
झाड
1
Answer link
वडाच्या झाडाचे उपयोग
वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन वडाचा विस्तार वाढत जातो.

वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्ष असते.
भारतीय संस्कृती मध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्व विशद केले आहे .
आपण सर्वांना परिचित असलेली सत्यवान - सावित्री ची कथा ह्या वडाच्या झाडाशी इतकी निगडित आहे कि वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीराजांचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात .
पुराणकाळातील बुद्धिमान, सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती!
आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आणि म्हणूनच , आपोआप त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो
एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे.
वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात.
पुराण कथेनुसार , वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या ह्या शिवाच्या जटा आहेत .
प्रज्ञापुरीचे श्री स्वामी समर्थ ह्याच झाडाखाली बसत . वडाचे झाड हे दत्तगुरूंचे मूळ मानले गेले आहे . म्हणूनच, स्वामी आजोबा अनेकदा," वडाचे झाड - मूळ पुरुष " असे झाडाला उद्देशत असत.
त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात.
वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात.तसेच ,फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ असे असतात .मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.
*आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.*
१. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.
२. वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.
३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.
४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो.
५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.
६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात.
७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो
८.पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात.
९. वडाचे पान - अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो.
*वडाच्या फुलाचे,कोंबाचे,डहाळीचे,पानांचे फायदे आहेत. त्याने मनुष्याच्या आरोग्याला फायदा होतो. तो कसा ते पाहू :-*
१) वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात “ऑक्सिजन” वातावरणात सोडत असते.
२) भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते.
३) वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.
४) वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले जाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो.
५) वडाचा आयुर्वेदिक उपचारासाठीही उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांच्या रसाने केशवर्धन होते. पारंब्यांच्या काढा शक्तिवर्धक,बुद्धिवर्धक आहे.
६) गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो.
७) गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “पुसंवन”हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा.
८) वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो.
९) वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे.
१०) उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो.
११) यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.
म्हणजेच वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी उपयोगी असा हा वटवृक्ष.
१२)वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते.
उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. अशाप्रकारे , अनन्य साधारण महत्व असलेले हे झाड !
*ज्याच्या घराजवळ असेल , तो आजकालच्या प्रदूषणाच्या जगातही प्राणवायूने श्रीमंतच म्हणावा लागेल .*