
लिपि
1
Answer link
मोडी लिपी ही मुळात एक स्वतंत्र लिपी नसून देवनागरी लिपितून उगम पावलेली , जुन्या काळात वेगाने लेखन करण्यासाठी विकसित केलेली शीघ्रलिपी आहे .
साधारणतः तेराव्या शतकात यादवांच्या राज्यात हेमाडपंत नावाच्या अधिकारपदावर असणाऱ्या व्यक्तीने , शासकीय कारभारात लेखनाला वेग यावा म्हणून मोडी लिपी विकसित केली , असे दिसून येते . वेगाने लिहिणे हा निकष असल्यामुळे , मूळ देवनागरी लिपीपेक्षा त्यात वेगळ्या नियमांचा अवलंब केला जाई . उदा. एकाच मोठ्या रेषेखाली सर्व अक्षरे लिहिणे ,काना मात्रा वेलांट्या खालून वर लिहिणे , इत्यादी.
छपाईचे तंत्र विकसित झाले , आणि भारतात सर्वत्र पसरले , त्यानंतर भारतात प्रचलित लेखनातल्या अनेक लिप्या मागे पडल्या. मोडीचाही त्यात समावेश होतो. याचे सुरुवातीस कारण असे होते , की मोडी लिपी छपाईस अवघड होती . त्याकाळी आजच्यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान देखील नव्हते , त्यामुळे छापील अक्षरामध्ये मोडीचा हवा तितका समावेश झाला नाही. तरीही , १९५२ सालपर्यंत शाळांमधून मोडी लिपी शिकवत असत. त्यानंतर देवनागरी लिपीतच मराठी भाषेचे व्यवहार होऊ लागले.
आताच्या व्यवहारात मोडी लिपिकडे स्थित्यंतर करता येईल का? मला ह्याचे उत्तर नाही असे वाटते! जिथे लेखनकलाच मागे पडते आहे , तिथे भाषेची लिपी कशी बदलणार ?
ज्यांनी मोडी लिपी अभ्यासली आहे , त्यांना मोडी लिपीचे काहीसे तोटेही लक्षात येतील . एक तर मोडी ही शीघ्र लिपी असल्यामुळे त्यात शब्दांमध्ये अंतर देण्याची पद्धत नाही . वाक्याची फोड वाचणाऱ्याने आपल्या मनाने करावी. शिवाय एकाच अक्षराची अनेक वळणे असतात , बऱ्याच वेळा ती सारखी दिसतात ( ख आणि थ लिहिताना होणारी गडबड आठवा ;) . तसेच मोडी लिपीचा महत्त्वाचा नियम म्हणजे लिहिताना र्हस्व दीर्घाचे नियम पाळले जात नाहीत. सर्व उकार हे र्हस्व असतात आणि सर्व इकार दीर्घ असतात. शिवाय विरामचिन्हांचा अभाव असतो , ते वेगळे .
आनंदीबाईंनी ध चा मा कसा केला असेल , असा प्रश्न लहानपणापासून पडायचा , पण मोडी लिपी पाहता हेच नव्हे तर इतरही अक्षरांचे वळसे बदलणे शक्य आहे , असे वाटते ;(
आजच्या छापील मजकुराच्या जगात मोडीचा अधिकृत लिपी म्हणून समावेश करणे शक्य वाटत नाही , पण ज्या उत्साहाने आपण कॅलीग्राफी चे कौतुक करतो , आपणहून तशी अक्षरांची वळणे शिकतो , त्या प्रकारे मोडी लिपी व त्या लिपीचे सौंदर्यही आपण वाखाणले पाहिजे , कारण मराठी संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे.
