्जा दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे?
भारतातील कोणत्या राज्यात पवन ऊर्जा निर्मितीची सर्वाधिक क्षमता आहे?
वारा व त्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेबद्दल माहिती मिळेल का?
पवन ऊर्जा म्हणजे काय?
wind turbine assembly madhye kaizen aahe ka?
पवनऊर्जा विषयी माहिती मिळेल का?